Search This Blog

Wednesday, 13 November 2013

॥ बल्लवीसंशोधन ॥

॥ बल्लवीसंशोधन ॥

गुरुवारी सकाळी सकाळी सात वाजतांच माझ्या घराची घंटा वाजली.
’च्यायला, कोण कडमडायला आलंय झोंपमोड करायला......’, असं तंणतंणतच डोंळे चोंळत मी दरवाजा उघडला.

बघतो तर काय आमचे सख्खे शेंजारी श्री. विनायक श्रीपाद ऊर्फ विनोबा खांबेटे दारांत उभे.....दत्त म्हणून.
" काय छत्रपती....., उठलांत की नाही? कां लोळताय्‌ अजून?", म्हणत खांबेटे घरांत येऊन सोफ्यावर बसला.
"काय विनोबा, गुरुवारी शेंजारी लोळलेले बघवत नाहीत काय? इतक्या भल्या पहांटेच? काय झालंय बाबा? 
की वहिनीनीं ठोंकून काढलाय्‌ तुला?", म्हणत मी अंथरूण पांघरूण आंवरायला लागलो....
स्वयंपाकघरांत खुडबुडणार्‍या बायकोला चहा टाकायला सांगितलं..... 
अन्‌ विनोबांना वाचायला ताजं वर्तमानपत्र देंऊन तोंड धुवायला मी बेसिनकडं गेलो.

विनायक श्रीपाद खांबेटे हा माझा नोकरीतला सहाकारीच नव्हता, तर कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये एकत्र रहात असल्यानं सख्खा शेंजारी पण होता.
खासगी उद्योगक्षेत्रात कारखान्यातल्या नोकर्‍या असल्यानं गुरुवार हा आमचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस. 
दररोज सकाळी धडपडत उठून सव्वासातला आम्हाला बस पकडावी लागायची. 
त्यामुळं दर गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत लोळणं हा माझा आवडता कार्यक्रम, तर हे विनोबा गुरुवारीसुद्धां पहांटे साडेपांच वाजतांच उठायचे. 
सकाळी लवकर उठणारे असल्यामुळं रोजच्या बसथांब्यावरही वेळेआधी पंधरा मिनिटं तरी हमखास हजर असायचे. 
कधी कधी मला बस पकडायला धांवत सुटायची वेंळ आली, तर इतर प्रवाश्यांच्या कुरबुरीला भीक न घालतां, बाजीप्रभूच्या आवेशांत माझ्यासाठी बस थोंपवून देखील धंरायचे.
हे विनोबांसारखे लोक सुट्टीच्या दिवशीही भल्या पहांटे अवेळी उठून मस्त सांखरझोंपेचं खोंबरं कां करून घेतात, 
आणि पुढं उन्हं वर चढेपर्यंत नंतर वेंळ तरी कसा काय घालवतात, हे मला कधीही न सुटलेल्या अनेक कोड्यांपैकी एक कोडं. 
मी स्वतःच एकदां हा प्रयोग करून पाहिलेला होता.... अन्‌ जेमतेम अर्ध्या तासानं वैतागून, पुन्हां तोंडावर पांघरूण ओंढून मस्त तांणून दिली होती....
वर आणखी ,’ झेंपत नाहीत ते उपद्व्याप करावेतच कश्याला ? ’, असा बायकोचा कुजकट टोमणाही मुकाट ऐकून घ्यावा लागला होता. 
त्यानंतर मात्र मी हयातीत कधी त्या फंदात पडलो नाही. ! 
विनोबांची बायको सौ. विद्या.....पूर्वाश्रमींची कु.विद्या पेंडसे, ही माझ्या बायकोची कॉलेजातली वर्गमैत्रीण. त्यामुळं विनोबांचं आणि आमचं सख्य चांगलं होतं. 
मात्र ह्या विनोबांची एक गोची होती. जन्मानं पुणेकर असल्यामुळं असेल कदाचित....
पण विनोबांना आपल्या एकारान्ती आडनांवाचं जरा ज्यास्तच कौतुक होतं. तसं ते नेहमीच विनोबांच्या  बोलण्यातनं, अथवा आवडीनिवडीतनं जाणवायचं देखील. 
सौ. विद्यावहिनींचं माहेर झांशी. तसं म्हटलं तर त्यासुद्धां एकारान्तीच. पण गंमत अशी की त्यांच्या वागण्याबोलण्यात मात्र हे मात्राप्रेम कुठंच जाणवायचं नाही.
वागणं-बोलणं,करणं-संवरणं......,सगळंच सढळ हाताचं......आल्यागेल्यालाही कधीच तश्या मोकळं सोडायच्या नाहीत.
हे पेशवाईतले विनोबा, अन्‌ झांशीवाल्या विद्यावहिनींचं कसं काय जमलं, हे सगळ्यानाच एक कोडं होतं........
बहुधा सौ. विद्यावहिनीनींच ह्या विनोबांना पत्करलेलं असावं, असं सगळे म्हणत खरे. 

अर्थात ह्या व्यक्तिगत गोष्टी आमच्या शेंजारधर्माच्या जरी कधी आड आल्या नाहीत, 
तरी ह्या विनोबांच्या मात्राप्रेमाची आमच्या मित्रमंडळीत मात्र बेदम टिंगल व्हायची. 
अन्‌ शरद ऊर्फ शर्‍या दातार हा त्या खेंळात सगळ्यात पुढं असायचा. 
एकदां हा शर्‍या विनोबांना म्हणाला देखील होता, " विन्या साल्या, आडनांव लिहितांना ’खांबेटे’ असं लिहिण्याऐवजी ’खेंबेटे’ असं कां लिहीत नाहीस रे "?
"म्हणजे काय...... म्हणायचंय्‌ काय तुला शर्‍या?", विनोबा.
शर्‍या," त्याचं काय आहे विन्या, ’खेंबेटे’ असं आडनांव लिहिलंस ना, 
तर तुला नुस्ती ’एकारान्ती’ ऐवजी ’एकारादिमध्यान्ती’ अशी मस्त उपाधी पण लावतां येईल बघ........हीः हीः हीः"!!!
विनोबा त्यानंतर शर्‍या दातार बरोबर पंधराएक दिवस बोलत नव्हते.....यथावकाश विनोबांचं मौन सुटलं.....
पण विनोबांचं मात्राप्रेम मात्र कधीच निवळलं नाही.....अन्‌ मित्रमंडळींची करमणूकही अखंड होत राहिली.

तर असे हे आमचे विनोबा भल्या सकाळीच आमच्या घरी येऊन स्थानापन्न झालेले होते. मी दांत घासणं, तोंड धुणं वगैरे आंवरलं, 
अन्‌ टॉवेलनं तोंड पुसत दिवाणखान्यात विन्यासमोरच्या कोंचावर विराजमान झालो. 
तेंव्हढ्यात माझी बायको सौ. सुमीता चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.
तिघांच्यासाठी चहा ओंतून दिल्यावर तीही गप्पा मारायला बसली.
"हं बोल विन्या", मी विचारता झालो," इतक्या सकाळी टंपकलाय्‌स, म्हणजे वहिनीनीं कसलीतरी तराटणी मागं लावलेली दिसतेय्‌......बोल काय आहे"?
" तसं कांही नाही रे नाना, स्वयंपाकीण काम सोडून गेलीय्‌....... त्यामुळं विद्याची जरा अडचण....म्हणजे पंचाईतच झालीय्‌ म्हण.....
तेव्हां तुझ्या माहितीतली एखादी चांगली बाई स्वयंपाकाच्या कामासाठी मिळत असली तर लगेच पाठवून दे विद्याकडं....
शक्यतों आजच्या आज.....म्हणून सकाळी सकाळीच आलोय्‌ "
"सुमीता, आहे काय गं कुणी मोकळी आपल्या माहितीत? बघ बरं जरा लगेच....
म्हणजे काय की विद्यावहिनी पण तुझ्यासारख्या नोकरीवाल्या आहेत ना....म्हणून.
चांगलीच पंचाईत झाली असणार त्यांची.......काय विनोबा बरोबर आहे ना?", मी पुसलं.

इतक्यात परत दरवाज्याची घंटा वाजली, अन्‌ सुमीताचा आवाज आला," या या शरदभावोजी.....अरे वा वा वा.....वृंदे तूं पण? 
अहो............. वृंदा अन्‌ शरदभावोजी आलेय्‌त....
आज अगदी अलभ्यलाभच दिसतोय्‌..... बसा गं वृंदे....विनूभावोजीपण आलेत.....मस्त गप्पा होतील.....मी आलेच चहा टांकून."
"या या....वृंदावहिनी....शरदराव....स्वागतम्‌....बसा बसा", मी दोघांना बसवीत आंत आवाज दिला," सुमे....ह्यांचा चहा जरा लौकर घेऊन ये गं....पहिला गार होतोय्‌...."
" तुम्ही दोघे सुरूं करा ", हिनं आतनं आवाज दिला," आलेच दोन मिनिटांत चहा घेऊन ".

"बरं तर मग नाना, काय करतोय्‌स ’बाई’ चं "?, विनोबांनी चहा पीत विचारलं. 
शर्‍या नं कान टंवकारले....तेंव्हढ्यांत मी म्हणालो," काळजी सोड विन्या, सुमीता करील कांहीतरी बाई ची व्यवस्था संध्याकाळपर्यंत....
तिच्या बर्‍याच ओंळखी पाळखी आहेत."
वृंदानं विचारलं," कामवालीची चौकशी काय विनूभावोजी? मेल्या सहा महिने धड टिकेना झाल्याय्‌त बघा....सगळीकडं हीच बोंब झालीय्‌."
"कामवालीची नाही हो......स्वैपाकिणीची चौकशी....सध्याची सोडून गेलीय्‌ ना....म्हणून.", विनोबा.
"असं होय विन्या?....मला वाटलं की..............बहुधा...........", इतकं बोलून शर्‍या थांबला.
"काय वाटलं रे तुला शर्‍या?", विनोबा टंवाळीचा वास येऊन फिस्कारले.
" मला वाटलं विन्या..... ’बाई’ चं काय करतोय्‌स म्हणून नानाला विचारतोय्‌स.......म्हणजे....", शर्‍यानं फिरकी तांणली.
" म्हणजे....म्हणजे काय?", विनोबा.
शर्‍यानं टांग मारली," म्हणजे मला वाटलं की...परत वधूसंशोधन सुरूं केलंय्‌स की काय?.... हो हो हो हो...." !!
मी हंसायला लागलो.....अन्‌ वृंदा हसूं दांबीत म्हाणाली," ह्यां च्या नादाला नकां लागूं विनूभावोजी....स्वभाव माहीत आहे ना?
सुमी करील काम तुमचं..... मी पण बघते.....बरं एक सांगा.....कशी स्वैपाकीण हवी आहे तुम्हाला....काय अपेक्षा आहेत तुमच्या?"
तेंव्हढ्यात सौ. सुमीता पण बाहेर आली, अन्‌ शर्‍या-वृंदाला चहाचे कप देंत विनोबांना म्हटली," मी ऐकलं बरं का सगळं आतनं विनूभावोजी....
बरं सांगा तरी....काय अपेक्षा आहेत तुमच्या स्वैपाकिणीकडून ते?"
" विशेष कांही नाही....विनोबा म्हणाले....स्वयंपाक स्वच्छ,चंवदार, अन्‌ उधळमाधळ न करतां करणारी हवी....बाकी काय असणार सुमावहिनी?"
"मग तुमचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा विनूभावोजी...", सौ. सुमीता म्हणाली,
" आमच्या स्वयंपाकीणबाई च विचारत होत्या मला परवां..... 
अजून एखादं जवळपासचं काम मिळतंय काय  ते बघा म्हणून....
आमच्या बाई तर फक्त स्वयंपाकाच नाही, तर धुणी-भांडी,केर-फरश्या, निवडणं-टिपणं....सगळीच कामं करतात....
अगदी वक्तशीर अन्‌ चोंख आहेत कामाला....विद्याला तर एकदम पटतील बघा.....सांगूं मग त्यांना भेंटायला?"
" वा वा वहिनी...म्हणजे प्रश्न सुटलाच म्हणा की.....", विनोबा आनंदले," काय नांवगांव या तुमच्या बाईंचं?"
"इथल्याच आहेत....पौडफाट्याच्या कामगार वसाहतीत राहतात जवळच....नांव आहे फातिमा शेख", सौ. सुमीता म्हणाली.
विनोबा चंपापून जरा गप्प झाले......मग हंळूच म्हणाले," नको नको सुमावहिनी.....दुसरी बघा एखादी........"
" अहो काय झालं नको म्हणायला भावोजी?",....सौ. सुमीता म्हणाली," अहो फातिमासारखी स्वयंपाकीण दिवसां कंदील घेऊन धुंडाळलीत तरी मिळायची नाही......
नशीबवान आहांत तुम्ही.....सध्या ज्यास्तीचं एखादं काम शोधतेय्‌.....कसला विचार करताय्‌ एव्हढा....अं?"
विनोबा," नको वहिनी......दुसरी बघा एखादी.....शक्यतो ब्राह्मणच......."
शर्‍यानं चान्स घेंतला," आणि बरं कां सुमावहिनी.....जमलं तर ’एकारान्ती’ च बघा.....स्वयंपाक नसला येत तरी चालेल" !!
विनोबा उसळले," काय म्हणायचंय्‌ काय तुला शर्‍या.....ऑं?"
सौ. वृंदा-सुमीता नी कपाळाला हांत लावले !!.....विन्या-शर्‍याची आतां जुंपणार..... हे आम्ही ओंळखलं.
"अहो कसलं ब्राह्मण बिह्मण घेंऊन बसलाय्‌ भावोजी?", सौ. वृंदा म्हणाली," तुम्ही नकां ह्यां च्या नादाला लागूं....
अहो, फातिमा घरकामाला खंरंच लाखांत एक बाई आहे बघा.....झाडणं-पुसणं, भांडी घांसणं....अगदी आरश्यासारखं लखलखीत.....
आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर.....इथं तो आपण सगळ्यानीच अनेकवेळा चांखलेला आहे....अगदी बोंटं चांटत....होय की नाही?
मग कसली लांबड लावत बसताय्‌ आतां? ठंरवून टाका अन्‌ व्हा मोकळे.....विद्या पण अगदी खूष होईल बघा.....पैज मारते हवी तर" 
सौ. सुमीता," आणि विश्वासूं कामवाल्या कुठं मिळताय्‌त आजकाल विनूभावोजी? कधी कधी फातिमावर घरसुद्धां सोडून आम्ही अगदी खुशाल बाहेर जातो.....
आजतागायत अठरा वर्षं झाली.....कधी इकडची काडीसुद्धां तिकडं झालेली नाही.....पैश्याअडक्याचं तर सोडाच.....मग काय.....देऊं तिला पाठवून?"
" राहूं द्या वहिनी........," विनोबा," ब्राह्मणच बघां दुसरी एखादी."
"आणि ’एकारान्ती’ च बघा वहिनी.....",शर्‍या पंचकला," शाण्डिल्य गोत्री नको.....सगोत्री चालणार नाही विनोबांना !!
वृंदे.....मी म्हटलं नव्हतं मघांशीच?......विन्या साल्या.....तुझं स्वयंपाकीण संशोधन चाललंय्‌.........की वधूसंशोधन रे?......ऑं?"
बैठकीत चांगलीच खंसखंस पिकली.....
इतक्यांत दरवाज्याची घंटा वाजली..........अन्‌ दस्तुरखुद्द सौ. विद्यावहिनीच बैठकीत हजर झाल्या.......
सौ. सुमीतानं चहाचा सरकवलेला कप उचलीत विनोबांना म्हणाल्या," कसली चर्चा चाललीय्‌ एव्हढी?"
"अगं विद्या, तुझ्या स्वयंपाकीण बाईचीच", सौ. वृंदावहिनी," ह्या सुमीकडची उत्तम बाई आहे मोकळी.....
तर विनूभावोजीच नको म्हणताय्‌त....म्हणून काथ्याकूट चाललाय्‌........."
"कां हो.......................कां नको?",सौ. विद्यावहिनीनी विनोबांच्याकडं नजर रोंखून मोर्चा वळवला....," सुमीकडची बाई उत्तम स्वयंपाक करते.............मला माहीत आहे..................मग माशी कुठं शिंकतीय्‌?"
"तसं कांही नाही गं विद्या ", विनोबा,"त्याचं काय आहे ....की................"
सौ. विद्यावहिनींचे डोंळे संशयानं बारीक झाले," काय आहे त्याचं..................अं?"
विनोबा चांचरले," असं बघ विद्या......कामवाली आपल्या जातीमधलीच असली ना, की बरं पडतं............
म्हणजे करणं-संवरणं वगैरे आपल्यातल्यासारखंच असणार.....होय की नाही?"
शर्‍या," म्हणजे पातेलंभर रस्साभाजीत एकच मिरची!.....ती पण फक्त बुचकळून लगेच बाहेर काढायची....!! असंच ना विन्या?"  
"तूं गप्‌ रे शर्‍या......तुला काय कळतंय्‌ रे करण्या-संवरण्यातलं?", विनोबा वतवतले.
"कसलं डोंबलाचं करणं संवरणं घेंऊन बसलाय्‌ तुम्ही....?", झांशी संस्थान कडाडलं," अहो तुमच्या आईचं न्‌ माझं करणं संवरणं तरी एकसारखं आहे काय?................बोला की !! "
’झांशी’ च्या पहिल्याच तडाख्यात ’पेंशवाई’ ची बोबडी वळली.......!!! 
आतां मी च मध्ये पडलो," अरे विन्या....मला सांग.....तुला कामवालीच्या पाककलेशी देणंघेणं आहे, की जातीपातीशी......अं? 
आणि ब्राह्मण स्वयंपाकीण तरी असा काय जगावेगळा स्वयंपाक करून दिवे लावणाराय्‌  रे?....
आमच्या फातिमाबाई तर ब्राह्मणीच्याही तोंडांत मारील असा चंमचंमीत स्वयंपाक करतात....खरं की नाही?
वृंदावहिनी म्हणताय्‌त तेंच बरोबर आहे.....ठंरवून टाक आणि मोकळा हो.....विद्यावहिनी पण खूष होतील बघ अगदी"
"होणारच", शर्‍यानं शालजोडीतला हाणला," नाना........., झांशीचं पाणी आहे ते...........मुळा-मुठेचं नव्हे !!.....काय विन्या?"
सौ. वृंदावहिनीनी आतां कपाळाला हात लावला.!!.................
काय रामायण चाललंय्‌ ते सौ. विद्यावहिनीनां बरोबर समजलं !!!
म्हणाल्या," सुमे...ह्यांच्याकडं नको लक्ष देऊं....फातिमा असली मोकळी, तर पाठव आजच....मी बोलते तिच्याशी......
अगं नोकरी अन्‌ घरचं सांभाळतांना इथं माझा पिट्टा पडतोय्‌....ह्यां चा नव्हे.!!"

विनोबा आतां मात्र अगदी गंभीर झाले......," नको सुमावहिनी.....ब्राह्मणच बघा दुसरी एखादी....."
अन्‌ सौ. विद्यावहिनीकडं वळून म्हणाले," जरा कळ काढायला काय हरकत आहे गं? 
चारदोन दिवसांत मिळेल की एखादी चांगली ब्राह्मण बाई..........त्यांत आहे काय एव्हढं घायकुतीला येण्यासारखं?"
" ठीकाय्‌...........", सौ. विद्यावहिनींची ’मुल्क-ए-मैदान’ धंडाडली," नाहीतरी आपली धुणीभाण्डीवाली तरी कुठं स्वजातीय आहे?.......तिलापण देते हांकलून.................!!
आणि उद्यापासून केंर-फरश्या मी करते,,,.........अन्‌ धुणी-भाण्डी-स्वयंपाकाचं तुम्हीच बघा............काय?"!! 
विनोबांचा जागच्या जागी गांरठून पुतळा झाला. !!!
आतां त्यांनी सौ. वृंदावहिनीकडं पाठिंब्यासाठी मोर्चा वळवला......," वृंदावहिनी........तुम्हीच विद्याला सांगा जरा समजावून....."
एव्हढं झाल्यावर मात्र शर्‍याचे डोंळे चमकले.....अन्‌ मी सावध झालो......

शर्‍या," लेको जेट युगात वावरताय्‌ की पेशवाईत  रे?....!! साल्या कधी झाडणाराय्‌स ही डोंक्यातली जळमटं?.....आणखी एक असं बघ विन्या......", शर्‍यानं वाक्य अर्धवट सोंडून आक्रमक पवित्रा घेंतला.
"काय......कसं बघूं.....? इथं वात्रटपणा चालणार नाही शर्‍या....!!", विनोबांनी तंबी भंरली.
तशी शर्‍यानं दुसरी टांग मारली," विन्या...अरे खुद्द पेंशव्यांना तरी ’यवनी’ कुठं वर्ज्य होत्या ?.......ओं ?" !!!
खुद्द सौ. विद्यावहिनीनीच आतां कपाळाला हात लावला !!.....अन्‌ त्या ही गंभीर होत गप्प झाल्या......
रिंगणांत फक्त शर्‍या अन्‌ विनोबा दोंघेच उरले......
अन्‌ निर्वाणीची खडाजंगी सुरूं झाली.......

सौ. वृंदावहिनीच्या वटारलेल्या डोंळ्याकडं साफ दुर्लक्ष करीत विनोबांकडं मोहरा वळवत शर्‍या म्हणाला," विन्या लेका...... मला एक सांग."
" काय?........काय सांगूं?", विनोबा फिस्कारले
"दुधाचा रतीब कुठल्या डेअरीचा घेतोस तूं ?", शर्‍या.
विनोबा उत्तरले," अर्थात्‌ चितळे डेअरी !!......., अशी घट्ट दाट साय दुसर्‍या कुठल्याच डेअरीच्या दुधावर येत नाही."
म्हणजे विनोबांनी आपलं मात्रागणित इथंही अगदी घट्ट जुळवलेलं होतं तर.....!!
शर्‍यानं आतां मांजा गुण्डाळायला सुरुवात केली," अगदी बरोबर बोललास बघ विन्या.........
आतां असं सांग.....किती वर्षं चितळे डेअरीचं दूध पितोय्‌स तूं?"
"अगदी आंठवीत असल्यापासून....,", विनोबा," वीसएक वर्षं तरी झाली असतील....."
"म्हणजे हयातभर चितळ्यांच्या दुधावरच तुझा पिण्ड पोसलाय्‌ म्हण की...........बरोबर?", शरदराव.
" त्याचा इथं काय संबंध?", विनोबा उसळले," इथं आत्तां स्वयंपाकीणबाईचा विषय चालालय्.......‌"
" संबंध नाही कसा विन्या?", शर्‍यानं विनोबांना चितपट धोंबीपछाड मारली," आतां असं सांग....
तुला कुठल्या दीडशहाण्यानं सांगितलं, की चितळ्यांच्या म्हशीसुद्धां ’एकारान्ती’ च आहेत म्हणून ?" !!!!

माझ्या दिवाणखान्यात दिवाळीचा आप्पटबार फुटला....!
सौ. वृंदा-सुमीताही गंदगंदून हंसायला लागल्या.....!!
सौ. विद्यावहिनी तर खो खो हंसायला लागल्या.......!!!
मी पोटांत कटाक्षानं दांबलेलं हंसूं पण कारंज्यागत फुसांटून ओंठावर उसळलं.....!!!!
खुद्द विनोबाच आवाक्‌ होत डोंळे विस्फारून शर्‍याकडं बघायला लागले.........
अन्‌ दुसर्‍या क्षणीं स्वतःच्या कपाळाला हात लावत फातिमाबाईनां होकार भंरून मोकळे झाले. !!!!!


******************************* 

रविशंकर.
१४ नोव्हेबर २०१३. 

No comments:

Post a Comment