Search This Blog

Wednesday 2 January 2019

॥ मूलपिण्डोऽबाधितः ॥









"शुभप्रभात वैद्यबुवा...नमस्कार..." मी डॉ. कर्नाटकी च्या मेजावर टकटक करीत म्हटलं
" ये ये नाना...बस बस... ...जरा एक मिनिट थांब बरं कां... ...हे एव्हढं टिपण पुरं करून बघतोच तुझ्याकडं...काय?
इतकं बोलून डॉ. अजित कर्नाटकी ऊर्फ 'आज्या' नं पुढ्यातल्या गलेलठ्ठ पुस्तकांत पुनश्च डोकं खुपसलं...
त्याच्या हातातली लेखणी समोरच्या वहीतल्या पानावर सुबक अक्षरात टिपण काढूं लागली... ...
अन्‌ मी समोरच्या खुर्चीत बसकण मारीत मख्खपणे त्याच्याकडं बघत बसलो.......

१९९८ सालच्या हेमन्त ऋतूतल्या गुलाबी थण्डीचे दिवस होते...वार रविवार.
तसं म्हटलं तर आज 'आज्या' चा आठवड्याच्या सुटी चा दिवस...सकाळी आठ - साडेआठ वाजेपर्यंत लोळत पडण्याचा...
तथापि मी आदल्या रात्री च दूरध्वनी करून त्याला 'उद्या सकाळी तुझ्या दवाखान्यात भेंटूं' असा निरोप दिलेला असल्यामुळं स्वारी भल्या सकाळीच अंघोळ बिंघोळ उरकून, दवाखान्यात येऊन बसलेली होती... ...
हा अजित कर्नाटकी म्हणजे पक्का कानडीअप्पा... ...
इयत्ता पांचवी ते प्रथम वर्ष बी.एस्सी. म्हणजे तब्बल नऊ वर्ष विद्यार्थी दशेत आम्ही एकमेकांबरोबर काढलेली असल्यामुळं आमची दोस्ती होती म्हणण्यापेक्षां लंगोटीयारी होती असं म्हणणं अधिक उचित ठरेल.
त्याची बायको - म्हणजे सौ. अलका वहिनी - पण धारवाडच्या. त्यामुळं घरादारातला खाक्या पक्का कर्नाटकी...आणि म्हणून आम्हां चौघांचं ( आमच्या सौ. सुमीता - ऊर्फ इंदिराजी - धंरून ) अगदी तहहयात दाट मेतकूट जमलेलं होतं.
प्रथमवर्ष बी. एस्. सी. नंतर मी जीवविज्ञानाशी फारकत घेऊन अभितयांत्रिकीची धुरा उचलली, तर आज्या चा गणिताशी छत्तीस चा आंकडा असल्यामुळं त्यानं गणिताला घटस्फोट देऊन जीवविज्ञानाशी लग्न लावलं, आणि वैद्यकीला प्रवेश घेतला.
तश्यात ह्या आज्या ला वैद्यकी व्यतिरिक्त इतर अनेकविध छन्द होते म्हणून आमच्या लंगोट्या जरा ज्यास्तच घट्ट जखडलेल्या असाव्यात. त्यातलाच एक ( माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा) छन्द म्हणजे त्याला असलेला संस्कृत भाषा आणि तत्त्वज्ञानतला रस... ...बस्स् आणखी कश्याची फोडणी लागते मैत्रीचं खमंग थालीपीठ जमायला?
फक्त ह्या आज्या चा एकच गुण खटकणारा होता... ...तो म्हणजे पराकोटीचा फंटकळपणा, आणि उघडं-नागडं सडेतोड बोलणं.
पण आमच्या लंगोटियारी च्या आड त्याचा फटकळपणा कधीच आला नाही, कारण त्यामागचा त्याचा प्रामाणिकपणा आणि समोरच्या माणसाच्या भल्याची त्याला वाटणारी कळकळ मला पुरती ठाऊक होती, आणि सौ. इंदिराजींबरोबरचे अनुभव जमेला धंरून, मी त्याच्या फंटकळ बोलण्याकडं दुर्लक्ष करायला शिकलेलो होतो... ... 

अजित दोनचार मिनिटांनी लेखणी समोरच्या वहीवर ठेंवीत पुसता झाला" हं बोल नाना... ...कसला किडा चांवला तुला काल रात्री...ऑं?...जरा बघूं दे मला... ..."
मी,"कसला किडा?"
अजित," किडा नाही चांवला?... ...मग साल्या, माझ्या साखरझोंपेचं खोबरं करून कश्याला फरपटलंस मला इथं?"
मी," सांगतो... ...त्याचं काय आहे... ...की..."
अजित," त्याचं कांहीही नाहीय्... ...समजलं?...आणि हो...इथनं बाहेर पडल्यावर अलका नं तुला धंरून घरीं फरपटत नाष्ट्याला आणायला सांगितलंय्... ...तेव्हां"
मी," अरे पण इंदिराजी फांडून खातील मला... परस्पर गायब झालो तर...त्याचं काय?"
अजित,"तूं यायच्या आधीच तुझ्या इंदिराजी नां फोन करून मी माझ्या घरीं बोलावून घेतलंय्... ...नाष्ट्याला... ...काय?"
मी,"म्हणजे नाष्टा खायला घालून अलका वहिनींच्या देखत माझी बिन पाण्यानं झालेली बघायची आहे म्हण की तुला... ..."
अजित,"मऽऽऽऽऽऽऽग? उट्टं नको काढायला वाजवून?"
मी पांढरं निशाण बाहेर काढलं," ठीकाय् बाबा... ...बघ मजा माझी... ...पण आत्तां ऐकशील काय कश्यासाठी आलोय् ते?"
अजित,"हीः हीः हीः हीः हीः हीः ... ...बोला नानासाहेब..."
मी," अति गुप्ततेचं वचन हवंय् मला... ...म्हणजे..."
अजित," म्हणजे 'अलका-इंदिरा आणि कं' ला कसलाही थांगपत्ता लागतां कामा नये... ...असंच ना?... ...ठीकाय्...दिलं वचन... ...हं बोल आतां... ...काय बिघडलंय् तुझं?"
मी," मला थोडसं जाड व्हायचंय्... ... ..."
अजित,"काऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽय?"
मी," म्हणजे थोडंसं गुटगुटीत आणि गाल-बिल जरा वर यायल हवेत मला...तेव्हां एखादी गोळीबिळी लिहून दे बघूं जाड व्हायला पट्‌दिशी... "
आज्या तसा फंटकळच,"हे कसले भिकारलक्षणी डोहाळे लागले तुला आतां?... ...ऑं?
आणि आतां चाळिशीत गाल गुबगुबुबीत कश्याला रे व्हायला हवेत तुला? की वहिनी नां आतां गालगुच्चे घ्यायला सांगणाराय्‌स?... ...तब्येत बिब्येत बरी आहे ना तुझी?"
मी," हे बघ आज्या...साल्या आरश्यासमोर उभा राहिलो ना, की हे बसके गाल आणि सपाट ढेरी बघायचा कंटाळा आलाय् मला... ...
तेव्हां ढेरीबाबाही जरा वर येईल असा एखादा जमालगोटा लिहून दे बघूं झंटक्यात...काय?"
अजित,"डोकं ठिकाणावर आहे ना तुझं नाना?... ...अरे सुसाट सुटलेलं अंग चंवळीच्या शेंगेसारखं बारीक करायला हल्ली जिवाचा आटापिटा करतात लोक... ...
लठ्ठपणानं गांजलेले डझनावारी लोक (विशेषतः बायका), 'बारीक व्हायच्या रेसिपीज्' विचारायला इथं येऊन दररोज डोकं पिकवतात माझं... ... आणि तुझं बघावं तर गिअर उलटा पडलेला दिसतोय्... ...
भूक-तहान कांही कमी झालीय् काय तुझी?"
मी,"छे...छे...छे... ...तहान-भूक अगदी मस्त आहे... ...रोज चार वेळा अगदी व्यवस्थित खातो-पितो की मी...तरी पण ढेरी आणि गाल कांही बाळसं धरीना झालेत... म्हणून... ..."
अजित,"आणि झोंप?"
मी,"अगदी छान लागते... ...इंदिराजी म्हणतात 'ओंडक्यासारखे झोंपून लोळत पडूं नकां सकाळी' म्हणून."
अजित,"व्यायाम करतोस काय रोजच्या रोज?"
मी,"म्हणजे काय?...सकाळी पेलाभर गरम पाणी प्यालो, की पहिल्या प्रथम तीस-पस्तीस मजले चढ उतार करतो... ...मग स्नायु तांणण्यासाठी वीसएक मिनिटं योगासनं, आणि नंतर मग सकाळचा पहिला चहा. असा रोजचा परिपाठ असतो माझा..."
अजित,"जरा इकडं वजनकाट्यावर उभा रहा... ... बघूं या वजन किती आहे ते... ...अरे वा...सहासष्ट किलो?... ...झकास...!!"
मी,"कसलं डोंबलाचं झकास?...माझ्या उंचीला - म्हणजे १८२ सें. मी. उंचीला - तुझ्या शास्त्रानुसार किती असायला हवं माझं वजन?"
अजित,"साधारण सत्तर ते शहात्तर किलो म्हणजे उत्तम म्हणतां येईल... ..."
मी मग आज्या ला कंचाट्यात धंरला,"तूंच बघ... ...मी सांगतोय् ना, की जरा जाडी वाढायला हवीय् म्हणून?"
आज्या नं आतां कपाळाला हात लावला,"अरे बाबा माझ्या... ...वजन सरासरीपेक्षां थोडसं कमी असणं, हे ते ज्यास्त असंण्यापेक्षा केव्हांही उत्तमच असतं... ...एकदां कां वजन वाढायला लागलं ना, की मग ते आंवरणं कर्मकठीण... ...तेव्हां आहे हे अगदी झकास आहे नाना तुझं... ..."
मी," तरी पण... ..."
आज्या नं माझा 'तरी पण' उडवून लावीत म्हटलं,"हे बघ नाना... ...तुला तत्त्वज्ञानांत सांगतो म्हणजे पटेल... ..."
मी कान टंवकारले...
आज्या,"ते सुभाषित तुला माहीत असेलच... ...
मी,"कुठलं सुभाषित?"
अज्या," ।। आशा नाम्ना मनुष्याणां विचित्रा पदशृंखला   
       तेन बद्धार्प्रधावन्तिर्मुक्तास्तिष्ठन्ति मेरुवत्‌ ।।

तेव्हां तूं ह्या जाड व्हायच्या आशेला लागलेला असाल्यानं तुझी अशी गोची झालेली आहे... ...!!
आतां असं बघ की तुझ्या घराण्यात सगळ्यांचाच पिण्ड सडपातळ अंगकाठीचा आणि उंची ज्यास्त, असा आहे...होय ना? तुझे आई वडील, सख्खी भावण्डं यांच्यात कुणीही जाडही म्हणतां येणर नाहीत इतके सगळे सडपातळ आहेत... ...बरोबर? तात्त्पर्य, जाड-बारीक असणं हे बर्‍याच अंशी आनुवंशिक आणि नगण्य प्रमाणांत माणसाच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं...तुला कधी थंकवा-बिकवा, किंवा निरुत्साह जाणवतो काय?...नाही ना? आणि हे बघ...एकदां कां जाडी वाढायला लागली, आणि आंवरली नाही ना, तर मग तज्जन्य सगळ्या कटकटी कायमच्या मागं लागतील तुझ्या... ...आहे ते झक्क आहे अगदी...तेव्हां हे जाड व्हायचं खूळ ताबडतोब डोंक्यातनं काढून टाक...म्हणजे मेरुवत् स्थितप्रज्ञ होशील... ...!! काय?"
मी," मग तुझ्याकडं कश्याला भल्या सकाळी तडफडलो इथं?... झक् मारायला?... ...ते कांही नाही... ...अगदी थोडं कां होईना, पण जाड व्हायचंय्‌ मला... ...
आमच्या इंदिराजी बरोबर रस्त्यातनं चालत निघालो नां कुठं, की अगदी १० चा आकडा दिसत असणार आमची जोडी म्हणजे... ...ते कांही नाही... ...औषध लिहून दे झंटक्यात, म्हणजे मी निघालो."
झालं... ...मी असा हट्टाला पेंटल्यावर आज्या च्या कपाळावर मधोमध एक सूक्षम आंठी पडली... ...एक क्षणभरच...
मग दुसर्‍या क्षणीं त्यानं चुटकी वाजवत समोरचं बाड पुढ्यात ओंढलं... ...त्यातल्या वरच्या कागदावर कांहीतरी खरडलं...
मग त्या कागदाची घडी घालून तो एका लखोट्यात बन्द करून लखोट्याचं तोंड डिंकानं चिकटवलं, आणि लखोटा माझ्या हातात देत म्हणाला
,"ठीकाय् तर नाना... ...होऊं दे तुझ्या मनासारखं... ...हे औषध लिहून दिलंय् मी... ...फक्त हा लखोटा वहिनी कडं पोंचवायचा, की तुझं काम झालंच म्हणून समज....
मात्र एक च अट आहे... ..."
मी," आतां कसले फाटे फोंडायला लागलाय्‌स तूं ?"
अजित मख्ख चेंहरा करून म्हणाला," अरे बाळसं वाढवण्यासाठी तुला करण्यासारखं कांहीच नाहीय् ह्या त... ...जे काय करायचं आहे ना, ते तुझ्या सौ. इंदिराजीना च करावं लागणार आहे...!! ... ...काय?
तेव्हां हा लखोटा असाच्या असा सीलबन्द अवस्थेत सौ. इंदिराजींच्या हातात नेऊन ठेंवायचा... ...अजिबात न फोंडता... ...कळलं नीट?"
मी,"अरे पण मी अट घातली होती ना, की ' अलका-इंदिरा आणि कं.' ला ह्यातलं कांही कळतां कामा नये म्हणून?... ...त्याचं काय?"
अज्या डोंळे मिचकावत म्हणाला,"अरे बाबा ती च तर गोची आहे ना... ...अलका राहूं दे बाजूला एकवेळ, पण तुझं बाळसं वाढवायला तुझं औषधपाणी-खाणंपिणं वगैरे तुझ्या इंदिराजीनाच सांभाळायचं आहे ना? त्या देतील ते खाण्यापिण्याशिवाय तुला स्वतः करण्यासारखं असं कांहीच नाही ह्यात... ...तेव्हां हा लखोटा फक्त इंदिराजी ना नेऊन देणे... ...अजिबात न उघडतां...समजलं सगळं?
आणि कांही काळजी करूं नकोस साल्या... ...अलका ला  यातलं अवाक्षरही कळणार माही... ...मग तर झालं ना?"
इतकी हमी दिल्यावर मात्र मग मी आज्या ची खनपटी सोंडून लखोटा खिश्यात कोंबत त्याला धन्यावाद दिले,"थॅंक्स् आज्या... ..."
आणि 'चबी चीक्स्' च्या ढगावर तरंगायला लागलो... ...
," तेरी थॅंक्स् को मारो गोली...चल लवकर आतां... ...पोंटात कावळे कोंकलायला लागलेत माझ्या... ...अलका वाट बघत असेल घरी आपली" म्हणत आज्या नं मग दवाखाना गुंडाळून मला त्याच्या गाडीत कोंबला, अन् स्टार्टर मारून गाडी त्याच्या घराकडं दामटली...

सौ. इंदिराजी तिथं आधीच येऊन ठेंपलेल्या होत्या...
सौ. अलका वहिनी आणि इंदिराजींची भोजन मेजावर गरम गरम वाफाळलेल्या इडल्या-वडे आणि नारळाच्या चटणीची माण्डामाण्ड करायची लगबग चाललेली होती... ...
मग काय... ...बाह्या सरसावत आम्ही सगळेच त्या थाळ्यांवर तुटून पडलो.
आश्चर्य म्हणजे गप्पाटप्पात आज्या च्या बोलण्यात माझ्या 'बाळसे हट्टा' चा पुसटसा देखील उल्लेख आला नाही... ...त्यानं त्याचा शब्द तंतोतंत पाळलेला होता.
नाष्टा-गप्पाटप्पा वगैरे उरकून मी आणि सौ. इंदिराजी मंडई कडं सुटलो, आणि भाजीखरेदी उरकून जेंवायच्या वेळेला घरीं परतलो.
भोजन झाल्यावर मग मी हंळूच आज्या नं दिलेला लखोटा सौ. इंदिराजीं च्या हातात ठेंवला... ...
सौ. इंदिराजीं च्या कपाळावर एक सूक्षम आंठी पडलीच,"हे काय आहे?"
मी टांग मारली,"अगं सकाळी फिरायला गेलो होतो ना, तेव्हां आज्या दवाखान्यात आलेला सापडला, म्हणून सहजच डोंकावलो. तर बोलतं बोलतां म्हणाला की माझी तब्येत जरा रोडावलेली दिसतीय् म्हणून‌... ..."
सौ. इंदिराजी नी तोंफ डागली,"तब्येत रोडावायला तुम्ही कधी दारासिंग दिसत होता?... ...ऑं?"
मी,"अगं तसं नव्हे गं... ...त्याला लक्ष्यांत आलं असावं म्हणून 'भूक-झोंप नीट आहे ना?' म्हणून विचारत होता. आणि कसलंरतरी शक्तिवर्धक पण लिहून दिलंय् वाटतं त्यानं... ...म्हणाला की 'हा लखोटा फक्त सुमीता च्या हातात दे... ...ती करील सगळं व्यवस्थित' म्हणून... ...बघ तरी काय औषध लिहून दिलंय्‌ त्यानं ते?"
सौ. इंदिराजी,"कांहीतरी थापा मारूं नकां मला... ...ही तुमचीच कांहीतरी नवीन शक्कल दिसतेय्... ...लोकांच्या तब्ब्येतींवर पुरुषां चं असं बारीक लक्ष असत नाही कधी... ...तुम्हीच कांहीतरी नवीन खूळ डोंक्यात घेऊन गेला असाल त्यांना पिडायला... ..."
असं करवादत सौ. इंदिराजी नी लखोटा टंरकावत आतला कागद बाहेर काढून वाचला... ...
अन् कपाळाला हात लावत पोंट धंरधंरून फिदीफिदी हंसायला लागल्या... ... ...!!!
मी चक्रावलो... ...,"काय झालं काय असं दात काढायला तुम्हांला?"
सौ. इंदिराजी नी खोः खोः खोः खोः करीत तो कागद माझ्या हातात कोंबला,"मी म्हटलं नव्हतं, तुमचाच कांहीतरी आचरटपणा असणार म्हणून?....
हीः हीः हीः हीः हीः ... ... बरी खोड तोडली भावजीनीं... ...हे बघा."
मी कागद सौ. इंदिराजींच्या हातातनं हिसकावून घेत वांचायचा चष्मा डोंळ्यावर चंढवला, आणि त्यावर नजर टाकली...
आणि 'आज्या' ला लाखोली वाहत कपाळावर हात मारून घेतला... ...!!
कागदावर आज्या च्या वळणदार फर्ड्या मराठीत लिहिलेलं होतं...
------------------------------------------------------
श्री. रविन्द्र शं. नानिवडेकर.
' मानसोपचार तज्ञाला ताबडतोब दांखवून त्याच्या सल्ल्यानुसार पुढील औषधोपचार करणे ' .......!!!
-- सही
डॉ. अजित रा. कर्नाटकी.
------------------------------------------------------
त्यानंतर पुढं महिनाभर तरी मी आज्या बरोबर संपर्क ठेंवला नाही... ...!!
आणि 'बाळसे हट्ट' आपोआपच माझ्या डोंक्यातनं हद्दपार झाला... ...
पण त्या हट्टाची हद्दपारी अल्पजीवीच ठरणार होती हे विधिलिखित मात्र आमच्यापैकी कुणालाच तेव्हां ठाऊक नव्हतं... ...

झालं असं की, पुढं दोनतीन आठवड्यातच मराठवाड्यातल्या किल्लारी नांवाचं खेडेगाव अपरात्री आठ रिश्टर स्केल च्या भूकंपानं हादरलं आणि अक्षरशः जमीनदोस्त झालं... ...
अवघ्या भारतभरातनं दशदिशांनी... अगदी परदेशातनं सुद्धां ... किल्लारी कडं मदतीचे लोंढे दुथडी भंरून वाहूं लागले... ...
आणि एक दिवस माझ्या टाटा मोटर्स मधल्या वरिष्ठांनी मला पाचारण करून सांगितलं की, 'टाटा उद्योगसमूहाला लातूर-उस्मानाबाद हमरस्त्यालगत सरकारनं दहा एकर जमीन भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. टाटा हाउसिंग् डेव्हलपमेण्ट् कॉर्पोरेशन ह्या आपल्या समूहातल्या कंपनीवर, त्या जागेत जवळपास दीडएकशे घरं अणि चार किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते बांधून भूकंप पीडितांसाठी एक छोटसं गांव मोफत बांधून द्यायची जबाबदारी आलेली आहे. पण टी. एच्. डी. सी. कडं हया प्रल्कपाचं नियंत्रण करण्याइतके अनुभवी तज्ञ अभियन्ते नाहीत. तेव्हां असं ठरलं आहे की, आपल्या उद्योग समूहातील टाटा स्टील, टाटा पॉवर, आणि इतर कंपन्या त्यांच्यातर्फे वरिष्ठ अभियन्ते पुरवणार आहेत, आणि प्रकल्प व्यस्थापक-नियन्त्रक आपल्या कंपनीतून आळीपाळीनं पाठवायचा आहे.
प्रकल्पाचा सर्व आर्थिक भार टी. एच्. डी. सी. नं उचलेला आहे, तसंच त्यांचे अभियन्ते ही कनिष्ठ पातळीवर काम करायला हाताशी असणार आहेतच. प्रकल्प व्यवस्थापक थेट टी. एच्. डी. सी. चे मुख्य अभियन्ता, आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचना-निर्देशांनुसार काम करील. टी. एच्. डी. सी. नं लातूर मध्येच प्रकल्प नियंत्रण कार्यालय एका आरामशीर निवासी हॉटेलात उघडलेलं आहे. तिथंच प्रकल्पावर काम करणार्‍या सगळ्या कर्मचार्‍यांची निवास-भोजन व्यवस्था केलेली आहे. प्रकल्पाच्या जागांवर जा-ये करायला दोन जीप्स् आणि स्थानिक चालक नेमलेले आहेत. प्रकल्पाचं जमिनीच्या पातळ्या मोजणीचं प्राथमिक कामही गेल्या आठवड्यात सुरूं झालेलं आहे. तेव्हां हे आव्हानात्मक काम हाताळायला तुम्हांला पुढील चारपांच दिवसांत लातूरला जाऊन या प्रकल्पाचा ताबा घ्यायचा आहे... ...मला खात्री आहे की तुम्ही हे काम नक्कीच उत्तम प्रकारे पार पाडाल... ...तेव्हां बेस्ट् लक्... ...तुमचं लातूर गाडीचं आरक्षण झालं, की मला सांगा.'

तसं म्हटलं तर 'भूकंपग्रस्त पुनर्वसन' या विषयातला पूर्वानुभव आमच्या खात्यातल्या कुणालाच - अगदी आमच्या विभागप्रमुखांना देखील - नव्हता. तेव्हां ते नवीन आव्हानात्मक काम मी आनंदानं स्वीकारलं.
जवळपास एक वर्षभर बदली म्हटल्यावर सौ. इंदिराजी नी जरा कुरकुर केलीच, पण त्याही अखेरीस राजी झाल्या, आणि मी डिसेंबर च्या अठ्ठावीस तारखेला पुण्याहून लातूर ला दाखल झालो.
टी. एच्. डी. सी. नं सगळी व्यवस्था खरोखरीच उत्तम केलेली होती, त्यामुळं ती विवंचना उरायचं कांहीच कारण नव्हतं.
लातूरला गेल्यावर विविध कंपन्यातल्या भारतभरातनं आलेल्या सहकार्‍यांच्या ओंळखी-पाळखी पहिल्याच दिवशी पार पडल्या. सुरुवातीला सहकारी, प्रकल्प व्यस्थापक म्हणून माझ्याबरोबर वीतभर अंतर राखून बोलायचे, पण माझ्या गप्पिष्ट स्वभावामुळं पुढील चारदोन दिवसांतच तो दुरावाही गळून पडला, आणि एकूणच प्रकल्पाचं काम आतां वेग घेणार असं आतनं वाटायला लागलं न लागलं तोंच पांचव्या दिवशीच किल्लारी-राजेगांव परिसरात प्लेग ची साथ फुटली... ...बघतां बघतां लातूर उस्मानाबाद सकट आख्ख्या मराठवाडाभर वणव्यासारखी पसरली... ...
आणि समस्त वर्तमानपत्रांत मुखपृष्ठांवर तश्या बातम्याही झंळकल्या...!!
झालं...एकच कल्ला उडाला... ...
रातोरात आमच्या सौ. इंदिराजीं चा दूरध्वनि,"ताबडतोब ऑफिसला कळवून पुण्याला परत निघून या...."
दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे टी. एच्. डी. सी.च्या व्यवस्थापकीय संचालकांचा दूरध्वनि,"मला आपल्या माणसांची चिन्ता लागून राहिली आहे...त्यांची सर्वतोपरी काळजी घेणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे... ...तेव्हां त्या दृष्टीनं तुम्हांला यत्किंचितही धोका जाणवला, तरी तत्क्षणीं प्रकल्पाचं काम थांबवायचे सर्वाधिकार मी तुमच्याकडं सोंपवतो आहे...तेव्हां कसलाही धोका पत्करायचा नाही... ...
दररोज रात्री ९ वाजतां माझ्या घरीं दूरध्वनि करून मला परिस्थिची माहिती देत चला."
दुसर्‍या दिवशी दुपारी आमच्या साहेबां चा दूरध्वनि,"तिथली एकूण परिस्थिति काय आहे? कितपत चिंताजनक आहे? टी. एच्. डी. सी. च्या वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार पुढं काय काय करायचं ते ठंरवा... ...नेहमीप्रमाणं दर रविवारी पुणे ऑफिस ला येऊन प्रकल्पाचा अहवाल सादर करा... ...इ. इ."
त्यात आणखी भर म्हणजे सरकार नं लातूर उस्मानाबाद महामार्गालगतच पत्र्याच्या टपर्‍या उभारून जे एक कामचलाऊ 'आपत्कालीन प्लेग रुग्णालय' सुरूं केलं, ते नेमकं आमच्या प्रल्कपाच्या जागेलगतच्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावरच.
आमच्या लातूरच्या मुक्कामी हॉटेलातही दिवसाआड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे लोक येऊन 'गॅमेग्झिन्' पावडर चे शिडकावे करायला लागले... ...
आमच्या प्रकल्पाच्या पंचक्रोशीत पण कांही कांही ठिकाणी प्लेग झालेले उंदीर उघड्यावर तडफडून मरतांना दिसायला लागले...
आणि आमचं सगळ्यांचं धाबं दणाणलं.
परिस्थिति आतां हाताबाहेर जाते की काय याचा मला अंदाज येई ना.
म्हणून मग मी किल्लारी-राजेगांव च्या प्रकल्पावरच्या माझ्या आणि कंत्राटदार श्री. सावरकरांच्या झाडून सगळ्या सहकार्‍यांची एक बैठक घेतली. आणि प्रत्येकाचं मत अजमावलं.
बहुतेकांचा सूर असा दिसला, की सरकारनं प्रतिबंधात्मक उपाय योजना कार्यान्वित केलेल्या आहेतच, तेव्हां रेंटतां येतंय् तोपर्यन्त काम चालूं ठेवूं, कारण आत्तांआत्तांच जोर पकडलेलं काम पुनश्च हरि ॐ करून आत्तांचा वेग पुनश्च पकडेतोंवर कांही महिने तरी वाया जातील.
अजून तरी आपल्या किल्लारी आणि राजेगांव च्या प्रकल्पावरचा कुणीही माणूस प्लेग नं बाधित झालेला नाही... ... आणि तसं कांही झालंच तर मग ताबडतोब काम थांबवून सागळ्यांना आपापल्या गांवी रवाना करूं, आणि तसं सगळ्या संबंधितांना पण कळवून टाकूं या म्हणजे झालं.
तात्पर्य, सगळ्यांनी प्रकल्पाचं काम थांबवायचं का? आणि कधी? या बाबतीतला निर्णय माझ्यावर सोंपवला.
दुसर्‍या दिवशी मी सगळ्या वरिष्ठांना ( सर्वप्रथम सौ. इंदिराजी ना ) दूरध्वनि करून 'सगळं आलबेल' असं कळवून टाकलं... ...
आणि प्रकल्पाचं काम तसंच पुढं चालूं ठेंवलं... ... ...
दिवस सरत होते.
प्रकल्पाचं काम वेगात चालूं होतंच पण आसपासच्या इतर कंपन्यांच्या प्रकल्पापेक्षां कितीतरी पुढं गेलं होतं... ...
या सगळ्या गदाड्यात सौ. इंदिराजीं च्या,'दर दिवसा आड मला फोन करून खुशाली कळवत जा' या तंबी चा मला चक्क विसरच पडला.
आणि साधारण पंधरवड्यानंतरच्या एके दिवशी संध्याकाळीं आम्ही कामावरून आमच्या हॉटेल वर परत आलो तर काय...
दस्तुरखुद्द सौ. इंदिराजी च स्वागतकक्ष्यांत आमची वाट पहात बसलेल्या दिसल्या...!!
सोबत त्यांनी 'आज्या' ला पण गचांडी पकडून फंरपटत आणलेला होता... ...बरोबर असलेला बरा म्हणून...!!!

त्या दोघांना तिथं बघून मी सगळ्यांच्या देंखत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
'आज्या' सोबत होता म्हणून, नाहीतर सौ. इंदिराजीं च्या 'मुल्क-ई-मैदान' चा तिथंच धंडाका उडाला असता.
गंमत म्हणजे मला बघून आज्या आणि सौ. इंदिराजी दोघंही आपापल्या कपळांना हात लावून फिदीफिदी हंसायला लागले... ...!!!
मी चक्रावलोच,"काय रे बाबानों...असं फिदीफिदी हंसायला काय झालंय् तुम्हाला... ...ऑ?"
सौ. इंदिराजी नी तोंड उघडायच्या आतच आज्या म्हणाला," काय झालंय् ते खोलीत गेल्यावर सांगतो... ...पण आधी आमच्या चहापाण्याची कांहीतरी व्यवस्था करशील की नाही साल्या?
सलग दहा तास अखण्ड बस प्रवास करून अंग अगदी आंबून गेलंय्... ..."
मी मग लॉज च्या व्यवस्थापकाला सांगून आज्यासाठी माझ्या खातीं एक खोली घेतली...तीत आज्याबरोबर माझ्या सहनिवासी मित्राला जोडून दिलं आणि आमची खोली मी व सौ. इंदिराजी साठी मोकळी करून घेतली. इतकं झाल्यावर मग तळमजल्यावरच्या भोजन कक्ष्यांत दोघांना घेऊन गेलो आणि पोंटभर खाऊं घातलं... ...
कॉफी चे कप समोर आल्यावर मग मी आज्या ला छेडलं," हं...बोल आतां... ...असे आचानक कसे काय आलात इथं? मला आधी कळवायचं तरी? आणि मघांशी मला बघून असं फिदीफिदी हंसायला काय झालं तुम्हां दोघांना?"
आज्या सौ. इंदिराजी कडं निर्देश करीत म्हणाला," अरे बाबा... ...तुझा पंधराएक दिवस दूरध्वनि आलाच नाही ना, तेव्हां ह्या नी लातूर ची आरक्षणं आधी करून मगच फतवा काढला की दोन दिवस लातूर ला जाऊन यायचं...म्हणून आलो... ...काय करणार?"
मी," 'काय करणार?' म्हणजे काय?"
अज्या,"अरे बाबा, मला सांग आपल्या अखिल भारतात इंदिराजीं पुढं कुणाचं कांहीतरी कधीतरी चाललंय् काय... ...ऑं?...आलो फरपटत नी काय?"
आतां मी सौ. इंदिराजी कडं मोर्चा वळवला,"आणि असं बत्तिशी दाखवायला काय झालं होतं तुम्हां दोघांना मघाशी?"
सौ. इंदिराजी नी फिसफिसत त्यांची हुकुमी धोबीपछाड मारून मला चितपट लोळवला,"आरश्यात बघतां ना रोज स्वतःला?... ...कसले टाम्‌ टुम् झालाय गेल्या दोन महिन्यांत इथं आल्यापास्नं...माहीताय्? जराशी ढेरीही फुगलेली दिसतेय् तुमची... ...म्हणून हंसायला आलं मघांशी... ...कळलं?"
मी,"काय रे आज्या, तुला पण मी जाड झाल्यासारखा वाटतोय् काय?... ...नाही म्हणजे तूं पण दात काढत होतास मघांशी... ..."
मला मध्येच तोंडत आज्या चीत्कारला,"साल्या जाड कसला, चांगला गरगरीत झालाय्‌स प्लेग ग्रस्त लातूर मधलं खाणंपिणं हादडून...पाच एक किलो तरी वजन वाढलेलं असावं तुझं... ...
याचसाठी माझ्या खनपटीला बसला होतास ना, इकडं यायच्या आधी?... ...लातूर चं हवा पाणी मानवलं साल्या तुला, म्हणून मघांशी हंसूं फुटलं आम्हांला तुला बघून... ..."
लॉज च्या स्वागतकक्ष्यातच वजनकाटा होता. आम्ही तिघांनीही तिथं जाऊन माझं वजन करून बघितलं...तर खरोखरच ते सहा किलो नी वाढलेलं होतं...!!"
आतां मात्र मी पुनश्च माझ्या कपाळाला हात लावला...
आणि सौ. इंदिराजीं ची 'मुल्क-ई-मैदान' धंडाडली,"मी घरीं आजन्म तेलातुपातलं साजूक खाणंपिणं - मटण बिर्याणी सकट - खाऊं घातलेलं ह्यांच्या अंगाला लागलं नाही, आणि इथल्या प्लेगग्रस्त वातावरणातलं कदान्न अन्‌ गढळ पाणी कसं मानवलंय् बघताय् ना भावजी?... ...ह्यांचं नशीबच असलं इदरकल्याणी, त्याला ती महालक्ष्मी तरी काय करील?...कपाळ?"
मी ही आतां बुचकळ्यात पडलो,"खरंच आज्या, माझा विश्वास च बसत नाहीय् ह्यावर... ...असं कसं काय होऊं शकतं?"
आज्या,"हे बघ नाना, कुणाला काय न् कधी तब्येतीला मानवेल, हे वैद्यकशास्त्राला ही अचूकपणे सांगतां येत नाही... ...तेव्हां मी काय बोलणार यावर?"
आतां सौ. इंदिराजी संरसावल्या,"पण मी सांगते ना... ...ह्यां चं त्या राजाच्या भिकारीण पट्टराणी सारखं झालंय्... ..."
मी उसळलो,"म्हणजे?... ...काय म्हणायचं काय आहे तुम्हांला?"
सौ. इंदिराजी,"सांगते...
एक चक्रवर्ती राजा होता. तो एके दिवशी सकाळी राजधानीतनं फेरफटका मारत असतांना एका मन्दिराबाहेर भिक्षा मागत बसलेली एक भिकारीण त्याच्या दृष्टीला पडली...
पाहतांक्षणीच राजा भिकारणीवर बेहद्द फिदा झाला...कारण फांटक्या वस्त्रात असली तरी भिकारीण अलौकिक 'जातीची सुंदरा होती.!!
झालं...राजानं मागचा पुढचा कांही विचार न करतां तिला रथात घालून राजवाड्यात आणली, आणि मुहूर्त बघून तिच्याशी विवाह केला...एव्हढंच नव्हे तर तिल पट्टराणीही करून मोकळा झाला... ...
भूतलावरची यच्चयावत सुखं भिकारणीसमोर हात जोडून उभी राहिली... "
आम्ही,"मग पुढं काय झालं?"
सौ. इंदिराजी,"पहिले कांही दिवस दोघांचे स्वर्गसुखात गेले, आणि दोनचार महिन्यातच राणीसाहेब खंगायला लागल्या... ...!!"
अज्या," आरं तिच्यायला... ..."
सौ. इंदिराजी," आणि सहा एक महिन्यातच पट्टराणीसाहेबा खंगून अंथरुणाला खिळल्या... ...!!!"
मी," बापरे... ...मग?"
सौ. इंदिराजी,"सांगते... ...मग राजानं सगळ्या राज्यभरातले निष्णात वैद्यराज इलाज-उपाय करायला आणले, पण कुणाच्याच औषधोपचारांनी राणीसाहेब बाळसं कांही धरेनात... ..."
आज्या आतां फिसफिसायला लागला,"म्हणजे थेट ह्या नाना सारखीच अवस्था झाली म्हणा की त्यांची... ...हीः  हीः हीः हीः ...राजवाड्यातली पंचपक्वान्नं खाऊन राणीसाहेब खंगायला लागल्या...!!!"
सौ. इंदिराजी,"ऐका तर... ...खरी गंमत पुढंच आहे... ..."
आज्या,"हं... ...बोला बोला तुम्ही...नाना कडं बिल्कुल लक्ष देऊं नकां..."
सौ. इंदिराजी,"तर झालं होतं काय, की हे सगळं रामायण सुरूं असतांना राजाचा वजीर राजधानीत नव्हता. तो परत आल्यावर त्याला हे सगळं जेव्हां समजलं तेव्हां त्यानं राजाला सल्ला दिला की,' हे सगळे औषधोपचार ताबडतोब बन्द करून मी सांगतो तेव्हढाच उपाय करून बघा... ..."
राजा,"अरे बाबा जिथं सगळ्या राजवैद्यानी शर्थीचे इलाज करून हात टेंकलेत, तिथं तुझं डोकं चालवून काय होणाराय्?"
वजीर,"महाराज, फक्त मी सांगतो तेव्हढं करा... ..."
राजा,"त्यानं काय होईल?"
वजीर,"राणीसाहेब पंधरवड्यात टमटमीत होतील... ...!!!"
राजा,"काय सांगतोस काय?"
वजीर,"अगदी शंभर टक्के... ...खात्री आहे मला... ..."
राजा,"आणि तसं नाही झालं तर?"
वजीर,"महाराज, मी सांगतोय् तसं च होतंय् की नाही ते स्वतःच बघा...आणि तसं नाहीच झालं, तर वजीराचं पद मी सोडून देईन."
राजा,"टीकाय्... ...बोल, काय उपाय करायचा?"
वजीर,"सर्वप्रथम राणीसाहेबांचं पंचपक्वान्नांचं खाणंपिणं बंद करून टाकायचं, आणि त्यांच्या महालातल्या कोनाड्यात, वळचणीत, सांदी-सपाटीत वाळक्या भाकर्‍या, सुललेला मिरच्यांचा ठेंचा, आणि गूळ वगैरे पदार्थ जागोजागीं पेरून ठेंवायचे..."
राजा,"बाबा रे, आधीच त्यांचा अस्थिपंजर झालाय्... ...तश्यात हे असलं कांहीतरी करून त्यांचं कांही बरं वाईट झालं म्हणजे?"
प्रधान,"तसलं कांऽऽऽऽऽऽहीही होणार नाही... ...दुसरं म्हणजे आठवड्यातनं दोन तीन दिवस, एक वेळ सारे कोनाडे वगैरे खडखडीत रिकामे ठेवायचे... ...त्यात कांहीही खाद्य-पेय ठेंवायचं नाही...
थोडक्यात राणीसाहेबांना दर एक दोन दिवसाआड दिवसातनं एक वेळ कडकडीत फांके पडले पाहिजेत... ...!!"
राजा,"हे बघ बाबा, ही तुझी विषाची परीक्षा घेऊन राणीसाहेबांचं कांही बिघडलं ना, तर थेट सुळावर चंढवीन मी तुला... ...समजलास?"
वजीर,"मान्य आहे महाराज मला... ...!!...आणखी एक..."
राजा," आणखी काय करायचं राह्यलंय् अजून?"
प्रधान,"नीट ऐका... ...राणीसाहेबांची तमाम उंची-भरजरी वस्त्रंप्रावरणं गायब करायची, आणि त्या जागीं फांटकी-विटकी धंडोती ठेंवायची, जेणेकरून त्यांना ती च वापरावी लागतील...जमेल महाराज?"
राजा,"ठीकाय्... ...तुला इतकी खात्रीच वाटतेय्, तर हा पण एक अखेरचा उपाय करून बघूं या... ..."
प्रधान," आणि राणीवशातल्या तमाम दास-दासी नां स्वतः जातीनं सक्त तंबी देऊन ठेंवायची, की या आज्ञां चं जर कोणी उल्लंघन करील तर तत्क्षणीं त्याला किंवा तिला तोफेच्या तोंडी दिलं जाईल... ... काय?"
झालं... ...राजानं दुसार्‍या क्षणींच हरकार्‍यांना बोलावून सगळी व्यवस्था करून टाकली...
राणीसाहेबांचे हाल कुत्रं खाई ना... ...!!
धड ल्यायला चांगलं चुंगलं वस्त्र मिळेना, धड खायला-प्यायला मिळेना... ...
जे मिळेल ते शिळं-पाकं खायला लागलं, भंरीला दर दिवसाआड कडकडीत उपवास पण घडायला लागले... ... ...
आणि काय आश्चर्य...
वजीराच्या भाकितानुसार राणीसाहेबांची तब्येत झंपाट्यानं सुधारायला लागली, आणि पंधराएक दिवसात त्या अगदी पहिल्यासारख्या टमटमीत झाल्या... ...!!!"
कथेचं निरूपण करून मग सौ. इंदिराजी आज्याला म्हणाल्या,"तेव्हां ह्यां चं थेंट त्या भिकारणीसारखंच झालंय्... ...!!
घरीं तिन्हीत्रिकाळी मी रांधलेलं चमचमीत हादडून ह्यां ना कधी मानवलं नाही, आणि आतां इथलं बाजारचं निकृष्ट खाणंपिणं, आणि प्लेग दूषित पाणी पिऊन कसे टमटमीत भंरलेत बघा... ...!!!"
आतां मात्र आज्या आणि मी, आम्ही दोघांनीही आपापल्या कपाळांना हात लावले...!!
आज्या,"म्हणजे वहिनी... आपल्या व्यवहारवादी म्हणी आहेत ना,...म्हणजे 'तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच', किंवा 'कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच' इत्यादी, तसलंच कांहीतरी या नाना चं झालंय् म्हणा की."
सौ. इंदिराजी फिसफिसत उत्तरल्या,"कसं बोललात... ...अगदी हे च म्हणायचं होतं मला... ..."
आज्या नं आतां त्यावर तत्त्वज्ञाची फोडणी मारली,"खरं सांगायचं तर वहिनी, या नाना ला मी परोपरीनं सांगत होतो, की 'स्वभावान्नास्त्यौषधम्'..."
सौ. इंदिराजी,"खरंच आहे ते अगदी..."
अज्या,"अहो, ' स्वधर्मे मरणं श्रेयो परधर्मे भयावहः ' असं भगवद्गीता पण सांगते ना?... ...पण पटवून घेतलं तर तो नाना कसला?
     इथं यायच्या आधी माझ्या खनपटीलाच बसलेला होता, ' मला जाड व्हायची कांहीतरी गोळीबिळी लिहून दे' म्हणून...
     अगदी पांठ सोडी ना, तेव्हां मग मी ते तुम्हांला दाखवायला सांगितलेलं 'औषध' लिहून दिलं शेंवटी... ...हीः हीः हीः हीः हीः ...."
मी त्या दोघांचं कधीतरी पोंटभर उट्टं काढायचा निश्चय करून गप्प बसलो... ... ...!!!

होतां होतां पुढच्या सहाएक महिन्यांत आमचे किल्लारी-लातूर चे दोन्ही पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाले.
त्यांचा हस्तांतरण समारंभही एकजात सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटानं पार पडला...
आमच्या चमू चं सगळ्यानीं तोंड भरून कौतुकही केलं. भूकंपानं होरपळलेली जवळपास तीनएकशे कुटुंबं आपल्या नवीन घरकुलांत रहायला आलेली बघून आम्ही सगळे भरून पावलो... ...
आणि मी लातूर ला गेल्यास जवळपास एक वर्षभरानं पुण्याला स्वगृहीं परतलो... ...
तोपावेतों तब्येत चांगलीच भंरलेली होती...माझं 'चबी चीक्स्' चं स्वप्नं ही बर्‍यापैकी साध्य झालेलं होतं...!!
त्या खुषीत मी सौ. इंदिराजी आणि आज्या ला माफ करून टाकलं, आणि झालं गेलं विसरून गेलो... ...
पण नियतीच्या मनांत कांहीतरी वेगळंच होतं... ...
साधराण महिनाभर उलटला असेल नसेल....
एका रविवारी सौ. इंदिराजी नी वाणीसामान भंरण्यासाठी 'डी. मार्ट्' ला जायचं फर्मान काढलं, आणि दुपारीं जेवणखाण आटोपून आम्ही गाडी काढून डी. मार्ट् गांठलं.
दुपारी तीन ची वेळ असल्यामुळं डी. मार्ट् मध्ये तसा शुकशुकाटच होता.
आम्हांला बघितल्यावर डी. मार्ट् चा मॅनेजर सुब्रह्मण्यम हंसून सामोरा आला,"काय साहेब...नमस्कार वहिनी... ...बर्‍याच दिवसांनी दिसताय् इकडं..."
सौ. इंदिराजी," गेलं वर्षभर हे पुण्याबाहेर होते ना तेव्हां माझं इथं येणं दोनतीन वेंळाच काय ते झालं मुलीबरोबर...काय म्हणताय्?"
सुन्रह्मण्यमम,"कांही नाही...साहेबांची तब्येत चांगलीच सुधारलेली दिसतेय्, म्हणून आपलं हटकलं... ..."
माझ्या तब्येतीचा विषय निघतांच सौ. इंदिराजींचं लक्ष दरवाज्यातच असलेल्या वजनकांट्याकडं गेलं, अन् त्यांनी हुकूम सोडला,"चला...आधी तुमचं वजन बघूं या करून, मग करूं खरेदी काय ती."
मी,"अगं पण... ..."
सौ. इंदिराजी,"पण नाही न् बीण नाही...चला... ...रहा उभे त्या वजनकांट्यावर..."
मी निमूटपणे कांट्यावर उभा राहिलो, तर वजन भंरलं अठ्ठ्याहत्तर किलो...!!
झाऽऽऽऽऽऽलं...सौ. इंदिराजी नी आतां कपाळाला हात लावला,"अहो तुमचं वजन चक्क बारा किलो नी वाढलंय्... ...आतां आहार नियंत्रण करायला हवं..."
मी नकाराधिकार उपसला," हे बघा...माझ्या उंचीला अठ्ठ्याहत्तर किलो म्हणजे कांही बेसुमार वजन नव्हे...समजलं? तेव्हां हे तुमचं 'आहार नियंत्रण' वगैरे काय ते बासनात गुण्डाळून ठेंवा... ...ते मुळीच जमायचं नाही आपल्याला... ...सांगून ठेंवतो."
सौ. इंदिराजी उसळल्या,"कुणाला सांगून ठेंवताय्?...आणि हे...हे असंच फुगत राहून जर कांही नस्ती लचाण्डं मागं लागली, तर मग काय करायचं आपण...ऑं?"
मी,"अहो...जरा ऐका मी काय......."
सौ. इंदिराजी नी माझ्याकडं दुर्लक्ष करीत मोबाईल बाहेर काढून आज्या चा नंबर फिरवला,"मी सुमीता बोलतेय् भावजी... ...रात्री उभयतां जेवायला यायचं आहे आमच्याकडं...
...नाही नाही...तसं कांही विशेष कारण नाही... ...आपलं सहजच गप्पाटप्पा मारायला... ...तेव्हां नक्की या...आम्ही वाट बघतो...काय?...हो...हो...नाना पण घरीच असतील... ...धन्यवाद."
मी,"कळलं मला आतां... ...आज्या ला मधे घालून माझं बौद्धिक घ्यायचं आहे ना तुम्हांला 'लठठपणा निर्मित समस्या' या विषयावर?"
सौ. इंदिराजी नी लेग् कट् मारला,"चला लौकर आतां....गर्दी वाढायच्या आत खरेदी उरकून टाकूं.......कळलं?"
मी मुकाट कांखोटीला मारलेल्या रिकाम्या पिशव्या उघडल्या, आणि सामान भंरायला सुरुवात केली... ...!!

ठंरल्याप्रमाणं रात्री आज्या-अलका भोजनाला दाखल झाले...
गप्पाटप्पात मध्येच सौ. इंदिराजी नी मुख्य मुद्याला हात घातला,"भावजी... ...आपण लातूर ला गेलो होतो तेव्हां तुम्हांला मी सांगितलेली भिकारणीची गोष्ट आंठवत असेलच..."
आज्या,"होय तर...तसली फर्मास गोष्ट कशी काय विसरेल हो?... ..."
सौ. इंदिराजी,"त्या गोष्टीत राजाच्या चतुर वजीरानं जशी करामत केली ना, तसलीच कांहीतरी करामत आतां तुम्हांला करून दाखवायची आहे.!!"
आज्या आतां डोळे फांडून सौ. इंदिराजी कडं बघायला लागला," 'तसलीच कांहीतरी करामत'...म्हणजे काय वहिनी?"
सौ. इंदिराजी नी आतां ऐरणीवर निर्णायक घांव घातला,"त्या गोष्टीतल्या 'राणीसाहेब' जश्या वाळल्या होत्या ना?...त्या उलट हे आमचे 'राजेसाहेब' आतां भंरमसाठ फुगायला लागलेत... ...काय?"
मी आतां वार्‍याची दिशा ओंळखत आज्या कडं मोर्चा वळवला," हे बघ आज्या... ...हिचं कांहीही ऐकायचं नाही, आणि मनावर तर मुळीच घ्यायचं नाही... ...समजलास?...नाहीतर माझ्याशी गांठ आहे बघ."
आज्या,"अरे पण वहिनींचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकायला काय हरकत आहे रे नाना?"
सौ. इंदिराजी नी मला बोलायची संधीच दिली नाही,"तेव्हां भावजी...त्या गोष्टीतल्या वजीरा नं जशी राणीसाहेबांना गुटगुटीत बनवायची करामत करून दाखवली ना, तशी ह्या आमच्या दिवसागणिक टम्म होत चाललेल्या 'राजेसाहेबां' ना आठ पंधरा दिवसात अगदी बेतशीर सडपातळ करून दाखवायची करामत तुम्हांला करायची आहे !!! ...काय?"
मी अखेरचा प्रयास केला,"हे बघा इंदिराजी...सडपातळ व्हायचा प्रयत्न करायला, माझा लठठपणा कांही ओंसंडून वहायला लागलेला नाही...समजलं? तेव्हां मी कसलेही उपचार बिपचार करून घ्यायला तयार नाही... ...साला कधी नव्हे ते नवसासायासानं भरल्यासारखं अंग जरा भंरलंय् तर तुमचं पोंट दुखायला लागलंय काय?... ...ऑं?"
सौ. इंदिराजी नी आतां आज्याची च कोंडी केली,"हे बघा भावजी... ...हे...हे बाळसं असंच वाढत गेलं आणि त्यातनं कांही भलत्याच समस्या जर उद्भवल्या, तर त्या मला नी तुम्हांलाच  निस्तराव्या लागतील...!!... ...कारण ह्या बाबतीत आमचे वजीर तुम्हीच...!!!... ...होय ना?"
आतां खुद्द आज्या नं च स्वतःच्या कपाळाला हात लावला," अहो काय भलतंच सांगताय् वहिनी?... ...अगदी छान टुमटुमीत झालाय् की हा नाना... ...हे खूळ काढून टाका डोंक्यातनं तुमच्या...कांही होणार नाही नाना ला..."
मी लगेच आज्या ची री ओंढली,"ऐकलंत?... ...एक वैद्यकवाचस्पति च सांगतोय् की मला कांहीही होणार नाही म्हणून... ...समजलं?"
सौ. इंदिराजी नी त्यांचं प्यादं पुढं सरकवलंच,"कांही होणार नाही हे कोण छातीठोंकपणे सांगूं शकेल गं अलका?...नाहीतर मधुमेह बिधुमेहासारखं कायमचं लचांड ह्यांच्या मागं लागलं, तर काय करायचं मग?... ...ते कांही नाही...ह्यांच्या खाण्यापिण्यातलं तेल-तूप-साखर-सामिष वगैरे कटाप् करावंसं वाटतंय् मला..."
आतां मात्र मी सुद्धां कपाळाला हात लावला," हे बघा, हे असलं कांहीही चालणार नाही मला... ...अखेरचं सांगतोय्...!!!"
असं रण माजल्यावर मात्र आज्या च्या कपाळावर क्षणभर एक सूक्ष्मशी आंठी पडली... ...
आणि आश्चर्य म्हणजे दुसर्‍या क्षणीं आज्या नं माझा इन्दिरामोक्ष केला,"एक उपाय सांगतो वहिनी... ...करून बघाच फक्त काय होतंय् ते..."
सौ. इंदिराजी आतां खुषीत येऊन चीत्कारल्याच,"आतां कसं बोललात भावजी... ...बोला काय करायचं?"
अज्या,"कांहीही करायचं नाही...!!!"
सौ. इंदिराजी बांवचळल्याच,"म्हणजे?... ...काय म्हणायचं काय आहे तुम्हांला भावजी?"
आज्या मिश्किल हंसत म्हणाला,"मी जे म्हटलं तेंच... ...तुम्ही कांहीच करायचं नाही... ...!!!"
सौ. इंदिराजी,"म्हणजे काय?...ह्यांचं तेल-तूप-साखर-बिर्याणी हादडणं असंच चालूं ठेंवायचं?"
अज्या,"होय वहिनी... ...तुमच्या नेहमीच्या खाण्यापिण्यात कांहीही फरक करायचा नाही... ..."
आतां सौ. इंदिराजीनीच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला,"अहो मग ह्यांचं असं हे सगळं हादडणं असंच सुरूं राहिलं, तर हे बारीक कसे काय होणार मग... ...ऑं?"
आज्या आतां गालातल्या गालात हंसला,"ते मला नकां विचारूं वहिनी... ...पण पुढच्या दोनतीन महिन्यात हा नाना सडपातळ नाही झाला ना, तर वैद्यकी सोंडून देईन मी कायमची !!!... ...काय?"
आतां मात्र सौ. इंदिराजी सफाचट् निरुत्तर झाल्या...नी मूग गिळून गप्प बसल्या... ...!!
असली नामी संधी मी तरी कशी काय सोडणार?,"शतशः धन्यावाद आज्या तुला... ...लंगोटियार आहेस खरा...!!!"
सौ. इंदिराजी नी तंबी भंरलीच,"तर तर...उंदराला मांजर साक्षी... ...'खरे लंगोटियार' काय?... ...
आतां नीट कान उघडे ठेंवून ऐकून ठेंवा तुम्ही दोघेही... ...
दोनच्या जागी तीन महिने मी वाट बघेन हे सडपातळ व्हायची...
ह्यांच्या खाण्यापिण्यातही काडीचा फरक करणार नाही मी... ...
पण तीन महिन्याभरांत तुमच्या ह्या 'नानां' चा फुगवटा जर कां नाही ओंसरला ना, तर तुम्हां दोघांच्याही लंगोट्या जाग्यावर राहणार नाहीत सांगून ठेंवते !!! ... ...काय?... ...ऐकलत ना नीट?"
आम्ही सौ. इंदिराजी ना कोपरापासून हात जोडले... ...आज्या म्हणाला,"ठीकाय् वहिनी... ...हरकत नाही..."
आज्या चे मी नजरेनंच शतशः आभार मानले... ...मला उपासमारीतनं सोंडवल्याबद्दल...
आणि आमचा चौघांच्या दिनचर्याही होत्या तश्याच चालूं राहिल्या...
सौ. इंदिराजी नी पण घरांत हा विषय परत छेडला नाही ... ...
त्या तश्या दिलेल्या शब्दाच्या पक्क्या असल्यानं माझ्या 'तेल-तूप-गोडधोड-सामिष' वगैरे हादडण्यात पण कांहीच फरक पडला नाही... ...
असाच एक महिनाभर गेला, आणि हळूं हळूं सौ. इंदिराजी चिंतामुक्त व्हायला लागल्या... ...
दोन एक महिने उलटेतोंवर तर त्या आनंदीही दिसायला लागल्या... ...!!
आणि पुढच्या पंधरवड्यात तर त्या चक्क खुषीत वावरायला लागल्या... ...!!!
एक दिवस मला च कांहीतरी शंका आली, अन् मी त्यांना छेडलंच,"काय झालंय् आज तुम्हांला?... ...अगदी खुषीत दिसताय् म्हणून विचारलं..."
सौ. इंदिराजी,"आरश्यात बघिलंत काय स्वतःला नीट निरखून?"
मी,"म्हणजे?... ...काय झालं?"
सौ. इंदिराजी,"आतां कसे पहिल्यासारखे छान अंगाबरोबर दिसताय् म्हणून म्हटलं...!!! ...नीट बघितलंत काय आरश्यात?"
मला ती दुष्ट शंका आतां परत छळायला लागली...पण नुस्तं आरश्यात बघून काय समजणार होतं स्वतःचं स्वतःला?
मी तांतडीनं जामानिमा चंढवून बाहेर पडलो... ...आगगाडीचं स्टेशन चालत केवळ पांच मिनिटांच्याच अंतरावर होतं... ...
तिथल्या फलाटावरच्या वजन कांट्यावर उभा राहून मी चपळाईनं एक रुपयाचं नाणं त्यात ढंकललं...
वजनाचं तिकीट बाहेर येतांच चटकन् उचलून ते मी बघितलं... ...
अन् फाड्दिशी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!
लातूरहून परत  आल्यावर ऐंशी किलोपर्यन्त चंढलेलं माझं वजन आतां चक्क अडुसष्ट किलोवर घंसरलेलं होतं... ...!!!
आज्या ची बत्तिशी अशी फळलेली होती...!!
मी तत्क्षणीं त्याला दूरध्वनि लावला,"काय आज्या... ...कसं काय चाललंय् एकूण?"
आज्या," अगदी फाकडू... ...बोल कशी काय आंठवण काढलीस?"
मी,"आज संध्याकाळी उभयतां भोजनाला आमच्या घरीं या... ...सुट्टी च असल्यामुळं जरा निवान्त गप्पा ही होतील... ...काय?"
आज्या ला माझ्या मनातल्या खळबळीचा कांही वास लागलेला दिसला नाही...
,"ठीकाय् येतो आठ वाजतां." म्हणून त्यानं दूअध्वनि ठेंवला.
घरीं गेल्यावर मी सौ. इंदिराजी ना ही खबर ऐकवली... ...त्या पण खूष झाल्या...माझ्यातल्या 'खळबळी' चा बिल्कूल सुगावा न लागतां... ...
सालं नशीब आज जोरावर दिसत होतं... ....
सौ. इंदिराजीं ची हैद्राबादी मटण बिर्याणी आणि वर आईसक्रीम हादडून झाल्यावर पोटांवर हात फिरवत आमच्या गप्पांची बैठक जमली...
आणि कुणाला कांही कळायच्या आंतच मी थेट विषयाला हात घातला,"आज्या मला एका प्रश्नाचं खरंखुरं उत्तर हंवय्... ..."
आज्या," बोला नानासाहेब... ..."
मी,"माझं वजन परत अडुसष्ट किलो पर्यन्त घंसरलंय्... ...ते 'चबी चीक्स्' ही गायब झालेत... ..."
आज्या,"बरं... ... ...मग?"
मी," मग काय?... ...त्या दिवशी तूं इंदिराजी नां हे असं होण्यासाठी काय करायला सांगितलंस खासगीत?"
आज्या नं कानांवर हात ठेंवले,"कसलं काय खासगी न् बिसगी?... ...तुझ्यादेंखत च मी वहिनी नां स्वच्छपणे सांगितलं ना, की नाना च्या खाण्या-पिण्यात कांहीही फरक करायचा नाही म्हणून?"
मी,"मग तरी मी असा बारीक कसा काय झालो?... ...थेट पहिल्यासारखा?"
आतां सौ. इंदिराजी नी सिक्सर ठोंकली,"अहो, त्या गोष्टीतली भिकारीणा नाही कां पंचपक्वानं हादडून वाळकुटी झाली?... ...तुमचं नशीबही तसलंच खत्रूड!!!... ...त्याला भावजी काय करतील?"
मी,"हे बघ आज्या... ...माझ्या आहारात तूं काय घालायला सांगितलंस इंदिराजी ना?... ...बोल."
आज्या,"अरे बाबा माझ्या... ...मी वहिनी नां कांहीही सांगितलेलं नाही... ...त्या म्हणताय्‌त ना...तसंच झालंय तुझं... ...तुला एकूण स्वगृह मानवत नाही असं दिसतंय्... ...त्याला काय करायचं?"
तरी माझी शंका कांही फिटे ना,"मग मी परत असा इतका बारीक कसा काय झालो?... ...आपोआपच? ... ...ऑं?"
आज्या,"हे बघ नाना... ...तुला वैद्यकशास्त्राच्या भाषेत ते सांगून कांहीही पटणार नाही... ...तेव्हां तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगतो... ...काय?"
मी फिस्कारलो,"तर तर... ...माझी मर्मस्थानं तुझ्याइतकी दुसर्‍या कुणाला माहीत असणार?... ...आणि तुझ्या तात्त्वज्ञानिक विश्लेषणांत, एखादा माणूस पोंटभर पौष्टिक खाऊन पिऊन सुद्धां बारीक कसा काय होऊं शकतो याचा पण खुलासा असेलच... ...नाही?... ...कारण की तुझ्या वैद्यकशास्त्रालाही ज्या गोष्टीची कारणमीमांसा माहीत नाही, त्या गोष्टीबद्दल इंदिराजी नां 'अजिबात काळजी करूं नकां...हा नाना  हमखास सडपातळ होणारच' अशी अगदी छातीठोकपणे खात्री देत होतास ना?... ...म्हणून म्हटलं..."
आज्या,"होय तर... ...तुझ्या यच्चयावत शंकाकुशंकांचे झाडून सगळे खुलासे आहेत माझ्या निरूपणात... ...काय ?"   
मी," तेव्हां... ...प्रारंभ कुर्यात् गुरुदेव श्रोतृवृन्दो उपस्थितः ...!!!"
आज्या,"त्याचं असं आहे नाना, की संस्कृतात याबद्दल एक मजेशीर सुभाषित आहे... ...ते असं आहे
      ॥ कुष्ठमांसाशनेनैव गृध्रस्य पुष्टिर्भवेत्
तात्पर्य, गिधाड असतं ना, ते जसं सडलेलं-कुजलेलं मांस खाऊनच धष्टपुष्ट होतं, तसंच कांहीसं तुझं लातूरला गेल्यावर झालं नाना... ...तिथलं बाजारचं निकृष्ट खाणं-पिणं च तुझ्या तब्ब्येतीला मानवलं, त्याला काय करणार?"
अलका वहिनी,"धन्य आहे नाना तुमची...!!!... ...हीः हीः हीः हीः हीः हीः ..."
सौ. इंदिराजी,"धन्य नाहीतर काय?... ...ह्यां चं नशीब च असलं खत्रूड आहे, त्याला कोण काय करणार?"
आतां मी उसळलो,"वा वा वा वा वा वा .... गुरुदेव, आतां असं बघा, की तर्कदृष्ट्या गिधाडाला जर सडकं-कुजकं मांस मानवत असेल, तर मग चांगलं चुंगलं खाऊन ते दुप्पट पुष्ट झालं पाहिजे... ...काय?
               आतां माझी तब्ब्येत त्या गिधाडासारखीच... ...तेव्हां इथं ह्यां च्या हातचं सुग्रास हादडून माझ्या अंगावर ढीगभर तरी मांस चंढायला हवं होतं... ...नाही आज्या?"
आज्या गुरुदेवांनी आतां निरूपण सुरूं केलं,"इथंच तर सगळी गोम आहे नाना...तुम्ही सुभाषिताचा दुसरा चरण कुठं ऐकलाय् अजून?"
सौ. इंदिराजी,"बोला...बोला भावजी...होऊन जाऊं द्या...!!"  
आज्या,"दुसरा चरण असा आहे...
      कुपुष्टि पौष्टिकाहारात्मूलपिण्डोऽबाधितः ॥  !!!
      म्हणजे गिधाडाला जर चांगलं पौष्टिक खाणंपिणं खायला घातलं तर त्याची त्या पौष्टिक आहारानं पुष्टि होण्याऐवजी उलट कुपुष्टि च होते... ...!!
      तात्पर्य, पौष्टिक आहार खाऊन गिधाड गरगरीत होण्याऐवजी उलट वाळायला लागतं... ...वहिनींच्या गोष्टीतली भिकारीण जशी पंचपक्वान्नं खाऊन खाऊन खंगली ना, अगदी तसंच... ...!!!
सौ. इंदिराजी,"म्हणजे तुपात तळा, नाहीतर साखरेत घोळा... ... ..."
आज्या," अगदी बरोबर बोललात वहिनी...
        त्याचं असं आहे की, जगातल्या सर्व चराचर वस्तु आहेत ना, त्या प्रत्येकाचा निसर्गानं घडवलेला एक मूळ स्वभाव...ज्याला आपण तब्ब्येत, किंव पिण्ड म्हणतो तो...त्यालाच आम्ही वैद्यकीत              'कॉन्स्टिट्यूशन्' असं संबोधतो, तो कधीच बदलत नाही, असं सुभाषितकार सांगताय्‌त.
       तात्पर्य, गिधाडाचा पिण्ड हा नुस्ता सडकं कुजकं मांस खाऊन पुष्ट होण्याचा नसून, त्याव्यतिरिक्त कांहीही - अगदी ताजं उत्तम मांस सुद्धां - खाल्लं, तर रोडावण्याचाही असतो... ...
       तसंच कांहीसं ह्या नाना च्या तब्ब्येतीचं गौडबंगाल आहे...म्हणून तर लातूरला गेल्यावर त्यानं बाळसं धरलं, आणि स्वगृहीं परतल्यावर घरचं पौष्टिक खाऊन-पिऊन तो पुन्हां वाळला... ...!!!"
मी आतां कपाळाला हात लावीत म्हटलं,"मग आतां 'चबी चीक्स्' साठी कांहीच उपाय उरला नाही काय रे आज्या... ...ऑं?"
सौ. इंदिराजी नी संधी साधलीच,"कां नाही उपाय?... ...आहे की..."
मी कान टंवकारले,"काय?... ...काय आहे उपाय तुमच्या डोंक्यात?"
सौ. इंदिराजी,"कांही नाही... ...लातूरपेक्षा ज्यास्त खत्रूड गांवी बदली करून घ्यायची कायमची... ...!!!"
आतां आम्ही सगळेच हीः हीः हीः हीः हीः करायला लागलो... ...अन् सौ. अलका वहिनीनी एकदम चुटकी वाजवली,"सुमे... ...कदाचित असंच असेल नानांचं..."
सगळे,"काय कसं असेल नाना चं?"
आणि सौ. अलका वहिनीनी अखेरचा बॉंब टाकला,"म्हणजे असं बघा...की आपण जे खातो-पितो ना, त्यापासून रक्तात साखर तयार होते, आणि तिच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते...बरोबर?"
आज्या," अगदी बरोबर... ..."
सौ. अलका वहिनी,"आतां जाडी केव्हां वाढेल? तर त्या साखरेचं जर श्रमून ज्वलन झालं नाही, तर तिचं चरबीत रूपांतर होणार...आणि  बाळसं वाढणार...काय?"
सगळे,"अगदी बरोबर... ...मग पुढं?"
सौ. अलका वहिनी,"तर नानांच्या बाबतीत काय होत असेकल, की त्यांना एका खाण्या-पिण्यातनं जी ऊर्जा प्राप्त होते, ती सगळी च्या सगळी पुढचं खाणं-पिणं पंचवण्यातच खर्च होत असावी... ...!!
               त्यामुळं चरबी वाढायला अतिरिक्त साखरच शिल्लक उरत नसेल त्यांच्या शरीरात, तर नाना कसे काय बाळसं धंरतील, अगदी तिन्हीत्रिकाळी तेल-तूप-मटणाचा मारा केला तरी?... ...ऑं?"
सौ. अलका वहिनीं चा अचाट तर्कटषट्‌कार बघून मी कपाळाला हात लावत जागीं च चितपट झालो... ...!!!
अन् आज्या आणि सौ, इंदिराजी पहाडी आवाजात पोटं धंरधंरून खदांखदां हंसत सुटले... ...!!!!

****************************************************************************************** -- रविशंकर.
१ जानेवरी २०१९.

   

1 comment: