Search This Blog

Monday, 9 June 2025

|| बोधकथैषा लघुत्तमा - ४ ||

 || कर्मफलान्नमोचनम् ||

 

दरवाज्यावर टक् टक् झाली, न् शेठ चुनीलालांची झोंप चांळवून त्यांनी डोळे किंचित किलकिले करीत कक्ष्याच्या दरवाज्याकडं बघितलं... ...

दरवाजा उघडून परिचारिका हातांत औषधांचं तबक घेऊन खोलीत आली... “ जरा आं करा बरं शेठजी... हां... आस्सं...ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत तुम्हांला... ...”

परिचारिकेनं हातावर ठेंवलेल्या गोळ्या शेठजी नी आं करून तोंडात टांकल्या... आणि तिनं पुढं केलेला पाण्याचा पेला तोंडाला लावून त्या गिळून टांकल्या... ...


आठवड्यापूर्वीं हृदयविकाराचा झंटका आल्यामुळं तें रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्ष्यात दाखल झालेले होते.

गेला आंठवडाभंर तद्न्य वैद्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरूं होते, पण अजून म्हणावं तितकं बरं वाटत नव्हतं... ...खरं तर अशक्तपणा कमी होण्याऐवजी तो दिवसेदिवस वाढतच चाललेला होता, आणि दिवसरात्र शेठजी अर्धवट ग्लानीतच पलंगावर पडून होते... ... ...


, “ कसं वाटतंय आतां शेठजी ?..." परिचारिका त्यांच्या दंडाभोंवती कापडी पट्टा आंवळून त्यांचा रक्तदाब तपासत

म्हणाली.

, “कसलं काय बरं म्हणायचं बाई ?...अशक्तपणा दिवसेदिवस वाढतच चाललाय... ...धड उठून पलंगावर बसवत पण नाहीय मला आतां...तुमच्या वरिष्ठ वैद्यांना हें सांगा बजावून...अजून काय तपासण्या करायच्या असतील, तर करां म्हणावं खुशाल ...नाहीतर ही औषधं तरी बदलायाला सांगा त्यांना...”

, “ हो...अगदी नक्की सांगते हं तुमचा निरोप... ..." परिचारिका स्मित करीत शेठजी ना म्हणाली, "आत्तां थोड्या वेळातच मुख्य वैद्य नटवरलालजी स्वतःच येतील तुम्हांला तपासायला... ...

तेव्हां त्यांच्याही कानांवर घाला हें

सगळं...आणि निवांत पडून रहा बरं अगदी...येऊं मी ?”

दरवाजा हंळूच बंद करून घेऊन परिचारिका निघून गेली...आणि शेठ चुनीलालांनी परत डोळे मिटून कूस बदलली... ...


, “ उठा उठा शेठजी...कसं काय वाटतंय आतां ?”

कानांवर हांक पडल्यावर शेठ चुनीलाल नी आतां पुन्हां डोळे उघडले...

समोर मुख्य वैद्य नटवरलालजी त्यांच्या छातीला ठोंकेमापक उपकरण लावून त्यांची नाडी तपासत उभे होते...

पलंगाच्या सभोंवती कनिष्ठ वैद्य, परिचारिका, सेवक, शेठजीं च्या घंरची चिंताग्रस्त मंडळी, इत्यादींचा घोळका जमलेला होता... ...

, “ कसं वाटतंय आतां चुनीलालजी ?” वैद्यांनी परत विचारलं... ...

शेठजी नी परत मघांचचं च पुराण वैद्यांना ऐकवलं... ...

मग वैद्य नटवरलालजी आणि कनिष्ठ वैद्यांच्यात थोडा वेळ अगम्य वैद्यकीय भाषेत कांही बोलणं झालं, आणि नटवरलालजी शेठजींच्या पत्नीनां म्हणाले, “ तसं घाबरण्यासारखं कांही वाटत नाहीय मला मणिबेन...पण सध्या चालूं ठेंवलेल्या मौखिक औषधांनी चट्कन् गुण येत नाहीय असं दिसतंय मला...तेव्हां यांना नसेतनं औषधं द्यायला सुरुवात करतोय मी...कळलं ?...काळजी करूं नकां...सगळं कांही ठीक होईल आंठवडाभंरात... ...”


एव्हढं सांगून वैद्य नटवरलालजी त्यांच्या गोतावळ्यासकट निघून गेले...

शेठजीं च्या सौ. मणिबेन पण रात्री च्या मुक्कामाची व्यवस्था-तयारी करायला घरीं गेल्या... ...

आणि शेठ चुनीलाल पलंगावर विचार करत एकटेच खोलीत पडून राहिले... ... ...

' कधी यातनं सुटका होणार आपली ?...आई जगदंबे... ...!!’

 

पंधरा-वीस मिनिटांनीं परिचारिका रुग्णसाहित्यानं लादलेली ढंकलगाडी घेऊन शेठ चुनीलालांच्या वातानुकूलित खोलीत परत आली. तिनं शेठजींच्या हाताच्या मनगटाजंवळच्या भागावरच्या शिरेत सुई खुपसून ती चिकटपट्ट्यांनी कातडीवर घट्ट चिकटवून बसवली, मग शिरेतनं द्यायच्या औषधाची बाटली तिला जोडली, बाटली पलंगाच्या कोंप-यात बसवलेल्या दांडक्याला उलटी टांगली, आणि नळीतनं ठिबकणारी औषधाची मात्रा नीट करून ती बाहेर निघून गेली... ...


ग्लानि जराशी ओंसरल्यावर शेठजी नी डोळे उघडले...न् त्यांची अंधुक नजर खोलीभंर भिरभिरत फिरली...

मग पलंगाच्या पायथ्याशी दांडक्याला उलटी टांगलेल्या औषधाच्या बाटलीवर स्थिरावली...

कांहीतरी ओंळखीचं वाटल्यासारखं भासलं, म्हणून उठून बसत त्यांनी उश्यालगतच्या तिपाई वर ठेंवलेला आपला चष्मा डोंळ्यांवर चंढवला, न् ती बाटली डोळे तांणून नीट निरखून बघितली... ...

आणि चुनीलाल शेठजींचे डोळे प्राणांतिक भंयानं फांटले... ... ...

बाटलीतनं त्यांच्या नसेत थेंब थेंब पांझरणारं तें द्रावण त्यांच्याच मालकीच्या औषधनिर्मात्या उद्योगानं अमाप पैसा कमवत बाजारात ओंतलेलं बनावट औषध होतं... ...!!!

क्षणार्धात शेठजींच्या डोंक्यात लख्ख प्रकाश पडला...शंकेला जागाच नव्हती...

कसंबसं धंडपडत उश्याशेंजारच्या तिपाईवर ठेंवलेल्या औषधांची वेष्टनं पण त्यांनी निरखून बघितली... ...

त्यातलींही बरीच औषधं त्यांच्याच उद्योगानं बनवलेली... ...!!!

 

स्वतःच निर्मिलेल्या भस्मासुराची ती करामत बघून आतां शेठजींच्या घश्याला विलक्षण कोरड पडली...

हाताच्या शिरेत खुपसलेली तीक्ष्ण सुई बाहेर ओंढून कांढायची त्यांनी जिवाच्या आकांतानं धंडपड केली, पण अतीव शक्तिपात झालेल्या हाताच्या तें कुवतीपलीकडचं होतं... ...

क्षणार्धात शेठजी ना आपल्या चारित्र्यसंपन्न बायकोनं ' हीं असलीं पापं करूं नकां ' हा वेळोंवेळीं दिलेला, पण धुडकावलेला सल्ला आंठवला...

, “ पपा... ...हें सगळं थांबवा हो...” म्हणून हात जोडून विनवणारी जिवापाड लाडकी असलेली आपली एकुलती एक लेकही त्यांच्या क्षीण नजरेसमोर उभी राहिली... ...

 

आणि विधिलिखित कळून चुकलेल्या शेठजींनी प्राणांतिक भीतीनं किंकाळी फोंडायला आं वांसला...

अतीव क्षीण झालेल्या त्यांच्या घश्यातनं मात्र किंकाळीऐवजी बाहेर पडली ती फक्त अखेरची घरघर... ...

ती घरघरही त्या महागड्या वातानुकूलित खोलीच्या हवाबंद खिडकी-दरवाज्यावर आंदळून खोलीतल्या खोलीत हंवेतच विरली... ...

आणि दुस-या क्षणीं सगळं संपलं... ... ...

.....................................................................................

.....................................................................................


 

स्वर्गलोकाच्या प्रवेशद्वारावर असलेला अदिशक्ति जगदंबा मातोश्रीं चा दरबार न्याय-निवाडे करण्यासाठी खंचाखंच भंरलेला होता...

ब्रह्मा-वि़ष्णु-महेश सिंहासनाशेंजारच्या आसनांवर विराजमान झालेले होते...

चित्रगुप्त हाताशीच रचून ठेंवलेल्या आपल्या नोंदवह्या सांभाळत उजव्या बाजू च्या मानासनावर बसलेले होते, तर यमराज हातांतला गळफांस चांळवीत सेवकांसह डाव्या बाजूच्या मानासनावर आरूढ झालेले होते...

बाकी देव-देवता-यक्ष-किन्नर आपापल्या मानमरातबानुसार स्थानापन्न झालेले होते... ...

आणि सिंहासनासमोरच्या प्रांगणात नुकत्याच परलोकवासी झालेल्या मर्त्यांची गर्दी दाटीवाटीनं बसलेली होती, जीमध्ये शेठ चुनीलालही हंजेरी लावून बसलेले होते... ... ...

सगळी कलियुगातलीच गर्दी असल्यामुळं तीत कांही मोजकेच अपवाद वगळतां बहुतांशी गांवगुण्ड, टगे-सोदे-राजकीय दादा-भाऊ, भ्रष्टाचारात बुडालेले सरकारी बाबू-मंत्री-संत्री-पोलीस-वकील-ठेकेदार-बिल्डर, काळा बाजारवाले व्यापारी, वाळू-टॅंंकर माफिया, या सगळ्यांची पैश्यावर पोंसलेली-माजलेली बेफाम पोरं, खुनी-बलात्कारी-भेसळवाले, इत्यादी इत्यादी मातब्बर मंडळी होतीं... ...

 

दरबारच्या द्वारपालांनी त्रैलोक्यधारिणी जगदंबा मातोश्रीं च्या आगमनाची वर्दी पुकारतांच अवघा दरबार उठून उभा राहिला, आणि वनराजाच्या पांठीवरनं पायउतार होत मातोश्रींचं दरबाराकडं आगमन झालं...

 

तमाम देव-गंधर्व-यक्ष-किन्नरांचं वंदन स्वीकारत मातोश्री वनराजाच्याच डौलदार चालीनं धीमी पावलं टांकीत दरबारात प्रकट झाल्या, आणि खंचाखंच भंरलेल्या दरबारावर आपली कृपादृष्टि वर्षवत सिंहासनारूढ झाल्या.

तसं बघतां बघतां मातोश्रींचं आदिशक्ति चं ऊग्र रूप पालटून सिंहासनावर त्रैलोक्यस्वामिनि जगदंबे चं डोळ्यांचं पारणं फेंडणारं देखणं सात्त्विक राजस पण कणखर रूप प्रकटलं...

मस्तकीं रत्नजडित मुकुट, ज्यावर शिरोभागीं अनादि-अनंता चं हिरेजडित चिन्ह कोंरलेलं...समोरचा रक्तवर्णी ॐकारमण्डित उजवा वरदहस्त वर उचललेला, तर डाव्या हातात परशू...बाकीं आठही हातांत भंरलेले हिरवेकंच चुडे, न् मुठींत लखलखणारी धारदार शस्त्रं...रत्नजडित वस्त्रं न् उत्तरीय...गळांभंर मंगळसूत्र...त्यासोबत झंळाळणारे सुवर्णालंकार...पांजळलेल्या तलवारीसारखं सरळ धारदार नाक...कोरीव नाकपुड्या...त्यात परिधानलेली रत्नजडित नथ...धनुष्याकृति रेखीव कमानदार भिवया...त्यामधोंमध कपाळीं रक्तवर्णी कुंकुमतिलक... बदामी रंगाचे मत्स्याकृति नेत्र...आणि दरबारावरनं फिरणारी मायाळू पण हातांतल्या शस्त्रास्त्रांइतकीच करारी कर्तव्यकठोर धांरदार नजर...यातलं काय काय दृष्टीनं आकण्ठ पिऊन धन्य व्हावं, तें दरबारालाच कळे ना...

अवघा दरबार पुनश्च नतमस्तक झाला...

जगदंब... ...जगदंब '...!!!

 

, “ शुभं भंवतु " म्हणत मातोश्री सिंहासनावर विराजमान झाल्या... ...

चित्रगुप्तांनी आपल्या चोंपड्या पुढ्यात ओंढल्या, “ आपली च प्रतीक्षा होती मातोश्री... ...न्याय-निवाड्यांचं कार्य सुरुं करायची अनुद्न्या असावी...”

मातोश्री मंद हंसल्या..., “ तथाऽस्तु "

 

झालं...क्रमानं एकेका परलोकगताच्या नांवाचा पुकारा सुरूं झाला...

नांवाचा पुकारा झाल्यावर एकेकजण उठून उभा राहूं लागला... ...

चित्रगुप्त त्याच्या कार्मिक पाप-पुण्याचा झाडा मातोश्रीं समोर सादर करूं लागले... ...

आणि ज्याच्या त्याच्या कृतकर्मानुरूप मातोश्री त्याचा ललाटलेख त्याच्या कपाळीं कोरूं लागल्या... ...

कांही मोजके कर्मशुध्द अपवाद जे होते, त्यांची यक्ष-किन्नरांच्या देंखरेखीत स्वर्गलोकीं पांठवणी झाली... ...

शेंवटीं उरले मुरलेले कलियुगवासी...

सा-यांचा न्याय-निवाडा एकाच पध्दतीनं व्हायला लागला...

आधी पापप्रक्षालनार्थ नरकात रवानगी, आणि त्यानंतर पापकृत्यांची फळं भोगायला परत इहलोकात रवानगी... ...!!!

 

निकाल सुनावतांना मातोश्रीं चा मंद आवाज एकाच संयमित पट्टीत कानीं पडत होता, तरी त्यामागची संतापलेली दुर्गामाता सगळ्या जीवांना आतां लख्खपणें समजून चुकली... ...

नीच राजकारणी दादा-भाऊं च्या कपाळीं नरकवासानंतर माणसांच्या पायांखांली तुडवले जाऊन मृत्यु पावणा-या किडे-मकोड्यांचे जन्म लिहिले गेले...भ्रष्ट सरकारी बाबूं च्या प्राक्तनात अठराविश्वे दारिद्र्यातली अन्नान्नदशा लिहिली गेली...शिक्षण क्षेत्र नासवून कित्येक पिढ्यांची वाट लावणा-या शिक्षण सम्राटांच्या नशिबाला जे कधीही लिहूं-वाचूं शकणार नाहीत, अश्या आंधळ्या-बहि-या-थोट्यांचा जन्म आला....बलात्का-यांच्या कपाळीं वारांगनांचे जन्म लिहिले गेले...लांड्या-लबाड्या करून खटले लढवणा-या वकिलांना मुक्यांच्या जन्मांना सामोरं जावं लागलं...वाळू-टॅंकर माफियांच्या रवानग्या पाण्याचा टिपूस नसलेल्या वाळवंटांत झाल्या...खाद्यान्नात भेंसळ करणा-यांना विषबाधांच्या मृत्यूं चं बक्षीस मिळालं...अतिरेक्यांच्या कपाळीं जळितांतल्या मरणांचे भोग आले...गुंड-पुंड-मवाल्यांना वाघ-सिंहांच्या जबड्यात मरण येणा-या चतुष्पादांच्या जन्मांचा प्रसाद मिळाला... खोटे पुरावे तयार करणा-या पोलिसांना तंसल्याच पुराव्यांच्या आधारे सुनावलेल्या फांशी - कारावासांच्या शिक्षा सुनावल्या गेल्या... ... ...

मातोश्री थंडगार आवाजात एकेकाचं विधिलिखित सुनावत होत्या...

 

' शेठ चुनीलाल...उठून उभे रहा ’ दरबारी हंरका-यानं नांव पुकारतांच शेठजी लटपटत उठून उभे राहिले... ...

चित्रगुप्तांनी शेठजींच्या पापांचा हिशेब सादर करायला सुरुवात केली...

बनावट भेंसळ औषधांची निर्मिती --

पांच पन्नास मानवांचा मृत्यू --

शेंकडो माणसांना कायमचं अपंगत्त्व... ... ...

अनेक खटल्यांतनं पैसा चांरून करून घेतलेली सुटका... ... ...

.....................................................................................

..................................................................................... '


चित्रगुप्तांची यादी संपतां संपेना...

एकेक अपराध ऐकतांना मातोश्रींचे डोंळे अधिकाधिक कठोर होत होते... ...

प्रत्यक्ष्य हत्येपेक्ष्याही हें कुकर्म नीचतर होतं...केवळ राक्षसी धनलालसेपायीं केलेलं... ... ...


मातोश्रीं ची धांरदार थंड नजर शेंठजीवर रोंखली गेली... “ अपराध कबूल आहेत तुम्हांला शेठजी ?”

चुनीलाल शेठजींच्या जिवाचं पाणी पाणी झालं... ...तें गप्प च उभे राहिले...

, “ माझ्या दरबारात मौन ही अपराध स्वीकृतीची पावती समजली जाते शेठजी...” मातोश्री कडाडल्या...

शेठजीनां अचानक कांहीतरी आंठवलं, “ मातोश्री...क्षमा असावी...पण भगवान चित्रगुप्तांच्या च्या हिशेबात माझ्या एका पुण्यकृत्याची नोंद झालेली दिसत नाही... ...त्याचीही दखल घेंतली जावी एव्हढीच प्रार्थना आहे माझी... ...”

मातोश्री, “ कुठलं पुण्यकृत्य म्हणताय तुम्ही ?”

शेठजी, “ तरूणपणीं एकदां आपल्याच दर्शनासाठी तीर्थयात्रेला गेलो होतो मी...तिथल्या आपल्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचं कार्य चाललेलं होतं... ...”

मातोश्री, “ बरं... ...म ऽ ऽ ऽ ऽ ग ?”

शेठजी, “ त्या धार्मिक कार्यासाठी मी शंभर तोळे सोनं श्रध्देनं अर्पण केलेलं होतं... ...त्याचा हिशेबात कुठंच उल्लेख झाला नाही एव्हढंच माझं म्हणणं...”

मातोश्री चित्रगुपतांच्याकडं वळल्या, “ जरा नोंदी पुनश्च तंपासून आम्हांला विदित करा चित्रगुप्तश्री....की शेठजी म्हणतायत तें बरोबर आहे काय तें...”

चित्रगुप्त नोंदी परत अथ पासून तंपासायला लागले, अन् मध्येच थांबत उत्तरले, “ क्षमस्व माम् मातोश्री...शेठजी म्हणतायत तें बरोबर आहे...तशी नोंद आहे इथं...पण ती अपवादात्मक- म्हणजे एकमेव सत्कर्माची- नोंद असल्यामुळं बाकी तमाम पापकर्मांच्या नोंदींत माझ्या नजरेला पडलीच नाही...”

मातोश्री, “ असो...मरणोत्तर जन्म-मरणाचे न्याय-निवाडे या दरबारात करतो आपण...होय ना चित्रगुप्तश्री ?”

चित्रगुप्त, “ बरोबर आहे आपलं मातोश्री..."

मातोश्री मग दरबार दालनाच्या छताला झुंबराच्या जागीं टांगलेल्या परिपूर्ण संतुलित तराजू कडं निर्देश करीत म्हणाल्या," चित्रगुप्तश्री...आपल्या दरबारातला न्याय-निवाड्यांचा हा तराजू त्याच्या परिपूर्ण संतुलनासाठीच त्रैलोक्य जाणतं...होय ना ?"

चित्रगुपत," होय मातोश्री..."

म्हणूनच परिपूर्ण न्यायाच्या तराजू चं हें कांटेकोर संतुलन तसूंभंरही ढंळणार नाही, याची दरबारात कर्मसंचय सादर करतांना इथून पुढं यथायोग्य काळजी घ्या चित्रगुप्तश्री... ..."   

चित्रगुप्त, “ जशी आद्न्या मातोश्री...”

मातोश्री परत शेठजींकडं वळल्या ..., “ कर्म खंरकटलेल्या मानवांनी केलेल्या कर्मकांडांना वा दानधर्मांना या दरबारात कवडीची किंमत दिली जात नाही शेठजी...समजलं?...तरी पण बोला... ...काय हंवय तुम्हांला या पुण्याबद्दल ?”

शेठजी, “ निकाल सुनावतांना हें पुण्य पण हिशेबात धंरलं जावं मातोश्री... ...म्हणजे त्याचं फल म्हणून जितका कांही काळ स्वर्गवास मला देय असेल, तो इतर कर्मांची फलं भोगण्याआधी मला दिला जावा इतकंच...”

मातोश्री, “ म्हणजे सदर पुण्याचाही हिशेब चुकता केला जावा...असंच ना तुमचं म्हणणं ?”

शेठजी, “ अगदी बरोबर... ...एव्हढीच माझी प्रार्थना...”

मातोश्री आतां चित्रगुप्तांकडं वळल्या, “ चित्रगुप्तश्री...”

चित्रगुप्त, “ आद्न्या मातोश्री...”

आणि मातोश्री शेठजींकडं बोंट दांखवत गंरजल्या, “ कुबेरश्रीं च्या कोषागारातनं शंभर तोळे सुवर्ण शेठजीनां चुकतं करून टांका, म्हणजे त्यांच्या पुण्याचा हिशेब पुरा होईल...”

कुबेर, “ जशी आद्न्या मातोश्री...”

मातोश्री, “ उरला यांच्या पापराशींचा निवाडा... ...त्यासाठी यांना नरकात पांठवणंच योग्य होईल...काय ?”

चित्रगुप्त, “ अगदी बरोबर मातोश्री...”

मातोश्री, “ हें बरोबर वाटलं तरी समुचित होणार नाही चित्रगुप्तश्री...कारण की इहलोकीं यांनी धनलालसेपायीं इतरांना ज्या यातना भोगायला लावल्या, अगदी तश्याच यातना याना मृत्युसमयीं स्वतःही भोगायला लागल्या...हें ही बरोबर ?”

चित्रगुप्त, “ हें पण अगदी यथायोग्य मातोश्री...”

मातोश्रीं ची दाहक नजर आतां शेठजीकडं वळली, “ म्हणून मी दोन निवाडे तुमच्यापुढं ठेंवते, आणि त्यांतनं तुम्हांला हंवा तो पर्याय निवडायची एकमेव संधी देते शेठजी... ...चालेल तुम्हांला ?”

चुनीलाल शेठजी हंरखले..., “ अवश्य चालेल मातोश्री...जगदंब...जगदंब...”

मातोश्री मंद हंसल्या, “ पहिला पर्याय म्हणजे थेट नरकात रवानगी ...”

शेठजी, “ आणि दुसरा पर्याय मातोश्री ?”

मातोश्री, “ दुसरा पर्याय म्हणजे पुनश्च इहलोकात पुनर्जन्म...तोही गर्भश्रीमंत कुटुंबात... ...

पैश्यासाठीच हीं सगळीं पापराशी जमवलीत ना तुम्ही ? ... म्हणून... ...तथापि...”

शेठजी चंमकले, “ तथापि... ... काय मातोश्री ?”

 

मातोश्रीं चा चेहरा आतां अपरंपार कठोर झाला...

अन् त्यांच्या आवाजाला पांजळलेल्या खड्गाची विलक्षण धांर चंढली ... ...

, “ शेठजी... ...तथापि सदर पुनर्जन्मात... ...


तुम्ही दररोज पंचपक्वान्नांचं सुग्रास भोजन खाऊं शकाल, पण तोंडाला पाणी फोंडणारी भूक तुम्हांला लागणार नाही...

सुग्रास चांवूं शकाल, पण त्याची रुचि तुमच्या जिव्हेला जाणवणार नाही...की त्याचा गंधही तुमच्या घ्राणेंद्रियाला कळणार नाही...

सुग्रास गिळूंही शकाल, पण ते पंचवायला लागणारी उत्तम पचनशक्ति तुम्हांला मिळणार नाही...

पायांनी तुम्ही चालूं शकाल, पण विहरूं शकणार नाही...

तुमच्या नेत्रांना सगळं चराचर दिसेल, पण तुम्ही कांहीच बघूं शकणार नाही... ...

तोंडानं तुम्ही घडांघडां बोलूं शकाल,पण कुणालाच कांही सांगूं शकणार नाही...

कानांना सगळे आवाज व्यवस्थित ऐकायला येतील...पण तुम्ही कांहीच ऐकूं शकणार नाही... ...

तमाम चराचरांना तुम्ही हात लावूं शकाल, पण कश्यालाही तुम्ही स्पर्श करूं शकणार नाही... ...

हिरेजडित मंचक तुम्ही झोंपायला विकत घेऊं शकाल...पण नैसर्गिक शांत निद्रा तुमच्या नशिबात लिहिलेली नसेल... ...

शेंकडों मुद्रा वेंचून महागडी औषधं विकत घेऊं शकाल...पण निरोगी देह तुम्हांला लाभणार नाही... ... ...

सहस्रावधी मुद्रा खर्चून राजमहालासारख्या घरांत रहाल...पण तसूभंरही गृहसौख्य तुम्हांला मिळणार नाही... ... ... ...

शेकड्यांनी नोकर-चाकर पदरीं ठेंवूं शकाल...पण त्यांची स्वामिनिष्ठा तुमच्या नशिबात असणार नाही... ... ... ... ...

गेल्या जन्मातल्यासारखीच पतिव्रता भार्याही तुम्हांला मिळेल...पण अपत्यसौख्य तुमच्या प्राक्तनात मी लिहिणार नाही... ... ... ... ... ...

आणि सदर जन्माच्या अखेरीस करोडो मुद्रा खंर्चून धन्वंतरींचे उपचारही उदंड घेऊं शकाल...पण तृप्त-शांत मृत्यूही तुमच्या कपाळीं लिहिलेला असणार नाही... ... ... ... ... ... ... ...

तेव्हां तुम्ही च तुमचा निवाडा करा शेठजी... ...यातला कोणता पर्याय तुम्हांला स्वीकारार्ह आहे ?

जो पर्याय निवडाल, तो चित्रगुप्तश्रीं नां विदित करा... ...पुढील सगळी व्यवस्था तें जातीनं पार पाडतील... ...

चित्रगुप्तश्री....”

चित्रगुप्त, “ आद्न्या शिरसावंद्य मातोश्री... ...”

मातोश्री, “ तथाऽस्तु....”


निवाडा ऐकवून थिजलेल्या शेठजीकडं मातोश्री आतां धारदार-थंडगार नजरेनं बघायला लागल्या... ...

चुनीलाल शेठजीनीं कोंरडा आवंढा गिळत सा-या दरबारावर एकवार नजर फिरवली... ...

उजव्या बाजूला त्यांना पुनश्च मर्त्यलोकीं पोंचवायला यक्ष-किन्नर अवघडून उभे होते, तर डाव्या बाजूला यमराज हातांत पाश चांळवीत निर्विकार मुद्रेनं सेवकांसह खोळंबलेले होते... ...

 

आणि दोन्ही पक्षांना प्रतीक्षा होती, शेठजींच्या स्वयंनिर्णयाची... ... ...!!

अखेरीस चुनीलाल शेठजी नी हंतबुध्द होत खाली मान घालून भंर दरबारात फाड् दिशी स्वतःच्या करंट्या कपाळावर हात मारून घेंतला...!!


क्षणार्धानं मातोश्रीं च्या चरणीं लोळण घ्यायला त्यांनी मान वर करून पाहिलं...

पण मातोश्रीं चं स्वर्णसिंहासन रिकामं च होतं... ... ...!!!


पुढं काय झालं ?....

शेठजी नी अखेर दोहोंतला कोणता पर्याय निवडला ?

तें नरकात गेले असतील, तर तिथं तरी त्यांचं पापक्षालन झालं कां ?...

कीं इहलोकीं पुनर्जन्म पत्करून धनराशीत लोळत तें धन्य झाले ?

तें केवळ मातोश्री च जाणे... ...

मला तें चिंतन-मंथन केल्याशिवाय कसं काय सांगतां येईल ?


बोधकथांत अश्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोंधणं हा सर्वोत्तम पर्याय असतो... ... ...



-- रविशंकर.

७ मार्च २०२५.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वतःच निर्मिलेल्या भस्मासुराची ती करामत बघून आतां शेठजींच्या घश्याला विलक्षण कोरड पडली...

हाताच्या शिरेत खुपसलेली तीक्ष्ण सुई बाहेर ओंढून कांढायची त्यांनी जिवाच्या आकांतानं धंडपड केली, पण अतीव शक्तिपात झालेल्या हाताच्या तें कुवतीपलीकडचं होतं... ...

क्षणार्धात शेठजी ना आपल्या चारित्र्यसंपन्न बायकोचा ' हीं असलीं पापं करूं नकां ' हा वेळोंवेळीं धुडकावलेला सल्ला आंठवला...

, “ पपा... ...हें सगळं थांबवा हो...” म्हणून हात जोडून विनवणारी जिवापाड लाडकी असलेली आपली एकुलती एक लेकही त्यांच्या क्षीण नजरेसमोर उभी राहिली... ...