Search This Blog

Saturday, 5 April 2014

॥ अभ्यागत ॥


॥ अभ्यागत ॥



सकाळचे नऊ वाजत आलेले मी घड्याळात बघितले... ... अन्‌ ऍक्सिलरेटर पिरगाळत बुलेट्‌ चा वेग जरासा वाढवला.
रेल्वे स्टेशनवर पोंचायला आतां चांगलाच उशीर होणार, आणि शरद दातार ऊर्फ ’शर्‍या’ च्या घरीं येऊं घातलेल्या ’अभ्यागता’ ला स्टेशनवर आपली वाट बघत तांटकळत थांबावं लागणार, म्हणून मी चांगलाच वैतागलेलो होतो... ...खड्ड्यांच्या रस्त्यांना दूषणं देत होतो... ...
अन्‌ ’वाहतुकीची ऐशी तैशी’ करीत वेडीविद्री वाहनं हांकणार्‍या आगाऊ ’सर्कसपटूं’ ना शिव्याही घालत होतो.!!!

झालं होतं असं, की सकाळी सकाळीच ’शर्‍या’ च्या सौ. म्हणजे ’वृन्दावहिनीं’ चा फोन आला होता. त्यांच्या माहेरचा कुणीतरी आतेभाऊ एका लग्नसमारंभाला हजर राहण्यासाठी सकाळी साडे नऊ वाजतां पोंचणार्‍या ’वाराणसी पुणॆ एक्सप्रेस्‌’ नं पुण्यांत पहिल्यांदा च दाखल होणार होता. ’शर्‍या’ ला फॅक्टरी त सध्या पहिली पाळी असल्यानं मेव्हण्याला आणायला जाणं त्याला शक्यच नव्हतं. म्हणून ’सौ. वृन्दावहिनी’ नी हे काम माझ्यावर सोंपवलेलं होतं. 


मी तसा वेंळेच्या बाबतीत कांटेकोर असल्यानं चांगला तासभराचा वेंळ हातात ठेंवून सकाळी साडे आठ वाजतांच बाहेर पडलो होतो... ... कसाबसा ’नळ स्टॉप’ च्या चौकांत नवाला पोंचलो, तेव्हां तांबडा दिवा लागलेला होता... ... 
चौकात ’सखाराम’ कुठं दिसत नव्हते... ... तरी मी शिरस्त्याप्रमाणं वाहतूक रेषेच्या अलिकडं दुचाकी थांबवली. यथावकाश माझ्या बाजूचा सिग्नल पिवळा झाला, अन्‌ मी गिअर टाकून दुचाकी पुढं काढली... ... 

अन्‌ काय होतंय्‌ कळायच्या आतच डाव्या बाजूच्या आडव्या रस्त्यावरून लाल सिग्नल तोंडत एक ’जातिवंत पेशवे’ चौकात घुसले... ... 
आणि चौक ओलांडून उजवीकडं वळायच्या नादात माझ्या दुचाकी ला धंडकले.!!
बुलेट्‌ जाग्यावरच उभी राहिली... ... पण ’पेशव्यां’ ची ’स्कूटी पेप्‌’ मात्र ’हेलन’ च्या थाटांत गिरकी घेंत धराशायीं झाली.!!
पाठीमागं बसलेल्या ’मानकर्‍या’ सकट, गाडी दामटणार्‍या ’पेशव्यां’ चं जमिनीवर अवतरण झालं. !!!
मी साइड स्टॅंड ला गाडी लांवून उतरलो, आणि पाठीमागच्या सीटवरील गृहस्थानां धंरून उठवलं... ... आजूबाजूची चारदोन माणसंही धांवत आली, अन्‌ त्यांनी ’पेंशव्यां’ नां बखोट्या धंरून उभं केलं... ... आम्ही त्या दोघांना कुठं मुका मारबीर लागलाय्‌ काय त्याची चौकशी केली... ... तसं कांही नव्हतं.
सुदैवानं ’मानकरी’ अन्‌ खुद्द ’पेशवे’ ही किरकोळ ओंरखड्यांवर सहीसलामत बचावले होते... ... !!
माझ्या बुलेट्‌ ला ओंरखडे गेले दोनचार... ... पण ’पेशव्यां’ च्या ’ऐरावता’ चं मात्र जाग्यावरच ’पानिपत’ झालं.!!!!

झालं... ... आपल्या ’शाही ऐरावता’ चा ’तसला’ अपमान ’पेंशव्यां’ ना पंचेना... ...पण ’पानिपत’ तर त्यांनी स्वतःच्या कर्मानं च ओंढवून घेंतलेलं सगळ्या चौकानं बघितलेलं होतं... ...पण झाल्या प्रसंगाबद्दल नुस्ती दिलगिरी व्यक्त करणं सोडाच... ... लोकांनी केलेल्या मदतीबद्दल साधे धन्यवाद देणंही बाजूलाच राहिलं... ...उलट ’पेशवे’ च ’चोराच्या उलट्या’ ठोंकत माझ्यावरच बरसायला लागले.!!!
," काय हो महाशय... ... समोर बघून धड गाडी चालवतां येत नाही तुम्हाला?"
तो आगाऊपणा बघून मग माझं डोकं च संणकलं... ... 
मी," अहो ’श्रीमंत’... ... तुम्ही ’रंगांधळे’ आहात, की ’ठार आंधळे’ आहांत?
पेशवे," का?... ... ... काय झालं ?"
मी," नाही... ... म्हणजे धडधडीत लाल सिग्नल तोंडून गाडी घुसडताय्‌‌... ... म्हणून विचारलं !! ... ... काय? "
गर्दीतले चार दोन टगे न्‌ बघे आतां फिदीफिदी हंसायला लागले ... ... अन्‌ ’श्रीमंत’ आणखीनच चंवताळले. !!!
पेशवे," पिवळा सिग्नल होता... ... तुम्हाला दिसत नव्हता काय तो?.....ऑं?"
मी," पिवळा दिवा लागला की गाडी थांबवायची असते ... ... ’उडवायची’ नसते... ...!!
आणि तुम्ही गाडी उडवलीत, तेव्हां तुमच्या बाजूचा लाल दिवा लागलेला होता... ... पिवळा नव्हे.!!... ...समजलांत?"
झालं... ... आतां बघ्यांची गर्दी जमायला लागली.
पेशवे," लाल दिवा लागेपर्यंत गाडी पुढं काढता येते... ... मला शिकवायचं कारण नाही.!!"
मी," अहो लागेपर्यंत च कश्याला? अगदी लाल दिवा लागलेला असला तरी गाडी दामटतां येते की... ... पण ती ’राष्ट्रपती’ ला... ... ’पेशव्यां’ ना नव्हे.!!!...काय? ... ... की ’राष्ट्रपती’ समजतां स्वतःला?"
पेशवे," ओ SSSSSS... ...आम्हाला शहाणपणा शिकवायचं कारण नाही!!... ...गाडी मी पुढं काढली घाई होती म्हणून... ... आणि ते पण लाल दिवा लागायच्या आधी... ...तुम्ही च थांबायला पाहिजे होतं.!!!"
मी," घाई असली तर विमानातनं फिरायचं असतं... ...’स्कूटी पेप्‌’ वर नाही.!!... ...समजलं?" 
गर्दीतले लोक आतां खीः खीः करायला लागले. 
पेशवे," गाडी चं नुकसान कोण भंरून देणार आतां?"
मी," तें ज्यानं तुम्हाला सर्कस करायला शिकवलं... ... त्यालाच जाऊन विचारा.!!! 
नाहीतर ’पोलीस कंट्रोल रूम’ ला मी च फोन करतो... ... काय? ते येऊन सांगतील तुम्हाला बरोबर.!!!... ..."
जमलेल्या गर्दीतले टगे आतां खदांखदां हंसायला लागले, अन्‌ पेंशव्यांनी स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!
आतां निरुद्योगी बघ्यांची गर्दी ज्यास्तच वाढायला लागली... ...गर्दीतल्या दोघांतिघांनी पेशव्यांचा ’ऐरावत’ रस्त्याकडेला नेऊन उभा केला... ... ’मानकर्‍यां’ नी जाणारी  एक रिक्षा हांत करून थांबवली.
तसं वंतवंतणार्‍या ’पेशव्यां’ कडं ढुंकूनही न बघतां मी किक्‌ मारून दुचाकी रेल्वे स्टेशनच्या दिशेनं पिटाळली... ...

इतकं ’महाभारत’ होंईतोंवर साडे नऊ वाजत आले होते... ... !!
’शर्‍या’ चा अभ्यागत स्टेशनवर माझी वाट पहात तांटकळत उभा असणार, या जाणिवेनं मी गाडी जराशी हाणलीच... ... आणि नऊ पन्नास ला पुणे रेल्वे स्टेशन मध्ये प्रवेश केला. गाडी सहा नंबर च्या फलाटावर लागलेली होती. मी चार जिने चंढायची-उतरायची कसरत करीत सहा नंबर फलाटावर पोहोचलो.
बघतो तर काय......गाडी ठार रिकामी.!!!.......सर्व उतारू कधीच निघून गेलेले... ...
नित्यनेमानं न चुकतां तासभर तरी उशीरा येणारी ही गाडी आज कधी नव्हे ती तब्बल पाऊण तास नियोजित वेंळेआधी - म्हणजे पावणे नऊ वाजतांच - पुणे स्टेशन ला पोंचलेली होती. !! म्हणजे नळस्टॉपवर मी पोंचायच्या आधीच पुणे स्टेशनला गाडी लागलेली होती.!!
’भारतीय रेल’ चिरायु होवो. !!! 
रेल्वेनं आलेली डाक-पार्सलं इत्यादी उतरवायची हमालांची गडबड उडालेली होती, अन्‌ गाडी आतां शंटिंग्‌ यार्ड ला निघायच्या बेतात होती.!!
झालं... ... आता घरीं गेलं की ’सौ. वृन्दावहिनीं’ बहुधा ’चंपी’ करणार...!!
ती परवडली एकवेळ... ... पण आमच्या ’सौ. इंदिराजी’ च्या हस्ते ’बिनपाण्याची’ व्हायला नको.!!!
मी ’पेंशव्यां’ ना मनांतल्या मनांत लाखोली वाहत कपाळाला हात लावला.!!!! ... ... ...
अन्‌ स्टेशनसमोरच्याच एका उडप्याच्या हॉटेलांत शिरलो.

गल्ल्यावरचा फोन उचलून मी ’शर्‍या’ च्या घंरचा नंबर फिरवला... ... ’सौ. वृन्दावहिनीनी’ च तो उचलला.
मी," वहिनी... ... मी नाना बोलतोय्‌... ... "
सौ. वृन्दावहिनी," हं बोला भावजी... ... काय?"
मी," अहो जरा गडबड झाली रस्त्यात स्टेशनला जातांना... ... बहुधा मी स्टेशनवर पोंचेतोंवर पाहुणे घरीं निघून गेले वाटतं वाट बघून... ... पोंचलेत काय घरीं?"
सौ. वृन्दावहिनी,"अजून तरी नाहीत... ...काय गडबड झाली म्हणे रस्त्यात?"
मी,"एक ’सर्कसपटू’ धंडकला माझ्यावर... ..."
सौ. वृन्दावहिनी," का SSSSSS य?... ... तुम्ही ठीक आहांत ना भावजी?... ... की लागलंय्‌ बिगलंय्‌ कुठं?"
मी," मी ठीक आहे वहिनी... ...चिंता करूं नकां... ...गाडीला चार ओंरखडे गेलेत फक्त... ... "
सौ. वृन्दावहिनी," खरं काय तें सांगा भावजी!!!... ...कुठून बोलताय्‌ आत्तां तुम्ही?... ... नेमकं काय... ... "
मी," वहिनी... ... अहो मी... ... "
पलीकडचा आवाज एकदम बंदच झाला... ... माझी हवा तंग झाली.!!... ... अन्‌ क्षणार्धांत ’गौरांग’-म्हणजे ’शरद’ चा मुलगा-फोनवर आला.
गौरांग,"काय झालंय्‌ काय काका?... ... कुठून बोलताय्‌ तुम्ही?"
मी," आई ला फोन दे जरा... ... "
गौरांग,"आई नं डोंळ्यांना रुमाल लावलाय्‌ !!!... ... काय झालंय?"
मी," हे बघ ’गोरा’....’तसं’ कांहीही झालेलं नाही...  ...आई ला सांग घाबरूं नको म्हणून... ...फक्त गाडी घांसलीय्‌ जरा... ... पण मी अगदी ठीक आहे... ...  स्टेशनवरनंच बोंलतोय्‌....आईला दे बरं फोन."
पलीकडून ’सौ. वृन्दावहिनी’ चा कांपरा आवाज आला," घरीं परत निघा ताबडतोब...  ...!!! "
मी," वहिनी...  ...अहो कांहीही झालेलं नाहीय्‌ मला...  ...काळजी सोडा बघूं... ... पाहुणे घरीं पोंचलेत काय तेंव्हढं सांगा."
सौ. वृन्दावहिनी."पाहुणे हे एव्हढ्यांतच पोंचले घरीं ...   ...गाडी वेळेआधीच पोंचली म्हणाले ... ... त्यांना एक मित्र भेंटला स्टेशनवर... ... म्हणून तिथं थांबण्याऐवजी त्याच्या गाडीवरच घरी आले... ...त्यांच्या   हाताला पण खंरचटलेलं दिसतंय्‌...  ...!!
मेला अपघातांचा मुहूर्तच लागलाय्‌ वाटतं आज... ... तुम्ही ताबडतोब परत फिरा घराकडं... ... समजलं? "
मी," पाहुण्यांना काय झालं आणखी?"
सौ. वृन्दावहिनी,"आल्यावर सांगते...  ...निघा परत लगेच."
मी," ठीकाय्‌ वहिनी...  ...निघतो...  ...दुपारी चक्कर मारीन घरीं."
सौ. वृन्दावहिनी," मी घरीं परत निघा म्हटलं तें ’तुमच्या घरीं’ नव्हे.!!! ... ... कळलं? ’इथं’ परत या लगेच...  ...मी वाट बघतेय्‌...  ...की ’गोरा’ ला च पाठवूं तिकडं?" 
मी,"ठीकाय्‌ वहिनी... ...येतो लगेच... ... झालं ना?"
सौ. वृन्दावहिनी," नाही झालं... ...इथं पोंचेपर्यंत ’सुमी’ ला अजिबात फोन करायचा नाही... ... तिचा आणखी जीव नको टांगणीला लागायला."
मी," वहिनी...  ...अहो फांसावर चंढायची मला हौस आलीय्‌ काय?"
सौ. वृन्दावहिनी," तसा फतवा निघायच्या आंत पोंचा इथं.!!!... ... कळलं?"
"हो कळलं... ...निघतो.‌" म्हणून मी फोन ठेंवला...  ...अन्‌ कपाळाला हात लावत बुलेट्‌ ला किक्‌ मारली.

सकाळचं ’महाभारत’, अन्‌ आत्ताचं ’रामायण’...  ...मी क्लच न ओंढतांच पहिला गिअर टाकला.!!!
तोंपर्यंत सव्वादहा वाजले होते.....आतां सगळ्या कार्यालयांची वेंळ झालेली होती....एकीकडं रस्त्यावर ’सर्कसपटूं’ चा लोंढा फुटलेला होता...  ...अन्‌ दुसरीकडं ’सौ. वृन्दावहिनी’ टांगणीला लागून घरीं वाट बघत बसलेल्या....!!
जमेल तेंव्हढी त्या लोंढ्यातनं गाडी रेंमटत कसाबसा मी साडेअकरा वाजतां ’शर्‍या’ च्या घरीं पोंचलो.
सौ. वृन्दावहिनी फाटकातच येरझारे घालत उभ्या... ...!!
चारही बाजूंनी निरखून मी सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यावर मग त्यांनी ओंले डोळे टिपून पहिला मोकळा श्वास घेंतला.!!!
म्हणाल्या,"अहो आज कुठली अमावास्या लागलीय्‌ देव जाणे भावजी....’विवेक’ ला पण येतांना धंडपडायला झालं...  ...गाडी वेळेआधीच पोंचली, अन्‌ त्याचे एक मित्र कुणालातरी पोंचवायला आले होते...  ...ते भेटले त्याला फलाटावर. म्हणून ’विवेक’ त्यांच्याच गाडीवर मागं बसला, न्‌ दोघे निघाले घरी...  ...तर ह्यांना पण रस्त्यांत अपघात....
कुठल्यातरी गाडी ला धडकले म्हणे....नशीब हे दोघे वाचले...  ...ह्यां च्या गाडीचा चेंदामेंदा झालाय्‌ म्हणे अगदी...  ...शेवटी रिक्षा करून आले.
त्यांना ’या बसा’ म्हणतेय् तोंवर पांठोपांठ तुमचा फोन.!!!... ...अन्‌ मला तर भिरभिरल्यासारखंच झालं."
मी," पाहुणे ठीकाय्‌त ना आतां ? ... ... आणि त्यांचे मित्र?"
ठीक आहेत दोघेही...  ...देवाची कृपा...  ...आणि असे मित्र तरी आजकाल कुठं मिळताय्‌त भावजी? एव्हढं ’रामायण’ झालं... ...गाडीची वाट लागली... ... तरी बिचारे ’विवेक’ ला पोंचवायला रिक्षा करून घरापर्यंत आले. आणि तुमचा फोन आल्यावर मला जरा चक्करल्यासारखंच झालं ना... ...म्हणून तेही थांबलेत तुमची वाट बघत ... ... तुम्ही आल्यावर निघतो म्हणाले ... ... म्हणून मी जेंवायलाच थोंपवून ठेंवलंय्‌ त्यांना पण...  ...चला वर जाऊं या."
जिना चंढतां चंढतां सौ. वृन्दावहिनी ना थोंडक्यात सगळं ’महाभारत’ मी सांगितलं...  ...
तसं घरांत शिरतां शिरतां शांत संयमी स्वभावाच्या ’सौ. वृन्दावहिनीं’ चा पण दांडपट्टा सुटला... ...थेंट ’सौ. इंदिराजीं’ च्या थाटांत... ...,"आगाऊ हलकट मेले!!! ... ... छत्रपती समजतात स्वतःला जणूं... ... गजाआड घांलून चांगले फोंडून काढल्याशिवाय सुधारायचे नाहीत हे असले लोक.!!!! "
आतनं कुणाचातरी आवाज आला,"काय झालं गं वृन्दा?"
सौ. वृन्दावहिनी," कांही नाही रे विवेक... ... तुमच्यासारखंच रामायण झालं भावजीं चं पण... ... दुसरं काय? भावजी, आतां बूट बीट कांढा न्‌ हांतपाय धुवून घ्या... ...लगेच वाढतेच मी जेवायला... ... सगळे थांबलेत तुमच्यासाठीच... ... "

इतकं बोलून सौ. वृन्दावहिनी स्वयंपाकघरांत अदृष्य झाल्या ... ...
मी बूटमोजे कांढून घडवंचीवर ठेंवले... ... आणि दरवाज्यावरचा पडदा हातानं बाजूला सारत दिवाणखान्यात पाऊल टाकलं... ... !!
अन्‌ थण्डगार बर्फाच्या पाण्यात बुडकी मारल्यागत माझा जागच्याजागीं गोठून जणूं पुतळा च झाला... ...!!
समोरच्या कोंचावर सकाळचे ’मानकरी’ अन्‌ दस्तुरखुद्द ’पेशवे’ च गप्पा मारत बसलेले होते... ...!!!
’श्रीमंतां’ च्या नाण्याची एक बाजू तर सकाळीच पाहिलेली होती... ...आतां ही दुसरी बाजू बघून माझी बोलती च बंद झाली.!!! 
मला बघतांच दोघेही भूत दिसून दांतखिळी बसल्यागत ताड्‌दिशी उठून उभे राहिले... ...!!!
’मानकरी’ डोंळे फांडफांडून माझ्याकडं बघतच राहिले... ... ...
आणि खुद्द श्रीमन्त ’पेशव्यां’ नी च आ वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावला ... ... !!!!!
आमच्या ओंळखी करून द्यायला स्वयंपाकघरातनं नुकत्याच बाहेर आलेल्या ’सौ. वृन्दावहिनी’ नी पुन्हां एकदा श्वास अडकून चक्करल्यासारखं होत माझ्याशेंजारच्या कोंचावर धंप्पदिशी बसकण मारली. !!!!!!
अन्‌ दुसर्‍या क्षणीं सगळेच आपापल्या कपाळांना पुन्हां हांत लावत स्वतःला च खदांखदां हंसायला लागले. !!!!!!!

**************************************************************
----- रविशंकर.
२८ फेब्रुवारी २०१४.

No comments:

Post a Comment