|| येतां मातोश्रीं च्या मनां ||

|| खात्री, तुझ्या वरदहस्ताइतुकी
आयुष्य जगतां तुडवीत कांटे
माझ्या च श्वासोंछ्वासांप्रतीही
अंबे न मजला बिल्कूल वाटे ||
करवीरनिवासिनि आदिमाया आदिशक्ति जगदंबा म्हणजे आमचं उपास्य दैवत...त्या आमच्या कुलस्वामिनी पण आहेत...आमच्यातल्या शब्दांतीत संवादांत त्यांना मी श्रध्देनं ' मातोश्री ' म्हणून हांक मारतो... ... ...यथावकाश हें च संबोधन माझ्या वास्तवातही रूढ झालंय इतकंच...
आदिशक्ति चं हें रणांगणावरचं धंगधंगणारं शस्त्रास्त्रधारी ऊग्र रूप...
मातोश्रींची तशी सौम्य रूपंही प्रचलित आहेत...पण त्यांचं हें मूळरूप च मला सगळ्यांत ज्यास्त पटतं, म्हणून मी या रूपाचीच उपासना अखंडपणे करीत असतो...
त्यांचं हें च रूप मला भावतं, त्याला कारण आहे त्यांचा कायदा... ....
|| कायदा तुझा आंसूड च, ऊग्र-कठोर
घेणें न कडेवर उचलुन हट्टी पोर ||
रणभूमीवर जंखमा झेलीत घंडावे
नी धर्मयुध्द ज्याचे त्याने च लढावे ||
दुर्दम्य स्वत्त्व, आणि अपराजेय सामर्थ्या चं मूर्तरूप असलेल्या मातोश्रीं चा हा कायदा मला मनोमन पटतो, म्हणूनच त्या माझं उपास्यदैवत...
त्या अंबा...म्हणजे जगन्माता जरी असल्या, तरी त्यांची माया मात्र रसरसलेल्या लालभडक लाव्हारसासाखी च धंगधंगीत असते... ...हंळवेपणाचं-दुबळेपणाचं-कंचखाऊ वृत्ति चं या मातोश्री ना विलक्षण वावडं असतं... ... ...
स्वार्थजन्य कर्मकांडाला कसलीही भीक न घालणा-या या मातोश्री, विशुध्द कर्मयोगाच्या मात्र अतीव भोक्त्या आहेत...तें गांठीला जितकं अधिक, तितका उपासक मातोश्रीं चा अधिक लाडका.
तें गांठीला असणा-या, आणि स्वतः शस्त्र परजत रणांगणावर बेधंडक उतरायची तंयारी असलेल्या उपासकांच्या पांठीशी सदैव असणारा मातोश्रीं चा अफाट सामर्थ्यसंपन्न ' तथाSस्तु ', या आधिभौतिक जगात काय काय अचाट-अतर्क्य कोटीतलं वास्तवात घंडवूं शकतो, याचे डझनावारी अनुभंव मी स्वतः च घेतलेले आहेत... ...तें ही ह्या विसाव्या-एकविसाव्या शतकांत... ...अगदी खंणाखंण वांजवून...
त्यातलाच हा एक नमुना... ... ...
-- रविशंकर.
२६ सप्टेंबर २०२५.
********************************************************************
येतां मातोश्रीं च्या मनां | कोण थोंपवी नारायणा ?||
हे एक माझं कायमचं आवडतं पालुपद... ...
तात्त्पर्य, खुद्द आदिमाया मातोश्रीनी च जर एखादी गोष्ट घंडवायचं मनावर घेतलं, तर त्यांचे मालक नारायणराव किंवा...अगदी गौरीपति भोलेबाबा तरी काय करतील ?
देवदेवतांचं ही या बाबतीत मर्त्यलोकांसारखंच चालत असावं... ...!!!
या मालकांच्या निर्मात्याही स्वतः त्याच...
मातोश्री नी काली रूपात नरकासुराचा वध केल्यानंतर देवलोकावरचं संकट तर संपलं, पण तोंपावेतो मातोश्रीं च्या कालिका अवताराच्या अंगात संतापाचा एव्हढा जबरदस्त वडवानल भंडकलेला होता, की तो शमवायला क्षीराब्धि त बुडी मारण्याखेरीज त्यांना दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नव्हता... ...
म्हणून त्या तिकडं जायला रणांगणावरून निघाल्या, पण त्यांच्या प्रत्येक पावलागणिक पायाखालची जमीन जंळून भस्मसात होत तिथं विवरं पडायला लागलीं... ...
अखेर योगीराज महादेवांनी धरणीवर हठयोगमुद्रेत निजून समाधी लावली, आणि यजमानांच्याच छातीवर एकेक पाऊल टाकीत मातोश्री क्षीराब्धि पर्यंत चालत गेल्या, अशी एक पौराणिक कथा आहे......
तात्त्पर्य, एकदां कां मातोश्री नी एखादी गोष्ट घंडवायचं मनावर घेतलं, की मग खुद्द त्यांचे यजमानही त्याला जर आडवे येऊं शकत नाहीत, तर तुमची आमची काय कथा ?
स्वर्ग-पृथ्वी-पाताळा सकट नियति वर देखील स्मामित्त्व एकट्या मातोश्रींचं च.
मग त्यानींच जर कांही करायचं ठंरवलं, तर तें न घडणं केवळ अशक्य... ...
एकदां कां त्यांनी नियतीचं नियंत्रण हातांत घेतलं, की त्यापुढं सगळ्या संबंधित गोष्टींची तड लागेतोंवर प्रत्येक घटित हे त्यांना हवं तसंच, हवं तेव्हांच, आणि हव्या त्या दिशेनं च घडत जातं...
उपासकांचं कर्तव्य एव्हढंच ... समोर उभ्या ठांकलेल्या परिस्थितीशी अखंडपणे निकराची कडवी झुंज घेत राहणं...बाकीचं सारं मातोश्री स्वतः च बघून घेतात... ...
खरं तर ' ज्याचं धर्मयुध्द त्याला च लढावं लागेल ' हा मातोश्रीं चा आद्य कायदा....
त्यांच्या उपासकांच्या बाबतीतही हा च कायदा लागूं असतो. पण या कायद्यालाही त्या कांही वेळां अपवाद करीत असतात... ...
उपासक ज्या परिस्थितीशी निकराची झुंज घेत असेल, ती परिस्थितीच जर त्याच्या मर्यादित ताकदीपलीकडची असली, तर मग मातोश्री नियतीचंही नियंत्रण स्वतःच्या ताब्यात घेतात, आणि मग जे कांही घडत जातं, तें केवळ अतर्क्य कोटीतलं म्हणावं लागतं... ...
*****************************************************************
," डॉक्टर...तुम्हांला कांही अपशंका आहे काय निदानाबाबत ?"...मी डॉ. कुंडल्यांना थेट च प्रश्न विचारला... ...
स्थळ होतं डॉ. कुंडल्यांच्या आश्वस्त रुग्णालयातला मी दाखल झालेला कक्ष, आणि तारीख होती १६ नोव्हेंबर २०२४...वार शनिवार...
झालं होतं असं, की त्याआधीं दोनएक दिवसांपूर्वीं दुपारपासून अगदी आकस्मिक म्हणावं असं माझं पोंट एकदम आंवळल्यासारखी न् खंपाटल्यासारखी भावना मला अचानक व्हायला लागली होती...
बरं कुठं घरांबाहेरचं दूषित खाणंपिणं झाल्याचाही कांही ताजा इतिहास नव्हता. किंवा घरातलीं कामंधामं करतांना कुठं उसण-बिसण भंरली असेल म्हणावं, तर तसंही कांही झालेलं नव्हतं...
तेव्हां नेहमीच्या रिवाजानुसार आम्ही शेंकणं, चोंळणं, घरातली औषधं, असे घरगुती उपाय पुढचे तीन दिवस करून बघितलेले होते ... त्यांनी कांही उतार पडेनासा झाल्यावर मग डॉ. कुंडल्यांना दूरध्वनि केलेला होता, आणि ' यापुढं हें घरींच अंगावर न कांढतां सरळ इस्पितळात दाखल व्हा ' असा त्यांनी सल्ला दिल्यानं आम्ही मग घराजवळच्या त्यांच्याच ' आश्वस्त ' रुग्णालयात आदल्या दिवशींच म्हणजे शुक्रवारीं च दांखल झालेलो होतो... ...
डॉ. कुंडले तसे आमचे शेंजारी च म्हणायचे... ...घराशेंजारच्या दोनतीन इमारती सोडून पलीकडच्या कार्तिका सोसायटीत राहतात. तसा गेल्या तीसएक वर्षांचा दाट परिचय असल्यानं आम्हांला यथायोग्य उपचारांच्या बाबतीत तरी कसली काळजी - चिंता नव्हती.
रुग्णालयात दाखल झाल्याझाल्याच सगळ्या प्राथमिक तपासण्या आणि हृदयस्पंदनालेखही करून झालेला होता, ...पण कश्यातच कांही वावगं दिसत नव्हतं...!
दाखल झाल्या दिवशीं च डॉ.कुंडले सायंकाळीं स्वतः मला तपासून गेले, न् त्यांनी हाताखालच्या वैद्यांना मला रात्रीं पोंट साफ व्हायचा कसलातरी अलोपॅथिक जमालगोटा द्यायला सांगितला...
तो जमालगोटा रिचवून झाला, मग दुस-या दिवशीं सकाळीं पोंट साफ झालं एकदाचं...
तथापि माझ्या पोंटाचं पिळवटणं न् खंपाटणं मात्र जसं च्या तसं च होतं... ...!!
तेव्हां मग डॉ. कुंडल्यांनी बृहदांत्र चक्षु तपासणी - म्हणजेच ज्याला ' कोलनोस्कोपी ' म्हणतात ती - करायला सांगितली....
दुस-या दिवशीं सकळीं डॉ. भडकमकरांनी ती तपासणी सुध्दां पार पाडली, पण तीतही सगळंच ठंणठंणीत दिसून आलं... ...!!
तेव्हां मग खुद्द डॉ. कुंडलेही बुचकळ्यात पडले, न् मला म्हणाले," नाना...कोलनोस्कोपीतही कांही गैरवाजवी दिसत नाहीय... तेव्हां आतां पोंटाची ' विद्युल्लहरी प्रतिमा तंपासणी ' - म्हणजेच सोनोग्राफी- करून घेणं गरजेचं आहे, ती आजच करून घेऊंया " ... ...
त्याच दिवशीं दुपारीं चार वाजतां ती तपासणीही पार पडली...आणि मग चोर समोर आला... ...
डॉ. कुंडल्यांनी तो अहवाल बघतांच मला विचारलं,“ नाना...तुम्हांला मूत्रविसर्ग नीट पुरेसा होत नसल्याचं, किंवा ओंटिपोंटात तंडस लागल्यासारखं गेल्या किती काळापासून जाणवत होतं ?”...
मी,“ तसं म्हणायला कांही कांही वेळां विसर्ग करायला जायची घाई व्हायची अधनं मधनं... ...”
डॉ. कुंडले, “ रात्रीं साधारण किती वेळां उठायला लागतं त्यासाठी तुम्हांला ?”
मी, “ निश्चितपणे असं कांही नाही सांगतां येणार...पण कधी दोन-तीन वेळां, आणि झोंप नीट लागलेली नसेल, तर मग कधी कधी चार-पांच वेळां पण जाग येते त्यासाठी...”
माझं उत्तर ऐकून आतां डॉ. कुंडल्यानी च स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!
डॉ. कुंडले, “आणि तरी तुम्ही कुठल्याही डॉक्टर कडं न जातां आजवर हें सगळं अंगावर काढत बसलात नाना ?...धन्य आहे तुमची... ...”
मी, “ अहो त्याचं काय आहे, की मला जन्मतःच ' चिडचिडी आंतडी ' आहेत- ज्याला तुम्ही लोक ' इरिटेबल बॉवेल्स ' म्हणतां- त्यामुळं पण कधी कधी अशी अचानक मूत्रविसर्गाची भावना होते...बरोबर ? मला...दिवसां पण होते, तर रात्रीचं काय घेऊन बसलात ?... ...यापूर्वीही ब-याच डॉक्टरांनी मला हें च निदान सांगितलेलं आहे, ... हा कांही रोग नव्हे , आणि यावर कुठलं विशिष्ठ औषधही नसतं, असंही ते म्हणायचे... ...म्हणून आत्तांचं हें कांही वेंगळं असेल अशी शंका मला कधी आलीच नाही... ...कशी काय येणार ?”
डॉ. कुंडल्यानी मग तिथल्या तिथं त्यांचे मूत्रसंस्था तद्न्य डॉ. शहांना दूरध्वनि केला...त्यांना दुस-या दिवशीं सकाळींच येऊन मला तंपासायला, सांगितलं...मग सोबत आलेल्या रुग्णालय सहाय्यक वैद्याला मला तांतडीनं ' विसर्गथैली ' - अर्थात् कॅथेटर - लावायला सांगितली न् म्हणाले, “ नाना...हा ब-याच काळापासून सुरूं झालेला पौरुषग्रंथी चा - म्हणजेच ' प्रोस्टेट ग्लॅण्ड ' चा विकार आहे असं मला वाटतंय...ती वाढलेली आहे...आणि त्यामुळं बराच काळ मूत्र सांठून सांठून तुमच्या मूत्राशयाचा आकार नेहमीच्या जवळपास तिप्पट झालेला आहे....!!
हे बघा... आत्तांच लावलेली ही विसर्गथैली कांठोंकांठ भंरलेली आहे... ...जंवळपास सव्वा लीटर क्षमतेची असते ही... ...!!!
डॉ. शहा या क्षेत्रातले आमचे तद्न्य आहेत...ते उद्यां सकाळीं तुम्हांला तपासतील, आणि पुढं काय-कसं करायचं, तें पण तेच ठंरवून सांगतील तुम्हांला...मी आहेच सगळं बघायला...पण आतां इथनं पुढं तुम्ही त्यांच्या ताब्यात... ...कळलं ?
आतां पोंट मोकळं - हलकं वाटतंय ना जरा तरी?...तेव्हां विश्रांति घ्या आतां रात्रभंर...”
इतकं सांगून कांही तांतडीचे औषधोपचार सुरूं करून डॉ. कुंडले निघून गेले...
आणि मी सौ. इंदिराजींकडं बघत विषण्णपणे कपाळाला हात लावला... ... !!!
दुस-या दिवशीं सकाळीं नाष्टा झाल्या झाल्या च एक जेमतेम पन्नाशी पण न गांठलेला पोरगेलासा गृहस्थ हंजर झाला..., “ जरा आडवे व्हा बरं सर...” म्हणत मला आडवा करून त्यांनं माझं संपूर्ण पोंट तंपासलं...नाडी-बिडी बघीतली, मग खाटेजंवळच्या तिपाई वर ठेंवलेले सगळ्या तंपासण्यांचे अहवाल नजरेखालनं घातले, आणि माझ्याकडं बघत त्यानं परत डॉ. कुंडल्यांच्याच प्रश्नांची सरबत्ती डागली, “ इतका प्रदीर्घ काळ हा त्रास होत असतांना तुम्ही तो अंगावर कसे काय कांढत बसलात सर ?”
मी, “ सांगतो सगळं...पण आपली ओंळख ? ”
तो पोरगा हंसला,“ माफ करा...मी परिचय द्यायलाच विसरलो... ...डॉ. कुंडल्यांचा दूरध्वनि आल्यापासून मी तुमच्या केसचाच विचार करतोय... ...मी डॉ. देवेन्दु शहा... ...मूत्रसंस्था तद्न्य...”
मी त्याच्याकडं बघत मनोमन कपाळाला हात लावला...!!...डॉक्टर शहा आमच्या मुलापेक्ष्याही लहान वयाचे दिसत होते... ...!!!
हा पोरगेटला वैद्य पुढचं सगळं निस्तरणार ?...मला गंमत च वाटायला लागली... ...
तरी प्रसंगावधान रांखून मी मग शहांना परत तें च सगळं ' चिडचिड्या आंतड्यां ' चं पुराण ऐकवलं... ...
आतां डॉ. शहानी पण स्वतःच्या कपाळाला हात लावला...,“ सर...स्पष्टच सांगायचं तर तुमची पौरुषग्रंथी बेसुमार वांढलेली आहे...आणि किती काळापासून ही वाढ चालूं आहे, तें कांही कळायला मार्ग नाही...पण एक नक्की...आपल्याला या ग्रंथीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे...आणि ती पण शक्य असेल तितक्या तांतडीनं, आणखी वेंळ अजिबात न दंवडतां केलेली उत्तम... ...पण त्यापूर्वीं तुमचं विसर्गाचं कार्य प्रथम ताळ्यावर आणणं गंरजेचं आहे... ...त्यानंतरच शस्त्रक्रिया आपल्याला करतां येईल...काय ?”
मी सौ. इंदिराजींकडं पाहिलं...त्यांचा चेहरा आतांपावेतों चिंतातुर झालेला दिसायला लागला होता...!!
तेव्हां मी पंधरवड्याची ही औषधं लिहून देतोय, ती ताबडतोब सुरूं करा... ...पंधरा दिवसांनी परत आढावा घेऊन मग शस्त्रक्रिया कधी करायची तें ठंरवतां येईल... ...
हो...आणि या औषधांच्या यादीखाली मी अजून एक अत्यावश्यक तंपासणी लिहून देतोय...ती ही चालढंकल न करतां तांतडीनं करून घ्या, आणि तिचा अहवाल हातांत पडला, की लगेच मला दूरध्वनि करां, म्हणजे मी तोही बघून घेईन...ठीक ?”
इतकं सांगून डॉ. शहा निघून गेले... ...
आम्ही डॉ. शहांनी दिलेला तो कागद सायंकळीं डॉ. कुंडले मला तंपासायला आले, तेव्हां त्यांना दांखवला,“ ही अजून कसली काय तंपासणी करायला सांगितलीय डॉक्टर ?”
डॉ. कुंडले जरा विचारात पडले, न् उत्तरले,“ तिला ' प्रतिक्षिप्त चुंबकीय लहरी प्रतिमा तंपासणी ' - म्हणजेच ' एम. आर. आय.’ म्हणतात ”...!!!
तें ऐकल्यावर आम्हां दोघांचे चेहरे काळवंडले... ... ...
तेव्हां कथेच्या सुरुवातीचा तो उपरोक्त प्रश्न मी डॉ. कुंडल्यांना विचारला होता... ...
डॉ. कुंडल्यांना माझा रोंखठोंक स्वभाव ठाऊक असल्यामुळं त्यांनी पण तितक्याच रोंखठोंकपणे उत्तर दिलं," होय नाना... ...मूत्राशयाचा आकार जंवळपास तिप्पट झालाय म्हणून आतां तुमच्या डोंक्यातली अपशंका आम्हांला पण यायला लागलेली आहे... ...पण उगीच चिंता करूं नकां...केवळ पोंटात अजून कुठं भंलतं सलतं कांही झालेलं नाहीय ना ?...आणि हें जें काय झालेलं आहे, तें जिवावरचं नाहीय ना ? ही शंका फक्त सफाचट् फेंडून घेण्यासाठी ही तंपासणी करणं अगत्याचं आहे...तेंव्हां ती करून घ्या लवकर... ...इथनं जंवळच आहे तें तंपासणी केंद्र...तिथला संपर्क दूरध्वनिक्रमांक पण मी इथं लिहिलेला आहे... ...ठीक ?
आतां इथं व्यर्थ थांबून तरी तुम्ही काय करणार ? तेव्हां मी आतां लगेच तुम्हांला डिस्चार्ज द्यायची व्यवस्था करतोय... ...' एम. आर. आय.’ चा अहवाल हातांत पडला, की लगेच आम्हांला तो दांखवायला या इथं...काळजी काय करायची ती आम्हांला करूं द्या...तुम्ही नकां करत बसूं... ..."
इतकं सांगून डिस्चार्ज च्या दाखल्यावर सही करून डॉ. कुंडले निघून गेले, आणि सौ. इंदिराजी नां गंदगंदून आलं... ...
पुढं कितीतरी वेळ मी त्यांना शांत करायची धंडपड करीत खाटेवर निश्चलपणे बसून होतो... ...
एव्हांना रात्रीचे आठ वाजत आलेले होते...
सौ. इंदिराजी रुग्णालयाचं देयक तंपासून चुकतं करायला गेल्या...
मी जमेल तशी कमरेला लटकणारी विसर्गथैली सांभाळत आमचा बाडबिस्तरा गुंडाळला ... ...
आणि आम्ही रुग्णालयातनं निःसंवादी अवस्थेत तसेच घरीं परत आलो... ... ...
तारीख होती शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२४.
आल्या आल्या बरोबरच्या बाडबिस्त-याची व्यवस्था लावून सौ. इंदिराजी रात्रीच्या भोजनाच्या तंयारीला लागल्या, न् मी चटकन् स्नान उरकून घेतलं, आणि निरंजन उजळवून सर्वप्रथम मातोश्रीं च्या चरणीं मस्तक टेंकून सायंकाळचा गायत्री केला...
तोंपावेतों रात्रीचे ९ वाजत आलेले होते...
मी, “ आतां ही तंपासणी तर बोकांडीं बसलेलीच आहे... ...तर मग उगीच उशीर कश्याला ?...आत्तांच करून बघतो दूरध्वनि तंपासणी केंद्राला...”
सौ. इंदिराजी,“ करा फोन लगेच, आणि ताबडतोबीची वेळ कुठली मिळतीय तें बघा ... उगीच नस्ता उशीर नको व्हायला...”
म्हणून मी डॉ. कुंडल्यांनी दिलेल्या क्रमांकावर दूरध्वनि लावला...
दूरध्वनि होईतोंवर सौ. इंदिराजीं चा प्रश्न आलाच, “ काय झालं?...झाली वेळ मुक्रर तंपासणीची ? ”
मी त्यांच्याकडं बघत फक्त हंसलो...अन् सौ. इंदिराजी तंडकल्याच, “ हंसायला काय झालंय तुम्हांला असं ?...ऑंं ?... ...हा काय हंसण्यावारीं न्यायचा विषय आहे काय ?”
मी परत हंसलो,“ सगळी चिंता सोडा इंदिराजी... ...मातोश्री नी आतां सगळंच त्यांच्या ताब्यात घेंतलेलं दिसतंय... ... सगळं कांही ठीक होईल...फ़क्त धीर नकां सोडूं अजिबात...”
सौ. इंदिराजीं, “ म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हांला ? कधी कधी ना... ...कांही कळतच नाही तुमचं वागणं मला...कधीची वेंळ मिळाली तंपासणीसाठी? ”
मी,“ या महिनाभंराच्या सगळ्या तारखा न् वेळा आधीच आरक्षित झालेल्या आहेत...”
सौ. इंदिराजी,“ आणि हें ... हें ... असं हंसताय तुम्ही ? ”
मी, “ फक्त २९ नोव्हेंबर ची सकाळीं बारा वाजतांची एकमेव वेळ मोकळी होती...ती मुक्रर करून टांकली... ...”
सौ. इंदिराजी,“ मग यात हंसण्यासारखं काय झालंय ?”
मी,“ सांगितलं ना मी , की सगळी चिंता सोडा म्हणून ?...२९ तारखेला मंगळवार आहे...!!! ”
सौ. इंदिराजी,“...खरंच ?... ...बरं झालं बाई...ही मातोश्रीं ची कृपा च म्हणायला हंवी... आधी हळद कुंकू घेते वाहून त्यांना... ..."
सकाळचा गायत्री करून ठंरवलेल्या वेळेला मी एकटाच तंपासणी केंद्रावर गेलो...
कसलंही विघ्न न उपटतां नियोजित तंपासणी त्या मंगळवारीं च पार पडली ...
सायंकाळीं सात वाजेपर्यंत तपासणी ची प्रतिमाचित्रं आणि टंकलिखित अहवालही हातांत पडला...
त्यात कांहीही चिंताजनक आलेलं नव्हतं !!
जगदंब...जगदंब...
फक्त पौरुषग्रंथी बरीच वाढल्याची मात्र नोंद होती...जे निदान डॉ. शहा आणि कुंडल्यांनी आम्हांला आधीच सांगितलेलं होतं... ... ...
दुस-या दिवशीं सकाळीं मी कुंडले डॉक्टरानां सदर अहवाल दांखवला,“ रिपोर्ट छानच आलाय नाना...सुदैवी आहांत... कांहीच चिंताजनक नाहीय यात...आतां हें घेऊन डॉ. शहा ना भेंटा, आणि ठंरवा पुढचं सगळं...पण एक ध्यानांत घ्या नाना... ...आतां मात्र चांलढंकल अजिबात न करतां लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून घ्या...”
मग घरीं येंऊन डॉ. शहा ना पण दूरध्वनि केला... ...
,“ छान... ...या शुक्रवारीं या रुग्णालयात भेंटायला...मी आहे त्या दिवशीं तिथं...” डॉ. शहा.
मी फक्त सौ. इंदिराजीं कडं बघत भिवया उंचावल्या... ...
तश्या सौ. इंदिराजी सूचक पण प्रसन्न हंसल्या...
मातोश्री नी खंरोखंरीच सगळं आपल्या हातांत घेंतलेलं दिसत होतं...!!!
इतकं, की त्यानंतर डॉ. शहांशी पण आमचे अतिशय चांगले संबंध जुळायचे होते, हें आम्हांलाच त्या वेळीं तरी ठाऊक नव्हतं... ...
शुक्रवारीं डॉ. शहा पण तंपासणी अहवाल बघून म्हणाले,“ नशीबवान आहांत सर...खरं सांगायचं तर आतांपर्यंतचा इतिहास बघून मीही जरा काळजीतच होतो... ...खोटं कश्याला बोलूं ?...पण अगदी छान निर्दोष आलाय ' एम. आर. आय. तंपासणी ' चा अहवाल ...अभिनंदन...एका दिव्यातनं पार पडलात म्हणून...आतां मात्र शस्त्रक्रियेचा निर्णय लंवकर घ्या...”
मी,“ केव्हां करायची शस्त्रक्रिया ?”
डॉ. शहा,“ तें तुम्ही ठंरवायचंय...तुम्ही म्हणाल तेव्हां... ...उद्याच केली, तर सर्वोत्तम...काय ?”
आतां सौ. इंदिराजी नी तोंड उघडलं,“ इतक्या तंडकाफडकीं शस्त्रक्रियेचं कसं काय ठंरवतां येईल डॉक्टर ?... ...आधी मुलांबरोबर बोलून घ्यावं लागेल, पैश्याअडक्याची तजवीज करावी लागेल, विमा कंपनीशी पण बोलावं लागेल...आंठवडाभंर तरी लागेल ना आम्हांला ही सगळी व्यवस्था लावायला ?”
डॉ. शहा परत हंसले,“ हो कळतंय मला तें सगळं... ...मग माझ्याकडं निर्देश करीत पुढं म्हणाले," पण सुदैवानं काकां च्या ' एम. आर. आय.’ चा अहवाल अगदी विनाखोट स्वच्छ आलाय...तेव्हां आतां उगीच धोका न पत्करतां लवकरात लवकर शस्त्रक्रिया उरकून मोकळं झालेलं चांगलं , असा माझ्या सांगण्याचा मतलब... ...”
समोर बसलेल्या पोरगेल्या माणसाला , अहो-जाहो संबोधायला मला जरा विचित्रच वाटत होतं...बरं, नजरेला त्यांचं लहान वय तर दिसत होतं...त्यामुळं अजाणतेपणीं कदाचित ' अरे बाबा...’ असलं कांहीतरी तोंडातनं निघायची शक्यता... ...तेव्हां मी प्रथम त्याचीच व्यवस्था लावायला तोंड उघडलं...,“ एक विचारूं डॉक्टर...तुमची हंरकत नसेल तर ? ”
डॉ. शहा,“ हो...विचारा की खुशाल काका...तुम्ही पेशंट च आहांत माझे...म्हणून तुम्हांला तो अधिकार पोंचतोच की...”
मी,“
तुमचं
वय काय डॉक्टर ?”
डॉक्टर
आतां पुन्हां हंसले...,“
' हा
पोरगेलासा दिसणारा डॉक्टर
सगळं धंडपणे पार पाडील काय
?’ अशी
शंका वाटतेय म्हणून विचारताय
ना काका ?...
...कांही
हंरकत नाही विचारलंत म्हणून...अहो
माझ्या दिसण्यामुळं ब-याचदां
पेशंटना अशी शंका येते
खंरी...त्याला
काय करायचं?...असो...माझं
वय सत्तेचाळीस...”
सौ. इंदिराजी आतां सूचक हंसल्या, न् मला म्हणाल्या,“ अहो...म्हणजे चक्क आपल्या मीलनच्या च वयाचे आहेत की हे डॉक्टर...”
मी,“ आणकी एक दुसरंच कारण आहे मी वय विचारण्याचं... ...”
,“ काय असेल ते मोकळेपणानं बोला...कांही हंरकत नाही माझी...” , डॉ. शहा उत्तरले...
,“ त्याचं काय आहे डॉक्टर...की तुम्ही आत्तांच मला ' काका ' म्हणून संबोधलंत...तेव्हां या नात्यानं मी तुम्हांला एकेरीत संबोधलं तर चालेल काय ?...काय होतं ना, की समोर बसलेल्या माणसाचं वय तर नजरेला जाणवत असतंच...त्यामुळं बोलतांना कधीतरी अभावितपणे कां होई ना, ‘ बाबा रे, अरे बाबा ‘ असलं कांहीतरी तोंडतनं बाहेर पडायची शक्यता दाट असते...आणि समोर बसलेल्या माणसाचा निष्कारण गैरसमज होऊं शकतो...आमच्या मनांत तसं कांही नसलं तरी... ...पण कांही लोकांना एकेरीत संबोधलेलं आवडतही नाही... ...म्हणून आपलं स्पष्टच विचारतो...”
डॉक्टर आतां मात्र आकर्ण हंसले,“ कांही हंरकत नाही काका...तुम्ही माझ्या आई-वडिलांच्याच वयाचे तर आहांत...माझं पहिलं नांव देवेन्दु... ...खुशाल ' अरे देव ' म्हणून संबोधलंत तरी आवडेलच मला तें... ...आणि काकू...तुम्ही सुध्दां...”
त्या भेंटीनंतर डॉ. शहांचा आमच्यापुरता जो ' अरे देव ' झाला, तो आजतागायत तसाच टिकून राह्यलाय...!!
मी,“ आतां शस्त्रक्रियेबद्दल... ...ती लंवकरात लंवकर करणं हिताचं हें मला पटलंय देव...
आतां तुला उघड सांगायलाही हंरकत नाही...आज इथं येण्याआधीं गेल्या आंठवडाभंरात आम्ही
अणखी दोन तद्न्य डॉक्तरांची या बाबतीतली मतं आजमावलीत..."
डॉ. शहा,“ अगदी योग्य तेंच केलंत काका...आणि नैतिकदृष्ट्या तुमचा तो अधिकारही असतो...”
मी," याखेरीज अणखी एका अतिविशिष्ठ रुग्णालयाचंही मत घेतलंय आम्ही...आणि
सगळ्याचा विचार करून आम्ही या शस्त्रक्रियेसाठी अखेर तुझी निवड केलेली आहे
देव... ...ती सार्थ करशील असा ठाम विश्वास बाळगूं ना मी ? "
डॉ. शहा," खूप बरं वाटलं हें ऐकून काका...तुम्ही रुग्णालयात फक्त लवकरात लवकर दाखल
व्हायचं...त्यापुढची सगळी जबाबदारी माझी असेल याची खात्री बाळगा तुम्ही... ...सगळी
यथातथ्य चंवकशी करून तुम्ही माझी निवड केलीत, यातच मला सगळं मिळालं..."
मी," फक्त माझी एकच अट आहे...एवीतेवी हें दिव्य करायचंच आहे, तर तें चांगला दिवस आणि
उत्तम काळवेळ बघून कां करूं नये ?...”
डॉ. शहा,“ म्हणजे मुहूर्त बघून कार्य करावं असं म्हणताय काय तुम्ही?...माझी कांहीच हंरकत नाही त्याला ... फक्त तुम्हांला मला दोन तीन दिवस तरी आगाऊ कल्पना द्यावी लागेल त्याची, कारण शस्त्रक्रिया दालन आधीं आरक्षित करावं लागतं ना...म्हणून...पण मुहूर्त कांढणार कोण ?”
मी,“ मी स्वतःच... ... आज तीस तारीख आहे...बरोबर ?...तर मी दोन दिवसांत तुला येत्या
पंधरवड्यातले सगळे मुहूर्त कालावधी तास मिनिटांत कांढून कळवतो...तुझं काम एव्हढंच '
ठंरवलेल्या मुहूर्ताच्या कालावधीतच तुझं काम सफाचट् पुरं करून मोकळं होणं ‘... ...जमेल ?”
डॉ. शहा,“ कां नाही जमणार ?...साधारण तीन एक तासांचा वेळ द्या मला ... म्हणजे झालं...”
सौ. इंदिराजी,“ बापरे...इतकी मोठी शस्त्रक्रिया असते ही ?”
डॉ. शहा,“ तसं नव्हे काकू... ...माझं काम – म्हणजे प्रत्यक्ष्य शस्त्रक्रिया - साधारण तासाभंरातच उरकतं... ...पण त्याआधी बरीच पूर्वतयारी करावी लागते ना इथल्या लोकांना ?...त्याला बराच वेळ लागतो...”
मी,“ तसं नव्हे देव...माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, की तूं आत्तांच जें तासाभंराचं ' माझं काम ' म्हणालास ना...तेंच मुहूर्ताच्या वेंळेत सुरूं होऊन मुहूर्तकालावधीतच पूर्ण व्हायला हंवं...मग त्या अंदाजानं बाकीची तंयारी किती वेळ आधी सुरूं करायची तें तुझं तूं च ठंरव...तारखा-वेळां कांढून झाल्या की तुला पांठवतो, न् दूरध्वनिही करतो...तेव्हां मग बोलून तारीख वेळ नक्की ठंरवूं आणि करून टाकूं काय चिरफाड असेल ती...”
डॉ. शहा,“ चालेल...कळवा मला काका...पुढची तमाम जबाबदारी माझी...तुम्ही अजिबात कसली काळजी करायची नाही...काकू...हें शेंवटचं खास तुमच्यासाठी सांगतोय...काय ?”
झालं...दुस-या दिवशीं च मी बाकी सगळी कामं बाजूला सारून जो ठिय्या मारला, तो डॉ. शहांना २ पासून ३० डिसेंबर च्या कालावधीले सगळे च्या सगळे मुहूर्त रवाना करूनच थांबलो... ...
दुस-या दिवशीं दुपारीं ' आतां पुढचं कसं काय मार्गीं लावायचं ' यावर दुपारीं चहा घेत आमची घरात चर्चा चाललेली होती...कन्या सौ. मुग्धा उर्फ बापू न् जावई चि. श्रीनित घरीं सगळं ठंरवायला आलेले होते...वेंळ होती दुपारीं साडेचार ची... ...
आश्वस्त रुग्णालय आमच्या घंरापासून अगदी पांच मिनिटांच्याच अंतरावर आहे, आणि डॉक्टर पण चांगले भेंटलेले आहेत...तर तिथंच शस्त्रक्रिया करून घ्यावी...उगीच दहा मैल अंतरावरच्या सुपर स्पेशॅलिटीच्या फंदात पडूं नये, असं बापू-श्रीनित चं ही मत पडलं... ...
तेंव्हढ्यात माझा भ्रमणध्वनि खंणाणला... ...
डॉ. शहांचा च फोन होता...
डॉ. शहा,“ नमस्कार काका...मी देव बोलतोय... ...परवां - म्हणजे तीन तांरखेलाच तुम्ही दिलेल्या वेळेत करून टांकूं तुमची शस्त्रक्रिया... ...चालेल ना ?”
तेंव्हढ्यात सौ. इंदिराजी नी मला खूण केली..., “ एक मिनिट...जरा थांब हं देव फोनवरच ...” म्हणत मी सौ. इंदिराजी ना विचारलं, “ काय म्हणताय तुम्ही ? ”
सौ. इंदिराजी,“ अहो...तीन तारखेला बुधवार आहे... ...तेव्हां मंगळवारीं २ तारखेला होतंय काय ?म्हणून विचारा ना देव ला ... ...”
मी देव ला तसं विचारलं...
देव चा भ्रमणध्वनितनं आवाज आला,“ सॉरी...काका...१० तारखेपर्यंत चे सगळे दिवस खरंच भंरलेले आहेत...”
मी मग सौ. इंदिराजी ना म्हटलं,“...जाऊं दे...आतां सगळं मातोश्रीनी च हातांत घेतलेलं आहे ना ?...त्यांत निष्कारण लुडबुड करायला नको आपण...त्यांच्या मनांत असेल तसंच होंऊं दे आणि " तीन तारखेला चालेल " म्हणून सांगूनही टांकलं डॉक्टरांना...
देव,“ काका...शस्त्रक्रियेची तीन तारखेची तुम्ही कांढलेली वेळ आहे सकाळीं अकरा ते बारा पन्नास...बरोबर ना ?...तेव्हां तुम्ही तीनेक तास तरी त्याआधी...म्हणजे उशिरात उशिरा सकाळीं ८ वाजेपर्यंत च दांखल व्हा रुग्णालयात...आधी च्या तयारीला तितका वेळ लागेल...ठीकाय ना ?”
मी ' ठीकाय ' म्हणून भ्रमणध्वनि खालीं ठेंवला... ...
तथापि मातोश्रीं च्या मनांत कांही वेंगळं च असावं... ... ...
झालं... ... २ तारखेला संध्याकाळीं च कन्या चि. सौ. बापू , गुंडाप्पा , आणि श्रीनित घंरीं दांखल झाले.... ...
सौ. इंदिराजी ना रुग्णालयात माझ्याबरोबर रहावं लागणार होतं, म्हणून चि. बापू नी घंराचा ताबा घेतला...मी आणि सौ. इंदिराजी नी तीनेक दिवसांसाठीच्या रुग्णालय निवासासाठी लागणा-या सामानसुमानाची बांधाबांध केली, आणि आम्ही ३ तारखेला सकाळीं ८ वाजतांच रुग्णालयात दांखल झालो... ...
देव नं सगळ्या सूचना तिथल्या लोकांना बहुधा आगाऊ देऊन ठेंवलेल्या असाव्यात...
दांखल झाल्या झाल्या प्रवेशिका भंरून आमची रवानगी आमच्या विशेष कक्ष्यात झाली...
तिथं जरा सामान सुमान मांडेतोंवर मागोमाग एक परिचारिकाबाई दांखल झाल्या...
त्यांनी माझा रक्तदाब-नाडी वगैरे तंपासलं...हृदयस्पंदनांलेखही नोंदवून घेतला...
मग मला खाटेवर आडवा करून डाव्या हाताच्या शिरेत सुई टोंचली न् तिला सलाईन ची ठिबक बाटली जोडली, आणि ती खाटेजंवळच्या दांडक्याला उलटी टांगली... ...
मग सौ. इंदिराजीं ची शल्यक्रियेच्या मसुद्यावर अनुमति स्वाक्षरी घेंतली.
नऊ वांजतां डॉ. कुंडले त्यांच्या लव्याजम्यासह आले...त्यांनी मला तंपासलं, न् हंसले,“ काय नाना...करायची ना तुमच्या भाषेत ' चिरफाड ' आतां ?... ...करूं ना सक्षमपणाच्या दांखल्यावर सही ?...नाही...म्हणजे अजून माघार घ्यायची असेल तर तसं सांगा...!!”
मी फंक्त हंसलो... ...
शस्त्रक्रियेची वेंळ अकरा वाजतांची ठंरलेली होती... ...
चि. बापू-श्रीनित घरातलं सगळं आंवरून पावणे दहा वाजतां रुग्णालयात आले...
आणि दोन परिचारिकांच्या मध्ये चाकांच्या खुर्चीवर ढगळ डगला घांलून बसलेल्या मला बघून चि. बापू नी उन्नतांगुष्ठही दांखवले...,“ ऑल द बेस्ट बाबा...एन्जॉय युवर सर्जरी...!! ”
पोरांच्या कळां कांढायच्या संवयी पंचेचाळीशीतही तश्याच टंवटंवीत राहिलेल्या दिसत होत्या...!!!
सौ. इंदिराजीं चा चेहरा मात्र जरा तणावग्रस्त च दिसत होता...
चि. बापू ,“ आई...अशी सीरियस काय होऊन बंसली आहेस तूं ?... ...अगं अगदी मामुली असते ही शस्त्रक्रिया...तासाभंरातच बाबा बाहेर येतील बघ...अगदी आरामात... ...काय ?”
सौ. इंदिराजी नी माझ्याकडं नुस्तं च बघितलं... ...
सव्वादहा वांजले, आलेल्या वैद्यबाई न् परिचारिका माझी खुर्ची ढंकलत शस्त्रक्रिया दालनाकडं घेऊन निघाल्या,आणि सौ. इंदिराजीं च्या थैलीत असलेला माझा भ्रमणध्वनि खंणाणला... ...
त्यांनी तो उघडून बंघितला न् माझ्या हातात दिला...,“ बोला...देव च आहे फोनवर...”
मी,“....?????? ”
सौ. इंदिराजी,“...हं बोला तुम्ही च ...”
मी भ्रमणध्वनि ध्वनिवर्धकावर टांकला ,“ नमस्कार देव...काका बोलतोय...”
भ्रमणध्वनीमधनं डॉ. शहांचा आवाज दालनभंर घुमला,“ ...खोः...खोः...खाक्... खाक्... खुक्...एक्सट्रीमली सॉरी काका... आज शस्त्रक्रिया कांही केल्या होऊं शकणार नाहीय... ...!!! ... ”
आम्ही उडालोच,“ बा S S S S S परे... ...काय झालं बाबा आतां...?”
डॉ. शहा,“ अहो...काल रात्रीपासून मी स्वतःच बेदम जंतुबाधेनं आडवा झालोय...अंगात एकशे तीन ताप भंरलेला आहे...चौपाईवर उठून बंसवत देखील नाहीय मला... ...मग कशी काय होणार तुमची शस्त्रक्रिया आत्तां अकरा वांजतां ?”
आम्ही सगळ्यानीं च आतां हंतबुध्द होत कपाळांना हात लावले...!!
सोबत असलेल्या परिचारिका नी सहाय्यक वैद्यबाईही आं वांसून आमच्याकडं बघायला लागल्या...!!!
मी,“ जगदंब...जगदंब...मग आतां काय करायचं रे ? सगळी पूर्वतयारी पुरी करून मला शस्त्रक्रिया दालनांत न्यायला दोन तीन परिचारिका, न् तुझ्या सहाय्यक वैद्यबाई पण हंजर झाल्यायत इथं...!!!...आतां काय करायचं ?”
डॉ. शहा,“ काका... व्हेरी सॉरी हें असं झालंय म्हणून...”
मी,“ अरे जे कांही झालंय त्यात तुझा कांहीच दोष नाहीय... ...ह्या ' सॉरी बिरी ' ला मारो गोली... ...समजूं शकतोय मी सगळं... ...पण करायचं काय आतां असल्या परिस्थितीत ?”
डॉ. शहा,“ कांही काळजी करूं नकां काका तुम्ही... ...माझ्या सहकारी डॉक्टर आहेत ना तिथं ?...त्यांना फोन द्या जरा...मी ताबडतोब तुम्हांला डिस्चार्ज द्यायची व्यवस्था करतो...
मी,“ म्हणजे ही सगळी केलेली तयारी वांया गेली म्हणायचं....असंच ना ?”
डॉ. शहा, “ तें सगळं माझ्यावर सोडा तुम्ही काका...न् डिस्चार्ज घ्यायच्या तयारीला लागा फक्त...रुग्णालय तुम्हांला केलेल्या तंपासण्या आणि दिलेल्या औषधांखेरीच इतर कसलं कांही बिल लावणार नाही, हें बघेन मी... ...आणि जितकं काय देयक आत्तां तुम्हांला भंरावं लागेल ना, त्याचं काय करायचं, तें बघूं नंतर... काय ? ”
मी,“ हें बघ देव...हें नाही पटणार आम्हांला ... ...अरे तूं पण माणूसच आहेस ना रे माझ्यासारखाच ?...स्वतः च आडवा पडलास तर तूं तरी काय करूं शकतोयस ?....आणि समज, की तुझ्या जागीं जर मी असतो, तर मी तरी काय करूं शकलो असतो सांग मला ? ”
डॉ. शहा, “ काका...तें सगळं डोंक्यातनं कांढून टांका आत्तां...न् सरळ डिस्चार्ज घेंऊन घरीं जा तुम्ही ...यातनं मी उठलो, कीं तांबडतोब पहिला दूरध्वनि तुम्हांलाच करतो...न् तेव्हां परत ठंरवूं शस्त्रक्रियेचा मुहूर्त... ...अगदी तुम्ही म्हणाल तेव्हांचा... ...ठीकाय ना ?...आतां भ्रमणध्वनि जरा माझ्या सहाय्यिकेला द्या बरं...”
मी हस्तयंत्र शेंजारी उभ्या असलेल्या वैद्यबाईकडं दिलं...
पुढच्या अर्ध्या तासातच तें सगळं कडबोळं निस्तरून आमची वरात शस्त्रक्रियादालनाच्या उंबरठ्यावरनं परतून थेट स्वगृहीं पोंचली ... ...!!!
जगदंब...जगदंब...
आणि घरांत पाय टांकल्याक्षणीं खुद्द बापू-इंदिराजी नी च कोंचांवर बसकणीं मारत आपापल्या कपाळांना हात लावले... ...,“ बाबा... ...खरंच धन्य आहांत तुम्ही, न् तुमची शस्त्रक्रिया...” !!!
मी, “ जगदंब... जगदंब ...!! करां आतां माझ्या सकाळच्या स्नानाची न् गायत्रीची तयारी.... "
सौ. इंदराजी,“ बाई...बाई...बाई...खरंच...नवल च म्हणायला हवं हें...आपल्याच बाबतीत हीं असलीं कडबोळीं कां होतात हो सदा न् कदा ?”
मी हंसलो,“ मातोश्रीं चा आपल्यावर खूप जीव असावा...काय माहीत ? ”
सौ. इंदराजी,“ पण हें म्हणजे अति च झालं की नाही म्हणते मी ? ”
मी परत हंसलो,“ येतां मातोश्रीं च्या मनां...”
आतां सौ. इंदिराजीनी च खोः खोः हंसत ओंवी पुरी केली, “ कोण थोंपवी नारायणा ? ...खरंच धंन्य आहे आपल्या मातोश्रीं ची पण... ...असला अनुभंव कुणी उभ्या जन्मात घेंतला नसेल... ...बघितलंत ना, त्या परिचारिका न् सहाय्यक डॉक्टरीण बाईनी पण आवाक् होत कसे कपाळांना हात लावले तें ?... ... ...नेमकं काय असेल हो मातोश्रीं च्या मनांत ? ”
पोरं म्हणालीं, “ तें केवळ मातोश्री च जाणे...जगदंब...जगदंब...!!!”
मी, “ जें काय मातोश्रीं च्या मनांत असेल ना, तें आपल्या महाकल्याणाचंच असणार, एव्हढं मात्र दगडावरच्या रेघेसारखं...त्याची बालंबाल खात्री बाळगा तुम्ही...”
," हे कां मला सांगायला हंवंय ?...पण आतां कधीं पार पडणार हें सगळं, तें पण मातोश्री च जाणे...!!! " म्हणत सौ. इंदिराजी मग रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या, न् मी स्नानगृहाकडं मोर्चा वंळवला... ... ...
पुढचे दोन तीन दिवस असेच टांगणीला लागून गेले... ...पण डॉ. शहांचा दूरध्वनि येईपर्यंत केवळ वाट बघण्यांशिवाय दुसरं कांहीच करतां येत नव्हतं... ... ...
६ तारखेला शुक्रवार होता... ...तीन दिवसांनी म्हणजेच ९ डिसेंबर ला आमच्या विवाहाचा पन्नासावा वाढदिवस येत होता. तो कसा साजरा करायचा यावर घरात त्या दिवशीं सायंकाळीं खलबतं चाललेलीं होतीं सौ. बापूंची कंपनी घरीं आलेली होती... ...चिरंजीव मिली-सौ. रसिका आणि चि. अथर्व ऊर्फ भीमाप्पा दृष्यदूरध्वनीवर होते.
त्यांची खलबतं चाललेलीं होतीं...सौ. इंदिराजीं ची स्वयंपाकघरात कांहीतरी लगबग चाललेली होती...
स्नान उरकून गायत्री करीत मी मातोश्रीं च्या पुढं नतमस्तक झालेलो होतो... ...
आणि तेंव्हढ्यांत माझा भ्रमणध्वनि खंणाणला... ...
मी ' जगदंब जगदंब ' म्हणत तो उचलून कानाला लावला,“ नमस्कार...मी नानिवडेकर बोलतोय...”
पलीकडून आवाज आला, “ हॅलो काका...मी देव बोलतोय... ...”
मी, “ देव ?...अरे वा...काय म्हणतोयस ?... ...झालास कां बरा दुखण्यातनं ?...कसं काय वाटतंय आतां ?”
वैद्याला च उपरोक्त प्रश्न विचारणारा मी जगातला बहुधा पहिलाच आणि एकमेव रुग्ण असेन कदाचित् ....!!
डॉ. शहा, “ थॅंक यू काका...आज च हिंडाफिरायला लागलो...म्हणून तुम्हांला फोन केला लगेच... ...”
आमच्या सौ. इंदिराजीं चे कान महातिखट..., “ कुणाचा...देव चा दूरध्वनि आहे काय ?”
हातांतल्या फंडक्याला हात पुसत त्या शेंजारी येऊन उभ्या राहिल्या, “ काय म्हणतोय देव ?”
मी, “ अरे वा...छानच खबर दिलीस की...”
देव, “ तर मी म्हणतोय, की चोरवा...म्हणजे येत्या १० तारखेला शस्त्रक्रिया करून टांकूं या...आधीच खूप उशीर झालाय...चालेल तुम्हांला...?”
मी, “ अरे पण तुझ्या या पंधरवड्यातल्या सगळ्याच तांरखा गंळफटलेल्या आहेत असं म्हणत होतास ना रे तूं ?... ...म S S S S S ग ? ”
देव, “ झालं असं काका, की दहा तारखेला ज्याची शस्त्रक्रिया करायची ठंरवलेली होती ना... ...त्या पेशंट ला मधुमेह आहे...आणि त्याची रक्तशर्करा अजून तरी ताळ्यावर आलेली नाही...त्यामुळं ती शस्त्रक्रियाच रहित करावी लागली, आणि तेव्हढा एक च दिवस मोकळा झालाय...म्हणून तुम्हांला फोन केला लगेच... ...मग काय करायचं ?...लागूं पुढच्या व्यवस्थेला ?”
मी देव ला कळवलेले सगळे मुहूर्त माझ्या पक्के स्मरणात होते..., “ अरे पण माझ्या अांठवणीप्रमाणं दहा तारखेला दुपारी २:५६ तें ३:४८ एव्हढाच कालावधी निघालाय मुहूर्ताचा... ...होईल तेंव्ढ्यात सगळं धंडपणे ? “
देव, “ त्या ची तुम्ही अजिबात काळजी करूं नकां काका... ...ती आख्खी जबाबदारी माझी आहे ... ...”
सौ. इंदिराजी, “ बापू...वार कोणता येतोय बघ बरं जरा १० तारखेला ? ”
चि. बापू आतां हंसायलाच लागले, “ आई... ...खरं च...कमालच झालीय बघ सगळी...१० तारखेला मंगळवार येतोय...” !!!
मी आतां थंक्क होत कपाळाला हात लावला...
' जगदंब...जगदंब ' म्हणायचंही मला सुचलं नाही...!!!
सौ. इंदिराजीं चा चेहरा आतां उजळला , “ खरंच धन्य आहे मातोश्रीं ची आपल्या... ..."
आणि पांठोपांठ कपाळाला हात लावत त्या चीत्कारल्या, " अहो पण आदल्या दिवशीं च ९ तारखेला आपल्या विवाहाचा पन्नासावा वाढदिवस आहे ना हो ?... ...त्याचं काय करायचं आतां...?”
आतां मात्र आपापल्या कपाळांना हात लावून सगळेच खीः खीः खीः खीः करायला लागले... ...!!
चि. बापू, “ कॉंग्रॅट्स बाबा...खरोखंरीच धन्य आहे तुमची... ...म्हणजे आदल्या दिवशीं लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करून दुस-या दिवशीं च रुग्णालयात दांखल होणारे तुम्ही जगात एकमेव हीरो-हीरॉईन ठंरणार...' इट वुइल बी अ गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड '... ...वा...वा...आई-बाबा द ग्रेट...” !!!
सौ. इंदिराजी, “ आंचरटपणा पुरे झाला तुमचा... ...अहो...माझं तर डोंकं च गंरगंरायला लागलंय आतां...मातोश्रीं चा हा तडाखेबंद ' तथाSस्तु ' बघून... ...काय करायचं आतां ?”
मी, “ चालेल देव...तूं लाग सगळी व्यवस्था करायला...कधीं दांखल व्हायला लागेल आम्हांला रुग्णालयात ?”
देव, “ दुपारीं दोन चा मुहूर्त...म्हणजे भंरपूर वेळ आहे मला पूर्वतयारी करायला... ...साधारण दहा च्या सुमाराला दाखल झालात तरी चालेल रुग्णालयात...बाकी सगळं माझ्यावर सोडा तुम्ही ...मग?...टांकूं सगळं पक्कं करून ?”
मी,“ हो...हो...पक्कं करून टांक तूं ... ...होतो आम्ही दांखल रग्णालयात दहा वाजेपर्यंत ...जगदंब ...जगदंब...”
देव, “ काय म्हणालात काका ?”
मी हंसलो, “ तुला नाही रे...काकू नां म्हटलं मी...”
सौ. इंदिराजीं च्या कपाळावर जरा सूक्ष्मशी आंठी पडली... ... “ मातोश्रीं चं ना... तुमच्याही पलीकडचं आहे बघा सगळं... ...काय असतं त्यांच्या मनांत...कांही थांगपत्ता च लागत नाही कधी...”
मी, “ जगदंब...जगदंब...आपल्या पांठीशी असलेल्या त्यांच्या वरदहस्ताबद्दल कधी शंका तरी आलीय काय तुम्हांला ?...
|| खात्री, तुझ्या वरदहस्ताइतुकी
आयुष्य जगतां तुडवीत कांटे
माझ्या च श्वासोंछ्वासांप्रतीही
अंबे न मजला बिल्कूल वाटे ||
होय ना ?”
सौ. इंदिराजी च्या कपाळींची आंठी आतां पसार झाली, “...होय...आहे खरं तसं...तुम्ही नेहमी म्हणतां ना तें च खरं आहे बघा...”
मी, “...काय म्हणायचं आहे तुम्हांला ?”
चि. गुंडाप्पा, “ आजो...अरे आज्जी ला म्हणायचंय...”
सौ. इंदिराजी, “ येतां मातोश्रीं च्या मनां...”
चि. बापू हंसले, “ कोण थोंपवी नारायणा ?... आतां पन्नासावा वाढदिवस आटोंपला रे आटोपला, की थेट ' आश्वस्त रुग्णालय ‘... ...” !!!
आणि अखेरीस शब्दशः तसंच झालं... ...
आदल्या दिवशीं ९ तारखेला त्या तंसल्या परिस्थितीत लग्नाचा वाढदिवस-- मग तो कितवा कां असेना -- दंणक्यात साजरा करणं शक्यच नव्हतं...सौ. बापू ,चि. श्रीनित, आणि चि. गुण्डाप्पा त्या दिवशीं घरीं आले... ...चि. मिली, सौ. क्षिति , अन् चि. अथर्व ऊर्फ भीमाप्पा नी तें इंग्लंडमध्ये असल्यामुळं दृष्यदूरध्वनीवर च हंजेरी लावली... ...आमचा वाढदिवस घरींच अगदी साधेसुधेपणानं गोडाधोडाचं भोजन करून साजरा झाला, आणि दुस-याच दिवशीं सकाळीं दहा वांजतां आम्ही ' पुनश्च हरि ॐ ' करीत आश्वस्त रुग्णालयात दांखल झालो... ...!!!
देव दिलेल्या शब्दाला पुरेपूर जागला होता...
रुग्णालयात दांखल झाल्यापासून केवळ वीसेक मिनिटांतच सगळे सोपस्कार आंवरून आम्ही आमच्या खोंलीत दांखल झालो.
मग परत एकदां रक्तदाब तंपासणी-मधुमेहासंबंधी चंवकशी, हृदयस्पंदनालेख इत्यादि सोपस्कार पार पडले....साडे अकरा वांजतां डॉ. कुंडले भेंटायला आले...त्यांनी सगळे अहवाल नजरेखालून घातले...नाडी-बिडी बघितली आणि हंसले, “ सगळं छान ठीक ठाक आहे नाना... ... मग... या वेळेला तरी नक्की ना ?”
मी त्यांच्याकडं बघत कपाळाला हात लावला...!!
पांठोपांठ परिचारिका आली, आणि तिनं कसली कसली चार-दोन औषधं गिळायला लावली...मग हाताच्या शिरेत सुई खुपसून तिला सलाईनची ठिबक बाटली जोडून ती खाटेजंवळच्या दांडक्याला उलटी टांगली, न् ती निघून गेली... ...
आतां सगळं खुद्द मातोश्रीनी च हातांत घेंतलेलं असल्यामुळं मी चांगलाच निश्चिंत होतो...देव च्या पांठीमागं पण त्यांनी त्यांच्या ' तथाSस्तु ' चं सामर्थ्य उभं केलेलं असणार हें पण मी जाणून होतो... ...
त्यांचं स्मरण करून मी मग निवांत तांणून दिली... ... ...
, “ उठा उठा बाबा... ...परिचारिका तुम्हांला न्यायला आलीय...” चि. सौ. बापू मला हंलवून जागा करीत म्हणाले...
मी डोंळे चोंळत विचारलं, “ झालं सगळं... ...?”
चि. बापू , “ झालं काय बाबा...आतां सुरूं होणाराय सगळं...उठा, न् ह्या चांकंवाल्या ढंकलखुर्चीवर बसा... ...”
मी अंग झंटकून कपडे नीट केले...न् सौ. इंदिराजी ना विचारलं, “ किती वाजलेत ?”
सौ. इंदिराजी, “ अडीच वाजतायत...देव नं वेंळापत्रक अगदी कांटेकोर पाळलेलं दिसतंय एकंदरीत...”
मी च मग सगळ्यांना उन्नतांगुष्ठ दांखवून त्या चांकंवाल्या ढंकल खुर्चीत बसलो...
सोबत सगळेच निघाले...आणि उद्वाहनातनं खाली उतरून दुस-या मजल्यावरच्या शस्त्रक्रिया दालनाच्या शेंजारच्या कक्षांत आमची स्वारी पोंचली... ...
तेंव्ढ्यात निळा डगला न् तंसलीच गोल टोपी घातलेला देव दांखल झाला...
त्यानं आम्हांला सदर शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय करतात, ती साधारण तीस-चाळीस मिनिटांत च पूर्ण होते, ती वेदनाहीन असते...रुग्णाला कळतही नाही सगळं कधी झालं तें...पण सगळाच मामला बिल्कुल वेदनारहित असतो अशी चुकीची समजूत मात्र करून घेऊं नकां...शस्त्रक्रियेनंतर तिथली जखम भंरेतोंवर पुढचा आंठवडाभंर तरी शस्त्रक्रियेच्या जागीं थोड्याबहुत वेदना होतातच...पण त्यांत घाबरण्यासारखं कांहीच नसतं...इत्यादी सगळ्यांना नीटपणे समजावून सांगितलं...न् दहा मिनिटांत तुम्हांला घेंतो आंत...' सगळी जय्यत तयारी झालेली आहे...कांही काळजी करूं नकां तुम्ही' असं सांगून तो आंत जायला निघाला... ...
मी, “ भूलतद्न्य कोण आलेले आहेत देव ?”
देव, “ ती पण काळजी सोडा...पुण्यातले ज्येष्ठ भूलतद्न्य डॉ. गोखले स्वतः च उपस्थित झालेले आहेत तुमच्यासाठी... ...”
मी, “ छान...जगदंब...जगदंब...”
बरोबर सात-आंठ मिनिटांनी दोन परिचारिका बाहेर आल्या...
त्यांनी माझा ताबा घेतला... ...
उपस्थित सगळ्यांनी मला उन्नत अंगठे दांखवले, आणि परिचारिकाद्व्ययी नं मला आंत नेऊन शस्त्रक्रियामेजावर आडवा केला...
डॉ. गोखल्यांनी मला बंसता व्हायला सांगून पांठीच्या कण्यात भूल कधी दिली, तें कळलंही नाही मला, न् त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला असलेल्या प्रतिमादर्शकाच्या पडद्यावर प्रत्यक्ष्य शस्त्रक्रिया कधी दिसायला लागली, तेंही कळलं नाही...देव शस्त्रक्रिया करतांना स्वतःच मला सगळं पडद्यावर दांखवत समजावून सांगत होता... ... ...मस्त वेळ गेला अगदी.
तो जेव्हां, “ झालं सगळं...छायाचित्रण बंद करा " असं म्हणाला, तेव्हां कुठं मला कळलं, की शस्त्रक्रिया आटोंपली म्हणून...
मी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळात वेंळ बघितली...
तें वेंळ दांखवत होतं तीन वाजून अडतीस मिनिटं...!!
देव नं त्याचं अभिवचन शब्दशः तंतोतंत पाळलेलं होतं... ...!!!
एकदां कां ' येतां मातोश्रीं च्या मनां...’ झालं ना, कीं सगळं असंच यक्षिणीची कांडी फिरवल्यागत तंडाख्यात होतं... ... ...
जगदंब...जगदंब...
उर्वरित मलमपट्ट्या करून, नवी विसर्गथैली कमरेला बांधून परिचारिकांनी मला पुनश्च ढंकलखुर्चीवर स्थानापन्न केला, आणि सिकंदर च्या थाटात अस्मादिकांची वरात परत शस्त्रक्रियादालनाबाहेर आणली ... ...
चि. बापू-श्रीनित नी मला ' सुस्वागतम् बाबा ‘...म्हणत मला दोन बोटं वर करून विजयश्री चा व्ही दांखवला...
सौ. इंदिराजी प्रसन्न हंसल्या... ...
चि. गुंडाप्पा चा चेहरा मात्र जरा उतरलेला दिसत होता...
मी, “ काय झालं रे गुंड्या तुला ?”
चि. गुंडाप्पा, “ आजो...तुला दुखलं काय रे कांपतांना ?”
मी त्याला जंवळ घेंतला, “ छे रे...कसलं कापणं न् कसलं काय...मला कळलं पण नाही अजिबात कांही "
चि. गुंडाप्पा चा चेहरा आतां उजळला...
आणि आमची वरात परत आमच्या वास्तव्यकक्ष्यांत परत आली...
येतांना सोबतच्या परिचारिके नं आम्हांला एक कांचेची बाटली दांखवली...जी त कसलेतरी गुलाबी रंगाचे बडीशेपेच्या दाण्यांएव्हढे तुकडे द्रवपदार्थात ठेंवलेले दिसत होते...
मी,“ काय आहे हे ? ”
परिचारिका," हें आत्तांच शस्त्रक्रिया करून कांढलेले तुकडे काका...तंपासणीसाठी पांठवायचे असतात ना ते?...म्हणून बाटलीत भंरून ठेंवलेत...हे बघा...”
मला तें बघतांना जरा कसंतरीच वाटलं...
बाकीच्या सगळ्यांनी मात्र नवलभंरल्या नजरांनी तें बघितले.
परिचारिका, “ याचा तंपासणी अहवाल उद्यां सकाळीं तुमच्या हातांत पडेल...दुपारीं डॉ. शहा तुम्हांला तंपासायला येतील ना, तेव्हां त्यांना दांखवायचा तो...” इतकं सांगून ती निघून गेली...
खोलीत परतल्यावर सौ. इंदिराजीं चा चेंहरा जरा विचारांत गढलेला दिसत होता...
मी, “ कसला विचार करताय तुम्ही...?”
सौ. इंदिराजी,“ अहो...आपण आत्तां वरनं खालीं इथं परत आलो ना...तेव्हां येतांना जिन्याजंवळ मला आपल्या पांठीमागं मातोश्री उभ्या आहेत, असा कांहीसा भास झाला बघा... ...तुम्हांला झालं काय तसं कांही...?”
जगदंब...जगदंब...
बघा तुम्हांला तरी तसं कांही जाणवतंय काय तें... ...
पुढचा एक दिवस तो नमुना तंपासणारे तद्न्य वैद्य च रजेवर अल्यामुळं तो अहवाल कांही तंयार झाला नाही...तो मिळाला १२ तारखेला...गुरुवारीं.
त्या दिवसभंरांत खाटेला टांगलेल्या थैलीतला विसर्ग ब-यापैकीं तांबडा दिसत होता...पण दुपारनंतर हंळूहंळू त्याची लाली ओंसरत तो अगदी स्वच्छ दिसायला लागला.
त्या दिवशीं सायंकाळीं पांच वाजतां देव तंपासायला आला, न् खाटेला लंटकणा-या थैलीतला अलांच्छित विसर्ग बघून म्हणाला, “ हें काय...अगदी सफाचट् मारली की लढाई तुम्ही काका... ...कसं वाटतंय आतां ?”
मी, “ अजून दुखतंय ...पण ठीक आहे एकंदरीत. ”
देव, “ अहो...तें अजून कांही काळ होणारच...जंखम अजून ताजी आहे ना ?...येईल भंरून ती आंठवडाभंरात...पण विसर्गातला रक्तस्राव तर थांबलाय ना फक्त अठ्ठेचाळीस तासांत ?...नमुना तंपासणी चा अहवाल आलाय काय ?...बघूं द्या बरं मला तो...”
चि. बापू नी अहवाल देव च्या हातात दिला, “ हं...हा बघा...”
देव च्या चेंह-यावर अहवाल बघून स्मित पसरलं...,“ वा...छा S S S S न...ही लढाई पण सफाचट् मारलीय तुम्ही काका... ...अहवाल अगदी ठंणठंणीत आहे...कसलीच चिंता-काळजी करायची गरज नाही आतां तुम्हांला...मग?...जायचं ना आतां घरीं ?...मी आज संध्याकाळचाच डिस्चार्ज लिहून देतोय तुम्हांला...अभिनंदन...!!! आतां ही तीन महिन्याची औषधं लिहून देतोय, तीं सुरूं करां लगेच घ्यायला, आणि येत्या शुक्रवारीं या तब्येत दांखवायला...”
इतकं बोलून सहाय्यकांना माझ्या कमरेची विसर्गथैली कांढून टांकायला सांगून देव निघून गेला... ...
सौ. इंदिराजी न् चि. बापू डिस्चार्ज चा दांखला घेऊन विमा कंपनी कडं करायच्या दाव्याचे कागद भंरून द्यायला, न् बाकींचीं किरकोळ देयकं भागवायला पळाले, न् मी उठून बसत जरां उशीला पांठ टेंकून विसांवलो, न विसांवलो तोंच डोंक्यात एक गोष्ट संणकून जागीं झाली... ...
शस्त्रक्रिया झाल्यास आतांपावेतों पोंट साफ झालेलंच नव्हतं... ...!!!
सौ. इंदिराजी न् बापू तासाभंरानं परतल्यावर मी हें त्यांना सांगितलं... ... ...
आतां सौ. इंदिराजी नी कपाळाला हात लावला,“ बापरे... ...म्हणजें हें ' पुनश्च हरि ॐ ' झालं की काय आतां ? ...मुळात पोंटाच्या तक्रारीसाठीच तर इथं दांखल झालो होतो ना आपण सर्वप्रथम ?”
चि. बापू ,“ आतां करायचं काय आपण ?...डिस्चार्ज मिळाला...विम्याचा दावा रवाना झाला, न् तांबडतोब त्याच्या प्राथमिक स्वीकृति चा अहवालही मिळालाय विमा कंपनीकडून, न् किरकोळ देयकं पण भांगवून झालींत सगळीं... ...आतां इथं कसं काय थांबतां येईल आपल्याला ?...बापरे...चांगलंच लचांड झालंय की हें... ...काय करायचं गं आतां आई?”
आतांपावेतों रात्रीचे आंठ वाजत आलेले होते... ... ...
आमच्या सौ. इंदिराजी ना समयसूचकता जन्मतःच दांडगी आहे...कसल्याही समर प्रसंगाला त्या दंमडीची भीक घालत नाहीत ...
त्यांनी तांबडतोब डॉ. कुंडल्यांना फोन लावला, न् सगळं सांगितलं... ... ...
डॉ. कुंडले रात्रीच्या तंपासणी फेरीतच होते. ते पंधरा वीस मिटांनी आले...
मग सौ. इंदिराजी नी त्यांना परत सगळं सांगितलं...
आणि मी म्हटलं, “ डॉक्टर...हें सगळं असं होऊन बसलंय खरं...आतां आम्ही जर घरीं गेलो, न् रात्रीं कांही पहिल्यासारखं लचांड पुन्हां उपटलं, तर करायचं काय ?”
डॉ. कुंडले हंसले..., “ नाना...शस्त्रक्रियांनंतर होतं असं कधी कधी... ... आतां विमा दाव्यासकट सगळंच पार पडलेलं आहे...पण जर काळजीच कुरतडायला लागली असेल तुम्हांला, तर रहा इथंच अजून एखादा दिवस...आमचे पाहुणे म्हणून...!!!...त्यानं कांही बिघडणार नाहीय आमचं...काय ?”
मी, “ अहो पण तें... ...”
डॉक्टरांनी मला मध्येच थांबवत सोबतच्या परिचारिकेला मला कसलातरी जमालगोटा रात्रीं झोंपतांना द्यायला सांगितला, न् म्हणाले, “ यानं उद्यां सकाळपर्यंत सुपडा साफ होऊन जाईल... ...मग जा घरीं निवांतपणे सगळं आंवरून...”
आणि खंरोखंरीच पुढचा एक दिवस रुग्णालयाचाच पाहुणचार घेऊन दुस-या दिवशीं पोंट साफ झाल्यावर आमची वरात तेरा डिसेंबर च्या तारखेला सुखानं स्वगृहीं परतली...
तीही मातोश्रींच्याच शुक्रवारीं ... ...!!!
त्यानंतर आजतागायत सगळ्या तंपासण्या, देव च्या गांठीभेंटी, वगैरे वगैरे सगळं च्या सगळं मातोश्रीं च्या इच्छेनुरूप त्यांच्याच वारीं पार पडत आलेलं आहे... ...
कारण देव चे आश्वस्त रुग्णालयातले ठंरलेले दिवसही मंगळवार-शुक्रवार च आहेत.. ...!!!
आणि हें सगळं शब्दबध्द करायची मला प्रेरणा होऊन तें यथावकाश यथोचितपणे कागदावर उतरलंय तें पण त्यांच्याच नवरात्र पर्वात...आणि त्यांच्याच दिवशीं... ...
आज मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५.
मी सुरुवातीला वर म्हटलंय ना, तसं एकदां कां मातोश्री नी नियतीचं नियंत्रण हातांत घेतलं, की त्यापुढं सगळ्या संबंधित गोष्टींची तड लागेतोंवर प्रत्येक घटित हे त्यांना हवं तसंच, हवं तेव्हांच, आणि हव्या त्या दिशेनं च घडत जातं... ...
तें हें असं... ... ...
येतां मातोश्रीं च्या मनां | कोण थोंपवी नारायणा ? ||
अजून कांही शंका-कुशंका ?
जगदंब...जगदंब.
-- रविशंकर.
३० सप्टेंबर २०२५.